30 November 2009

ऑफर्सच्या जाळ्यात ग्राहकांचा मामा

सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे.  जो बोलेल त्याची मातीही विकली जाईल आणि बोलणार नाही, त्याचे सोनेही विकले जाणार नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आपल्या मालाची तडाखेबंद विक्री करण्यासाठी किंवा आपल्या कंपनीच्या योजनांकडे ग्राहकांनी वळण्यासाठी आकर्षक ऑफर्स देण्यात येतात. जो  बोलबच्चनगिरी करतो, मोठ्या प्रमाणात जाहिराती करुन स्वताचे ढोलताशे वाजवतो त्या कंपनीच्या मालाकडे/ योजनांकडे ग्राहक वळतात. फक्त वस्तूंसाठीच नव्हे तर अन्य काही योजनांही आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.  हे सगळे करताना संबंधित कंपन्या, व्यापारी यांचे उखळ  पांढरे होते आणि या ऑफर्सच्या जाळ्यात गुरफटून ग्राहकांचा मामा होतो.


विविध वाहिन्यांवरुन सुरु असलेल्या रिअॅलिटी शो किंवा गाण्यांच्या स्पर्धेसाठी महाअंतिम फेरीतील विजेता निवडण्यासाठी एसएमएस मागवले जातात. या कार्यक्रमांचे लाखो प्रेक्षक आपल्या आवडत्या गायकासाठी एसएमएस पाठवतात. मात्र या सगळ्याचा ती वाहिनी आणि एसएएमएस कंपनी यांनाच प्रचंड फायदा होतो. स्पर्धा संपल्यानंतर जो निकाल लागतो, तो अगोदरच ठरवलेला असतो, हे ही आता सगळ्यांना माहिती झालेले आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रेक्षक यात गुरफटत जातो. एसएमएस करुन आपले पैसे घालवतो आणि इतरांना फायदा करुन घेतो.


एका शर्टवर दोन शर्ट फ्री, एका पॅन्टवर दोन पॅन्ट फ्री किंवा अमूक एका वस्तूवर तमूक फ्री अशाही जाहिराती आपल्या वाचनात येतात. त्यालाही आपण बळी पडतो. कारण मूळातच एका शर्टाची किंमत वाढवून ठेवलेली असते. ते आपल्या लक्षात येत नाही. एकावर एक  किंवा दोन फ्री मिळणार म्हणून आपण ते खरेदी करतो. बरे आपल्याला आत्ता खरोखऱच इतक्या शर्टची गरज आहे का, याचाही सारासार विचार आपण करत नाही. म्हणजे कधीकधी गरज नसतानाही ऑफर्स दिली आहे म्हणूनही खरेदी केली जाते.


अनेकवेळा स्टॉक क्लिअरिंग सेलच्या नावाखाली आकर्षक ऑफर्स देऊन जुना माल विकला जातो. काही जणांचा अपवाद वगळता अन्य ग्राहकांच्या पदरी निराशाच येते. कारण दुकानातून किंवा प्रदर्शनातून वस्तू किंवा कपडे घरी आणल्यानंतर त्या वस्तूतील किंवा कपड्यातील खोट लक्षात येते. पण तोपर्यंत आपण फसले गेलेलो असतो. एक महिन्यात/ वर्षात दुप्पट अशा पैशांच्या योजनांमधूनही सर्वसामान्य आणि सुशिक्षित लोकही पैसे गुंतवतात. काही जणांना सुरुवातीला आश्वासन दिलेली रक्कम मिळते. नंतर मात्र संबंधित कंपनीची लोक गाशा गुंडाळून पसार होतात आणि हजारो, लाखोंची रक्कम गुंतवलेल्या ग्राहकांना कंगाल व्हायची वेळ येते.   


मेगा ऑफर, मास्टर-ब्लास्टर ऑफर, पुन्हा अशी संधी येणार नाही, आला नाहीत तर पस्तावाल असे शब्दांचे खेळ करुन ग्राहकांना भुलवले जाते. पर्यटन कंपन्याही यात मागे नाही. मुळात आपण जर आपले स्वताचे नियोजन करुन प्रवासाला गेलो तर पर्यटन कंपन्यांनी दिलेल्या ऑफरपेक्षाही स्वस्तात आपली ट्रीप पार पडते. पर्यटन  कंपन्या ऑफर देताना अमूक एका तारखेपर्यंत नोंदणी केली तर इतक्या हजार रुपयांची सवलत, अशा जाहिराती करत असतात. म्हणजेच हजारो रुपयांची सवलत देऊनही कंपन्याना फायदा होणारच असतो. मग सवलत देण्यापूर्वीचे जे दर प्रवाशांना लावण्यात आले असतात तेव्हा या पर्यटन कंपन्यांनी ग्राहकांना किती लुबाडले असेल, याचा विचार आपण कधी करतो का.


असाच प्रकार सेलचाही असतो. मुळातच सेलमध्ये वस्तू, कपडे यांच्या किंमती वाढवून ठेवलेल्या असतात. सेलच्या किंवा आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली संबंधित दुकानदार, सेलचे आयोजक ग्राहकांना लुबाडतच असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मंडळी धंदा करायलचा बसलेली आहेत. ते सर्व धंदेवाईक आणि व्यापारी असल्यामुळे ते आपले नुकसान कधीही करुन घेणार नाहीत. नुकसान सोसून एखाद्याला अव्वाच्या सव्वा द्यायला किंवा पैसे कमी करण्याच्या नावाखाली प्रवास घडवायला ती मंडळी साधूसंत किंवा धर्मादाय संस्था नाहीत. त्यामुळे अशा अशा कोणत्याही ऑफर्स म्हणजे ग्राहकांना लुटण्याचे आणि मामा करण्याचे नवनवे प्रयोग आहेत, ही खुणगाठ प्रत्येकानेच मनाशी बांधावी.                    

29 November 2009

राणे, राज आणि आता स्मिता...

शिवसेनेचे सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती गेल्यानंतर ज्या प्रकारे कारभार सुरू आहे, ते पाहता एक ना एक  दिवस शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे दोघेच राहतील, असे विधान नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर केले होते. राणे यांच्या सारखा मासबेस असलेला नेता बाहेर पडल्यानंतर नाही म्हटले तरी शिवसेनेला धक्का होता. राणे यांच्यापूर्वी छगन भुजबळ यांनी मोठे बंड करुन काही आमदारांसह शिवसेना सोडली होती. त्यानंतर गणेश नाईक बाहेर पडले. राणे यांच्यानंतर शिवसेनेत सारे काही आलबेल असल्याचे चित्र रंगविण्यात येत होते. मात्र ते फार काळ टिकले नाही. राणे यांच्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले आणि आता राणे व राज यांच्यासारखे पक्षात कोणतेही पद नसलेल्या परंतु काही काळ पर्यायी सत्ताकेंद्र असलेल्या स्मिता ठाकरे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत.


शिवसेनाप्रमुख यांनी आपला राजकीय वारसा पुत्राकडे अर्थात उद्धव यांच्याकडे जेव्हा सोपवला तेव्हापासूनच शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरु झाली होती. केवळ पुत्रप्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतील अन्य नेते आणि राज यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केल्याचे तेव्हाही बोलले गेले होते. कारण तोपर्यंत शिवसेनेत भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आपले बस्तान चांगल्यापैकी बसवले होते. अन्य ज्येष्ठ नेतेही कार्यकारी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. शिवसेनेत राज आणि अन्य ज्येष्ठ नेते आंदोलने करतांना रस्त्यावर उतरत होते तेव्हा उद्धव हे फोटोग्राफी करण्यात मग्न होते. शिवसेना किंवा राजकारणाशी त्यांचा संबंध नव्हता. शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली, जोपासली आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नावाचा, कार्याचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या शब्दाला संघटनेत मान आणि वजन होते. पक्षावर, पक्षातील नेत्यांवर आणि शिवसैनिकांवरही त्यांची पकड व जरब होती. उद्धव यांनी शिवसेनेत सक्रीय होऊन काही वर्षेच झाली होती. तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ पुत्रप्रेमापोटी उद्धव यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि तेथेच चुकले, असे आता उघडपणे बोलले जात आहे.


राणे यांच्यानंतर राज यांच्यारुपाने एक ठाकरे पक्षाबाहेर गेले. उद्धव यांना सर्व काही आयते मिळाले. वडिलांची पुण्याई त्यांना कामाला आली. मात्र राज ठाकरे यांनी स्वबळावर पक्षाला मतदारांमध्ये विशेष म्हणजे तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांमध्ये मनसेची क्रेझ निर्माण केली. पक्षातून बाहेर पडल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सात नगरसेवकही निवडून आणले. त्यानंतर मराठीचा मुद्दा हाती घेत प्रत्येक वेळी शिवसेनेला पर्यायाने उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्याची संधी सोडली नाही. त्यात ते यशस्वीही होत गेले. लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची सर्व गणिते चुकत गेली. मात्र या पराभवानंतरही उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण न करता मराठी माणसालाच दोष दिला. नेमके काय करायचे ते कळत नसल्याने किंवा उद्धव व त्यांच्या सल्लागारांनी केलेली प्रत्येक खेळी चुकत गेली.


आता स्मिता ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील आणखी एक ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडत आहे. त्यांची ताकद किती, त्यामुळे शिवसेनेला किती फटका बसू शकेल, राज यांच्यामागे शिवसेनेतील काही मंडळी जशी गेली, तशी स्मिता ठाकरे यांच्या मागोमाग किती जण बाहेर पडतील याबाबत आत्ता काहीच सांगता येत नसले तरी शिवसेनेचे मुख्यत उद्धव यांचे विरोधक  उद्धव यांच्याच नाकर्तेपणामुळे स्मिता यांनी शिवसेना सोडली किंवा त्यांना ती सोडायला भाग पाडण्यात आले, असा  प्रचार करण्यासाठी आता आणखी कोलीत मिळेल. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत चालली असल्याचे सर्वाना पाहायला मिळत आहे. प्रत्येकवेळी उद्धव यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे, उद्धव हे स्वतच्या ताकदीवर काहीही करु शकत नाही, शिवसेनेसारख्या संघटनेचे नेतेपद सांभाळण्याची त्यांची खरोखरच कुवत आहे की नाही, कोणताही निर्णय़ घेताना खुषमस्कऱया सल्लागारांचे किती काळ ऐकणार, शिवसेनाप्रमुखांनी कष्टाने उभी केलेली संघटना ते खरोखरच रसातळाला नेणार का, असे अनेक प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला, मुंबईतही शिवसेनेला शह देत मनसेचे उमेदवार निवडून आले, विधानसभा आणि विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाल्याने शिवसेनेला दोन्ही ठिकाणच्या विरोधीपक्षनेतेपदावरही पाणी सोडावे लागले.



खरे म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव यांनी जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगत आपण कार्यकारी अध्यक्ष झाल्यापासूनचा जमाखर्च एकदा मांडावा. जमा किती आणि खर्च किती याचा तसेच  आपण खरोखरच ही जबाबदारी पेलायला समर्थ आहोत का त्याचाही गंभीरपणे विचार करावा. अन्यथा एक दिवस नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे शिवसेनेत फक्त उद्धव, त्यांची पत्नी रश्मी, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत आणि अन्य खुषमस्करेच राहतील. वेळीच सावध होऊन पावले उचलली नाहीत तर राणे यांचे भाकीत खरे व्हायला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना रसातळाला जायला आणि तिची शकले व्हायलाही फार वेळ लागणार नाही...          

28 November 2009

सांगा कसं जगायचं

काही दिवसांपूर्वी मी हे जीवन सुंदर आहे या शीर्षकाअंतर्गत ब्लॉगवर लेखन केले होते. जीवनात अनेक दुख, अडचणी असल्या, जीवन हे क्षणभंगूर असले तरीही आपण प्रत्येकाने आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालवावा, उद्याच्या भविष्याची काळजी करण्यात आजचा क्षण वाया घालवू नये, असे लिहिले होते. खरे तर त्याच्या दुसऱयाच दिवशी या विषयासंदर्भातील काही गाणी येथे द्यायची होती. पण दुसऱया विषयावर लेखन केले आणि ते राहून गेले. आज त्याविषयी...



जावई विकत घेणे आहे या चित्रपटातील एक छान गाणे मला पटकन आठवले. शरद तळवलकर यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे सगळे शब्द मला मिळाले  नाहीत. माझ्या आठवणीप्रमाणे सुधीर फडके यांचा आवाज या गाण्याला आहे.


हाती नाही येणे

हाती नाही जाणे

हसत जगावे, हसत मरावे

हे तर माझे गाणे

असे गाण्याचे ध्रुवपद आहे.


हे गाणे मला खूप आवडते. जणू काही जीवनाचे सर्व सार आणि जीवन कसे जगा, याचेच मार्मिक वर्णन यात केलेले आहे.

असेच आणखी एक गाणे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील तेही हे जीवन सुंदर आहे या विषयाशी निगडीत आहे. ते म्हणजे

व्यथा असो आनंद असू दे

प्रकाश किंवा तिमिर असू दे

वाट दिसो अथवा न दिसू दे,

जात पुढेच रहाणे.

माझे जीवनगाणे


मंगेश पाडगावकर यांचेच या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गाणेही छान आहे. अरुण दाते यांचा स्वर या गाण्याला लाभला आहे.

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावरकर यांची याच विषयावरची आणखी एक  कविता.  अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून पाडगावकर यांनी या कवितेचे वेळोवेळी वाचन केले आगे. सांगा कसं जगायचं ही ती कविता. ती मात्र मला मिळाली. आपल्या माहितीसाठी ती कविता...


सांगा कस जगायचं?


कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण

कोणीतरी काढतंच ना?

ऊन ऊन दोन घास

तुम्च्यासाठी वाढतंच ना?

शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं

तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात

जेव्हा काही दिसत नसतं

तुमच्या साठी कोणीतरी

दीवा घेऊन उभं असतं

कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं

तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात

हे अगदी खरं असतं;

आणि फ़ुलं फ़ुलुन येतात

हे काय खरं नसतं?

काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं

तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

पेला अर्धा भरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं

तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

-मंगेश पाडगावकर.


ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीतकार यशवंत देव हे त्यांच्या कार्यक्रमातही ही कविता सादर करतात. देव यांनी गाण्याला सहज, सोपी चाल लावली आहे. त्यामुळे खुद्द पाडगावकर यांच्या आवाजात आणि देव यांच्याही आवाजात कवितेचे गाणे खूप छान वाटते. मनावर आलेली मरगळ, जीवनात आलेले नैराश्य या कवितेने दूर निघून जाते.   

26 November 2009

मुंबईचा पाणीपुरवठाही अतिरेक्यांचे लक्ष्य ठरू शकतो..


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत पालिका प्रशासनाने दावा केला असला तरीही दहशतवादी किंवा राष्ट्रद्रोही शक्तींकडून कधीही, केव्हाही आणि कसाही घातपात घडवून आणला जाऊ शकतो, अशी वस्तुस्थिती असल्याचे दिसून येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना असणारा बेकायदा झोपडपट्टय़ांचा विळखा घातलेला भस्मासूर याला कारणीभूत ठरू शकतो. तसेच जलवाहिन्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते नसणे, अपुरी टेहळणी पथके, सुरक्षा विभागातील रिक्त असलेल्या -जागा, झोपडय़ाबरोबरच अन्य अनधिकृत बांधकामांचा विळखा ही कारणेही असू शकतात.

मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर हे तलाव मुंबईबाहेर आहेत. त्या तलावांपासून जलवाहिन्यांद्वारे हे पाणी मुंबईत आणले जाते. पवई, भांडुप कॉम्प्लेक्स, भांडुपखिंडी पाडा आदी मार्गे ते मुंबईकरांना मिळते. ठाण्यातील काल्हेर चौक हे भिवंडी रस्त्यावर असून त्या समोरुन म्हणजे बाळकूम व कशेळी गावातून सुमारे १२० इंच व्यासाची मोठी जलवाहिनी जाते. काल्हेर चौकी ते कल्याण पूल व कल्याण पूल ते शांतीनगर येथे सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. भिवंडी परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीतील नागरिक कल्याण पूल ते पोगाव जंक्शन या परिसरात आंघोळ आणि प्रश्नत:विधीसाठी याच जलवाहिनीच्या पाण्याचा वापर करतात. त्यांना अटकाव करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत.

जलवाहिन्यांना पडलेल्या बेकायदा झोपडपट्टय़ांची संख्या सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते. मुलुंड ते धारावी आणि शीव परिसरात हा विळखा जास्त प्रमाणात आहे. वांद्रे रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावरुन पूर्वेकडे जाताना जलवाहिन्यांना वेढलेल्या या झोपडय़ा अगदी सहज दृष्टीस पडतात. काही ठिकाणी तर बैठय़ा झोपडय़ांवर चक्क एक ते दोन मजलेही उभारण्यात आले आहेत. हा सगळा भाग बेहरामपाडा म्हणून ओळखला जातो. जलवाहिन्यांना असलेल्या या बेकायदा झोपडय़ांमुळे पाणीचोरी, पाणीगळती मोठय़ा प्रमाणात होत आहेच, पण त्यामुळे पालिकेच्या जलंभियंता खात्याच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन जलावाहिन्यांची देखभाल करणेही कठीण जात आहे.

पालिका प्रशासनानेच तयार केलल्या अहवालानुसार मुलुंड ते भांडुप संकुल, भांडुंप संकुल ते दिनशा ब्रिज, मरोशी ते अंधेरी-कुर्ला मार्ग, कुर्ला अंधेरी मार्ग ते सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ, साकीविहार भाग, घाटकोपर ते साकीनाका क्रॉस कनेक्शन, सहार एबी ते वांद्रे आणि माहीम परिसरात या झोपडय़ा आहेत.

या प्रश्नाकडे राजकीय किंवा जातीय भूमिकेतून न पाहता लाखो मुंबईकरांसाठी असलेला धोका म्हणून त्याकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती आणि धाडस दाखवत तेथे राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करत या झोपडय़ा जमिनदोस्त केल्या पाहिजेत. तसेच येथून पुढे जलवाहिन्यांच्या परिसरात किंवा जलवाहिन्यांवर एकही झोपडपट्टी होणार नाही, त्याची खबरदारी घेतली पाहिजे.

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त, २६ नोव्हेंबर २००९ पान क्रमांक एकवर प्रसिद्ध झालेली माझी बातमी)

25 November 2009

सुरक्षेतील क्षुल्लक ढिलाईही घातक

मुंबईवर गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी हल्ल्या केल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यापूर्वीही महापालिका मुख्यालयावर दहशतवादी हल्ला करण्याचे प्रयत्न झाल्यामुळे २६/११ नंतर अधिक खबरदारी घेण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेत वाढ, अत्याधुनिक यंत्रसामग्री, कमांडो सुरक्षा असे विविध उपाय करण्यात आले असले तरीही महापालिका सुरक्षित आहे की असुरक्षित हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाही.


छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर असलेली पालिका मुख्यालयाची इमारत पारंपरिक वारसा लाभलेली (हेरिटेज) वास्तू म्हणून ओळखली जाते. देशातील सर्वात श्रीमंत आणि सुमारे १८ ते २० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली महापालिका अशीही तिची ओळख आहे. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळीच महापालिका मुख्यालयावर हल्ला करण्यात येणार होता. मात्र सुदैवाने तो प्रयत्न फसला. त्यानंतर राज्य शासन, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. पण त्याची तीव्रता असा एखादा प्रसंग घडला की काही दिवसच राहते, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.


२६/११ च्या हल्ल्यानंतर महापालिका मुख्यालयात प्रवेश करणाऱ्यांसाठी कठोर र्निबध घालण्यात आले होते. पालिकेचे मुख्यालय व त्याला लागूनच असलेल्या इमारतीमधून जाणारा रस्ता खासगी वाहने आणि लोकांसाठी बंद करण्यात आला. तेथे दोन्ही बाजूनी सुरक्षारक्षकांच्या चौक्या, महापालिका मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार आणि अन्य ठिकाणी बंकर तयार करण्यात आले होते, त्यात पहारा देण्यासाठी जवान तैनात करण्यात आले होते, प्रवेशद्वारांवर स्कॅनर मशिन, मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते, पालिका सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांखेरीज स्वतंत्र प्रशिक्षण दिलेले खास कमांडोही तैनात करण्यात आले होते, काही सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातात हॅण्ड मेटल डिटेक्टर देण्यात आले.


मात्र हे सगळे झाले असले तरी तेथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, नगरसेवक यांची मानसिकता बदलली नाही, असे म्हणावे लागते. काही अपवाद वगळता सर्वाकडूनच सुरक्षिततेच्या बाबतीत ढिलाई दाखविण्यात येत आहे आणि तीच गोष्ट घातक ठरू शकते.



नगरसेवक, अन्य लोकप्रतिनिधी किंवा पक्षाचा कोणी पुढारी पालिकेत येताना आपल्याबरोबर वीस-पंचवीस कार्यकर्त्यांना घेऊन येतो. प्रवेशद्वारावर या सगळ्यांना अडवले तर लोकप्रतिनिधीची बोलणी सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना खावी लागतात. काही नगरसेवक तर आपल्याला सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखले नाही म्हणजे आपला अपमान झाल्याच्या थाटात अरेरावीने वागतात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडेही ओळखपत्र मागितले तर त्यांनाही तो अपमान वाटतो. अशा प्रकारांमुळे सुरक्षारक्षकांची कुचंबणा होत आहे.



काही वेळेस सुरक्षा अधिकारी/कर्मचारीही अयोग्य पद्धतीने वागतात. एखादा गरीब, अशिक्षित माणूस काही विचारायला आला की त्याला योग्य उत्तरे देत नाहीत आणि प्रवेशद्वारापाशी भपकेबाज कपडे घातलेला आणि महागडय़ा गाडीतून कोणी बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार उतरला की त्यांना काही विचारायचे भानही त्यांना राहात नाही. कधी विचारले तर का विचारले म्हणून नोकरी जाण्याची किंवा कारवाई होण्याची भीती असते. मात्र महापालिका मुख्यालयाची सुरक्षितता सांभाळणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.



महापालिका मुख्यालय इमारत आणि बाजूच्या नवीन इमारतीचा पसारा अवाढव्य आहे. विविध खाती, विभागात काम करणारे कर्मचारी व अधिकारी, महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पक्षकार्यालये अशा सर्व ठिकाणी दररोज अनेक माणसे येत असतात. सध्या असे चित्र पाहायला मिळते की महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी किंवा अन्य महत्त्वाच्या समितीच्या बैठका, एखादा विशेष कार्यक्रम असला की कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली जाते. अन्य दिवशी मात्र तुलनेत सुरक्षा व्यवस्था मंदावलेली दिसते.



पालिकेच्या सुरक्षिततेसाठी दररोज कडेकोट सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे. प्रत्येक मजल्यावर दररोज अधूनमधून सुरक्षा अधिकाऱ्यांने गस्त घातली पाहिजे. त्यासाठी वेगळ्या माणसांची व्यवस्था करावी. स्फोटकांचा शोध घेणारे श्वान दररोज मुख्यालयातून फिरवण्यात आले पाहिजेत. अर्थात त्यासाठी लागणारे मनुष्यबळ राज्य शासन व पालिका प्रशासनाने उपलब्ध करुन दिले पाहिजे. पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांनाही आपले ओळखपत्र दिसेल अशा पद्धतीने लावले पाहिजे, पालिका मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नेत्यांनी सोबत दोन किंवा चार कार्यकर्त्यांना आणावे. प्रवेशद्वारावर सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता प्रत्येकाकडे ओळखपत्राची मागणी केली पाहिजे, तसेच तो अपमान न समजता सुरक्षारक्षकांना सहकार्य करावे.


 अशी काही बंधने प्रत्येकाना पाळली पाहिजेत. तसे झाले तर महापालिका मुख्यालय असुरक्षित न राहता सुरक्षित होऊ शकेल.

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२५ नोव्हेंबर २००९)पान क्रमांक  एकवर प्रसिद्ध झालेली माझी बातमी)  

24 November 2009

ऐलमा पैलमा मातोश्री देवा

महापौरपदाच्या सोडतीचे आरक्षण नुकतेच मंत्रालयात जाहीर झाले आणि बृहन्मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या तमाम महिला नगरसेविकांना महापौरपदाचा शालू आपल्यालाच मिळणार, अशी स्वप्ने पडायला लागली. अर्थात महापौरपदाची माळ एकाच महिला नगरसेविकेच्या गळ्यात पडणार असल्याने प्रत्येकीने आपापल्या परीने मार्चेबांधणी करायला सुरुवात केली. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या चार ते पाच महिला नगरसेविकांची गुप्त बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत प्रत्येकीने आपल्यालाच हे पद का मिळाले पाहिजे ते ठासून सांगितले. त्या बैठकीचा गुप्त वृत्तान्त आमच्या सूत्रांकडून आम्हाला कळला. आज तो सादर करत आहोत.


बैठकीसाठी जमलेल्या सर्व महिला नगरसेविकांनी सगळ्यात पहिल्यांदा

ऐलमा पैलमा मातोश्री देवा

महापौरपद मलाच मिळू दे

करीन पक्षाची व जनतेची सेवा

असे गाणे म्हणत सामूहिक फेर धरला.  


त्यानंतर महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या क्रमांक एकने

मागे उभा मिलिंद

पुढे उभा मिलिंद

आपल्या सगळ्यांकडे

मिलिंद हा पाहतो आहे

असे गाणे म्हटले.

त्यावर इच्छुक क्रमांक दोनने आपल्या फटकळ आणि डॅशिंग स्वभावानुसार मोठ्या आवाजात

नाव गाव कशाला पुसता

मी असले जरी गुजराथी

मला हो म्हनत्यात लवंगी मिरची

असे गाण्यातूनच प्रत्युतर क्रमांक एकला दिले.


त्यावर इच्छुक क्रमांक एक म्हणाली, मी तर सगळ्यात ज्येष्ठ नगरसेविका. स्थायी समिती किंवा अन्य समित्यांचे सदस्यपद मला मिळाले असले तरी महापौरपद ते महापौरपद. त्याची शान, गाडी आणि  बंगला व रुबाब काही वेगळाच. माझ्याकडे अनुभव आणि मनोहर रुप आहे. तेव्हा हे पद मलाच मिळाले पाहिजे.


लगेच इच्छुक क्रमांक दोनने आवाज चढवत सांगितले की, अग नुसते मनोहर रुप असून चालत नाही. कामे करुन घेण्यासाठी माझ्यासारखा डॅशिंग स्वभावही लागतो. अग आपल्यापैकी जीची निवड होणार आहे, तिला फक्त सहा महिनेच मिळणार आहेत. त्यानंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे जनमानसावर शिवसेनेच्या कामाचा ठसा उमटविण्यासाठी मीच योग्य आहे. आणि हल्ली मातोश्रीचाही मनोहररुपावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतही माझेच नाव सगळ्यांना पटेल की नाही बघ.

आणखी थोडीशी फोडणी देत इच्छुक क्रमांक दोन म्हणाली, सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरु आहे. त्यामुळे जर मलाच हे पद मिळाले तर शिवसेना अमराठी माणसांच्या विरोधात नाही, असा संदेश सगळ्यांना मिळेल. हे म्हणणे खोडून काढताना इच्छुक क्रमांक तीन म्हणाली की, कसला योग्य संदेश जाईल, कप्पाळ. अग असे झाले तर राजकारण कसे वळण घेईल हे तुला माहिती नाही का, आपल्या शत्रू क्रमांक एकच्या हातात या निमित्ताने आपण आयते कोलीतच देऊ. शिवसेनेने मराठी माणसांचा मुद्दा कसा सोडला, मराठी माणसावर शिवसेना कसा अन्याय करत आहे, असे बोंबलायला ते मोकळे होतील, त्याचे काय. त्यामुळे या पदासाठी तू योग्य नाहीस.


इच्छुक क्रमांक चारने तिसरीला पाठिंबा दिला. ती म्हणाली, अग त्यातून तू पश्चिम उपनगरातली. आत्ताचे महापौरपदही पश्चिम उपनगरालाच मिळाले आहे आणि आता पुन्हा ते तुमच्याकडे का, पूर्व उपनगर किंवा शहर भागालाही ते मिळायला हवे, असे पेच तिने टाकला.


चौघींचेही आवाज वाढू लागले. प्रकरण हातघाईवर येते की काय, अशी शंका वाटू लागली. तेव्हा वयाने अनुभवी असलेली, आपल्या सध्याच्या कारकिर्दीत एकदा सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आणि महापौरपदाच्या स्पर्धेत असलेली इच्छुक क्रमांक पाच म्हणाली, धन्य आहे तुम्हा सगळ्यांची. आपापसात इथे भांडत काय बसलात, आपल्याकडे कोणत्याही पदासाठी पात्रता, अनुभव किंवा ज्येष्ठता हा निकष सध्या नसतो, हे काय माहिती नाही तुम्हाला. अग कोणतेही पद मिळविण्यासाठी सध्या  मिलिंद, वहिनीसाहेब, मातोश्रीच्या दरबारातील चौकडी आणि नंतर आपल्या कार्यकारी साहेबांचा आशीर्वाद असतो लागतो हे विसरलात का.


अग मोठ्या साहेबांचे दिवस आता संपले.  ही मंडळी सगळे ठरवून मग त्यांना नुसत मम म्हणायला लावतात. अग  आपण इथे भांडत बसू आणि महापौरपदाचा शालू दुसरीच कोणीतरी पटकावायची. आजवर आपल्याला आलेले अनुभव काही कमी आहेत का. आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो राजसिंहही यंदाच्या वेळेस आपल्याकडून महापौरपद हिसकावून घ्यायला टपला आहे, हे विसरलात का. तेव्हा आपण भांडत न बसता आपल्यात एकमत करु या आणि वरपर्यंत एकीचेच नाव पोहोचवू या, काय माझे म्हणणे पटताय ना सगळ्याजणींना


वयाने ज्येष्ठ असलेल्या त्या नगरसेविकेच्या सल्ल्याने सगळ्यांजणीं भानावर आल्या आणि या गुप्त बैठकीचा समारोप झाला...

(गुप्त बैठकीच्या या वृत्तान्तातील  इच्छुक नगरसेविका आणि त्यांच्या  नामसाधर्म्याशी वास्तवाचा काहीही संबंध नाही , त्याची सर्वानी नोंद घ्यावी.  तरीही ते वर्णन कोणाला लागू पडत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा.  )
              

23 November 2009

औषधाविना उपचार

माझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक औषधाविना उपचार विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. सध्याची प्रचलित भरमसाठ किंमतीची महागडी औषधे न देता आणि बड्या औषध कंपन्यांच्या स्पर्धात्मक मोहाला बळी न पडता ज्यांनी औषधाविना उपचार चिकित्सा पद्धतीचे समर्थन केले, नव्हे व्रत स्वीकारले त्या ज्ञात, अज्ञात डॉक्टर, वैद्य मित्रांना आमचे लाख लाख सलाम. हा अंक त्यांच्यासाठीच, अशी टीप संपादक रमेश पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी अशा विषयावर अंक प्रकाशित करुन एक वेगळा विषय लोकांपुढे ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन,


या अंकातील अरविंद जोशी यांच्या निसर्गशक्ती आणि स्वयंचिकित्सा  या लेखांची ओळख आज मी करुन देत आहे.  अरविंद जोशी यांनी आपल्या लेखात मुळाक्षरे आणि आरोग्य, आरोग्यदायी रंगीत स्वस्तिके आणि भारतीय पुष्पौषधी याबाबत विवेचन केले आहे. या लेखात ते म्हणतात, आपल्या शरीरात सात चक्रे असून त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडल्या असून प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. ही बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहेत. जर ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हटली तर ती पाकळी कंप पावते आणि ती ज्या अवयवाला जोडली आहे तो अवयव नीट काम करु लागतो व आपले आरोग्य सुधारते. 


जोशी यांनी याबाबत अभ्यास करून काही प्रयोग केले आणि त्याचे खूप चांगले अनुभव आले. त्याची माहितीही थोडक्यात त्यांनी लेखात दिली आहे. या विषयावर त्यांचे षटचक्र आणि आरोग्य हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.


 लाल रंगाच्या स्वस्तिकामध्ये खूप शक्ती असते, हे जोशी यांच्या वाचनात आले.  त्यावरुन कल्पना सुचून जोशी यांनी इंद्रधुष्याच्या सात रंगांची स्वस्तिके तयार केली आणि त्याचे काही प्रयोग केले. रंगकिरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिके यांचे गुण सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. छाती कफाने भरली असता लाल रंगाचे स्वस्तिक छातीवर ठेवले तर कफ कमी होतो. थंडीच्या दिवसात लाल रंगाच्या स्वस्तिकावर बसले असता थंडी वाजणे कमी होते. फिक्या निळ्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी व पित्त कमी होते, असे अनुभव जोशी यांनी दिले आहेत.


पुष्पौषधीचेही काही अनुभव जोशी यांनी दिले आहेत. ते सांगतात की,  विशिष्ट फुले किंवा त्याच्या पाकळ्या रात्रभर (आठ तास) किंवा दिवसभर (२४ तास) भांडभर पाण्यात ठेवायच्या.नंतर ते पाणी गाळून घेऊन ४ ते ८ चमचे एका वेळी असे दिवसातून आवश्यकतेनुसार ३ ते ५ वेळा प्यायचे.  झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचे पाणी करावे. या पाण्याने खोकला कमी होतो, नव्हे जातो. गुलछडीच्या पाण्याने कोलायटीस कमी होते. बेकरीचे पदार्थ खाणाऱयांसाठी उपयुक्त, तसेच लघवी साफ होणे, बद्धकोष्ठता यावरही उपयोगी. लाल किंवा पांढऱया जास्वदांच्या फुलांचे पाणी कोलायटीस, मेंदूचे विकार, यकृताची सूज व हृदयाच्या आजारांवर उपयुक्त आहे. लाल कर्दळीच्या फुवाच्या पाण्याने घसा दुखणे, सुजणे थांबते. आंब्याच्या मोहोराचे केलेले पाणी निद्रानाश, रक्तीमुळव्य़ाध, अंगावर गाठी, उष्णतेचे रोग यावर काम करते. बेलाच्या पाण्याने शरीरातील हीट कमी होते. तसेच उच्च रक्तदाब व मधुमेहावर उपयुक्त आहे. जोशी यांनी लेखात ज्या फुलांची माहिती दिली आहे, त्यातील काही निवडक फुलांचे हे उपयोग.


आपल्या पूर्वजांनी निसर्गातील शक्तींचा अभ्यास करुन माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज, सोपे उपचार (ज्यात डॉक्टरला वा वैद्याला पैसे मिळत नाहीत) दिले. आम्ही त्यांना जुनाट, अडाणी म्हणतो. देवाला वाहण्याची फुले चांगली उपयुक्त आहेत. म्हणजे देवावर अभिषेक केलेले पाणी, दूध. तीर्थ (फुलावरुन आलेले) किती उपयोगी आहे पाहा. आमच्या पूर्वजामनी  तीर्थ पवित्र आहे ते घ्यावे अशी प्रथा पाडून समाजाच्या सहज आरोग्याचा विचार केला. त्याला अंधश्रद्धा म्हणायचे का, असा सवालही जोशी यांनी केला आहे.


अधिक माहितीसाठी जोशी यांचा संपर्क दूरध्वनी

०२०-२४४५०२७३ (रविवार खेरीज दररोज दुपारी ४ ते ६)

चैत्राली मासिकाचे संपादक रमेश पाटील यांचा संपर्क दूरध्वनी

०२०-३०२२२८१२              

22 November 2009

शिवसेनेची गोची

लोकसभा निवडणुकीबरोबरच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे आम्हाला कोणतेही आव्हान नाही, मनसेचा बुडबुडा विधानसभा निवडणुकीत फुटेल, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मनसेला मत देऊन जी चूक केली ती आता ते  करणार नाहीत, एकवेळ कॉंग्रेसला मत द्या पण मनसेला देऊ नका, अशी  आणि अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चौकडीतून केली गेली. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले. अनेक ठिकाणी दुसऱया क्रमांकाची मते घेतली. मुंबईत तर शिवसेना पार भुईसपाट झाली. तरीही उद्धव ठाकरे आणि त्यांचे ढोल वाजवणाऱया पित्यांचे डोळे उघडत नाहीत, याला काय म्हणायचे. मनसे आणि त्यांनी उचलून धरलेल्या मराठीच्या मुद्यामुळे शिवसेनेची  पार गोची झाली आहे. नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत शिवसेना नेतृत्व संभ्रमावस्थेत सापडले आहे आणि त्यातूनच धरले तर चावते आणि सोडले तर पळते किंवा करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.


विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून त्याचे खापर सर्वसामान्य मराठी माणसांवरच फोडले गेले. मुळात निकाल लागल्यानंतर चार ते पाच दिवसांनी उद्धव ठाकरे हे प्रसारमाध्यमांना  सामोरे गेले. खऱे तर निकाल लागल्यानंतर लगेचच त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन झाले ते झाले, आमचे कुठे  चुकले त्याचे आत्मपरिक्षण आम्ही करु आणि झालेल्या चुका सुधारु, असे जाहीर वक्तव्य करायला हवे होते. भाजपच्या मुंडे व गडकरी यांनी तसे वक्तव्य केले. निकाल लागल्यानंतर तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर आला नाहीत, तेथेच पहिल्यांदा चुकले. त्यानंतर सामनामध्ये अग्रलेखाद्वारे मराठी माणसांनी पाठीत खंजीर खुपसला असे विधान करून समस्त मराठी माणसांची नाराजी ओढवून घेतली. त्या विधानावर गदारोळ झाल्यानंतही उद्धव ठाकरे यांनी त्याचे समर्थन केले होते. बरे सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणसाला ते विधान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केले असे वाटले. पण शिवसेनाभवनात बाळासाहेब ठाकरे यांनीच त्याचा खुलासा केला आणि मी असे बोललेलोच नाही, असे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे, सामनाचे संपादक संजय राऊत उघडे पडले. 


त्यानंतर मराठीतून शपथ घेण्याच्या मुद्यावरुनही मनसेने बाजी मारली. भर विधानसभेत अबू आझमी याला मनसेच्या आमदारांनी चोपले. तेव्हाही शिवसेनेला नेमकी काय भूमिका घ्यावी ते कळले नाही. मात्र त्यामुळे मनसेची भूमिका पुन्हा एकदा सर्वसामान्य मराठी मनापर्यंत पोहोचली. खरे तर हा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेला उचलून धरायला काहीच हरकत नव्हती. किंवा मनसेने तो लावून धरल्यानंतर किमान मराठीच्या मुद्दयावर तरी त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. विधानसभेत अबूचा चोपले ते बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण मराठीतून शपथ घेणे या मुद्द्यावर तरी शिवसेनेने मनसेला जाहीरपणे समर्थन द्यायला हवे होते.


त्यानंतर सचिन तेंडुलकर याच्या विधानावरुन शिवसेना पुन्हा एकदा गोत्यात आली. मी मराठी असलो तरी पहिल्यांदा भारतीय आहे, असे विधान त्याने केले होते. त्यावर शिवसेनेने सामनामधून सचिनवर दुगाण्या झाडल्या. कदाचित हा मुद्दा मनसेने उचलला तर, या भीतीपोटी आपण पहिल्यांदा प्रतिक्रिया देऊ या, असे वाटून शिवसेनेने जाहीर भाष्य केले आणि देशभरातून तसेच महाराष्ट्रातूनही शिवसेनेवर जोरदार टिका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला अखेर नमते घ्यावे लागले आणि शिवसेनाप्रमुखांनी सचिनला वडिलकीच्या नात्याने हा सल्ला दिला अशी सारवासारव करावी लागली.


आणि आता नुकताच घडलेला आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीवरील हल्ल्याचा प्रकार. मुळात अशा प्रकारे हल्ला करणे आणि त्यानंतर त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे हे चुकीचे आहे. निखिल वागळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून जर काही अपशब्द वापरले असतील तर त्याचा तीव्र निषेध तुम्हाला तुमच्या सामना या मुखपत्रातून करता आला असता. सामना कोणी वाचत नाही , याची तुम्हाला खात्री वाटत होती तर तुमचे या बाबतीतील निवेदन जाहिरातीच्या स्वरुपात सर्वाधिक खप असलेल्या अन्य मराठी वृत्तपत्रातून द्यायला हवे होते. किंवा किमान तुमचा खुलासा व वागळे यांच्या वक्तव्यावर तुमचे म्हणणे आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीला पाठवून द्यायला हवा होता. पोलिसांकडे तक्रार दाखल करायला हवी होती ते करुनही वागळे यांनी दिलगिरी व्यक्त केली नसती तर या वाहिनीच्या कार्यालयासमोर शिवसैनीकांची शांततापूर्ण निदर्शने, काळ्या फिती लावून धरणे आंदोलन किंवा लाक्षणिक उपोषण करता आले असते, प्रेस कौन्सीलकडेही तक्रार करता आली असती.जेव्हा शिवसेनाप्रमुखांनी पत्रकारांना उद्देशून घुबड, कावळे असे अपशब्द वापरले होते, पु. ल. देशपांडे यांचाही अवमानकारक शब्दात अपमान करण्यात आला होता आणि वेळोवेळी शिवसेनेकडून किंवा त्यांच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून इतरांवर अशी जहरी टीका करण्यात आली, तेव्हा संजय राऊत यांची लेखणी आणि तोंड का मूग गिळून बसले होते. म्हणजे आम्ही काहीही लिहू, कोणाच्या विरोधात काहीही बोलू, तुम्ही मात्र आमच्या विरोधात काहीही बोलायचे नाही, ही कोणती पद्धत झाली.


 मात्र  यापैकी कोणताही सनदशीर मार्ग न अवलंबता थेट कार्यालयावर हल्ला चढवणे, कार्यालयाची नासधूस कऱणे, कर्मचाऱयांना मारहाण करणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील राडा संस्कृती संपवली, वेगळ्या वाटेने आणि विचारांने शिवसेनेला नेतृत्व दिले, उद्धव ठाकरे हे कसे सुसंस्कृत आहेत,  म्हणून त्यांचे गोडवे गायले जात होते. मग शिवसेनेला पुन्हा राडा संस्कृतीकडे का वळावेसे वाटले, त्याचे उत्तर संजय राऊत देणार आहेत का, झाल्याप्रकाराबद्दल उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असे अनेक प्रश्न शिवसेना वर्तुळात उपिस्थत केले जात आहेत.


सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे हे सध्या भारताबाहेर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत असा हल्ला करण्याचा निर्णय कोणी घेतला, की त्यालाही उद्धव ठाकरे यांचे समर्थन घेतले होते. झाल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले तोंड उघडलेले नाही. तसेच शिवसनेच्या अन्य नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनीही आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. एकटे संजय राऊत या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. कदाचित त्यांचा भाऊ सुनील या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार असल्याने, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्याला उमेदवारी मिळवून देऊन त्याचा पराभव झाल्यामुळे काहीतरी करुन दाखविण्याच्या हेतूने सुनील राऊत यांनी हे कृत्य केले असावे किंवा तसे करण्यास त्यांना कोणी सल्ला दिला असावा. मात्र प्रत्यक्षात हे शिवसेनेला चांगलेच जड जाणार आहे. कदाचित सख्खा भाऊ यात गुंतल्यामुळे संजय राऊत यांना त्याची पाठराखण करणे भाग पडले असावे, असे वाटते.


एवढे सगळे घडून गेल्यानंतरी आता तरी उद्धव ठाकरे यांनी डोळे उघडावे. आपल्याभोवती जमलेल्या चौकडीकडून आपल्याला जो सल्ला दिला जातो, जी रणनिती आखण्यासाठी सांगितले जाते, ते साफ चुकीचे ठरत आहे. त्यामुळे आपल्याला आणि शिवसेनेनाही त्याचा कोणताच फायदा होत नाही तर उलट तोटाच होतो आहे. हे लक्षात घ्यावे. शिवसेनेतील जुने व ज्येष्ठ नेते आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी आपला संवाद वाढवावा. आपले नेमके कुठे चुकते आहे, ते प्राणाणिकपणे हीच मंडळी त्यांना सांगू शकतील. अजनुही वेळ गेलेली नाही. भोवती जमलेल्या तीन राऊत आणि एक नार्वेकर यांच्या तसेच चुकीचे सल्ले देऊन गोत्यात आणणाऱया खुषमस्कऱयांच्या तावडीतून वेळीच बाहेर पडावे अन्यथा जाग येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल...                             

21 November 2009

बृहन्मंबई महापालिकेत आत्तापर्यंत १२ अमराठी आयुक्त

मनसेने ‘मराठी’चा मुद्दा लावून धरल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डॉ. जयराज फाटक यांच्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मराठी की अमराठी आयुक्ताची नियुक्ती होणार त्याविषयी विविध तर्क सुरु आहेत. त्या पाश्र्वभूमीवर गेल्या ६३ वर्षात बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी १२ अमराठी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.


 याची सुरुवात बी. के. पटेल यांच्यापासून झाली. त्यानंतर अधूनमधून अमराठी अधिकारी आयुक्त म्हणून महापालिकेवर नियुक्त केले गेले. पटेल यांचा कालावधी २१ जानेवारी १९४६ ते २० सप्टेंबर १९५२ असा होता. त्यांच्यानंतर पी. आर. नायक यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. व्ही. एल. गिडवानी यांना अगोदर दीड महिन्याचा आणि नंतर १५ जुलै १९५७ ते २९ एप्रिल १९६० असा कार्यकाळ मिळाला होता.


 २८ फेब्रुवारी १९६२ ते १५ एप्रिल १९६३ अशा काळात ए.यू. शेख हे आयुक्त झाले. ७ मे १९६९ ते २४ मार्च १९७० या कालावधीत जे. बी. डिसोझा हे आयुक्त होते. १९७५ ते १९८४ या कालावधीत भालचंद्र देशमुख, बी. के. चौगुले आणि द.म. सुखटणकर असे मराठी आयुक्त झाले. १२ नोव्हेंबर १९८४ ते २४ जुलै १९८६ अशी दोन वर्षे पुन्हा जे. के. कांगा हे अमराठी आयुक्त होऊन गेले.


त्यांच्यानंतर २४ जुलै १९८६ ते ३० एप्रिल १९९० या काळात सदाशिवराव तिनईकर हे आयुक्त झाले. तिनईकर यांच्यानंतर पुन्हा एकदा के. पद्मनाभय्या यांच्या रुपाने महापालिकेला अमराठी आयुक्त मिळाला. पद्मनाभय्या यांच्यानंतर शरद काळे (१६ नोव्हेंबर १९९१ ते १७ मे १९९५), जर्नादन जाधव (१७ मे १९९५ ते १० जून १९९६) आणि गिरीश गोखले (१० जून १९९६ ते ३१ मे १९९९) असे तीन मराठी आयुक्त झाले. यांच्यानंतर लागोपाठ पाच वर्षे पुन्हा महापालिकेला अमराठी आयुक्त मिळाले.


 के. नलीनाक्षन, व्ही. रंगनाथन, रामानंद तिवारी, करुण श्रीवास्तव व जॉनी जोसेफ या अमराठी अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. के. नलीनाक्षन यांची १ जून १९९९ रोजी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. तर जॉनी जोसेफ हे १ मार्च २००४ ते १ मे २००७ या कालावधीत आयुक्त होते. जोसेफ यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉ. जयराज फाटक यांच्या रुपाने महापालिकेला मराठी आयुक्त मिळाला. डॉ. फाटक यांच्या बदलीनंतर आता पुन्हा एकदा या पदावर कोणाची नियुक्ती होणार त्याची चर्चा सुरु झाली आहे.

20 November 2009

जाणीव

मनाला भिडणारे लेखन आपल्या वाचनात येते. मग ते कधी एखाद्या पुस्तकातील, कादंबरीतील, मासिकातील कथा, कविता किंवा वृत्तपत्रातील लेखामधील असते. काही वेळेस असेही होते की कुठेतरी आपण एखादा चांगला उतारा, कविता वाचतो, पण ते लिहिणाऱयाचे नाव त्या खाली दिलेले नसते.

मात्र त्यातील आशय, शब्द आपल्या मनाला भावतात. मनात कुठेतरी घर करतात. असाच वाचनात आलेला  एक परिच्छेद किंवा मुक्तछंदातील काव्य नुकतेच वाचनात आले. ते कोणाचे आहे, कोणी लिहिले आहे किंवा ते एखाद्या पुस्तकातील आहे का ते माहिती नाही.

 सध्याच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीचे समर्पक वर्णन त्यात केले आहे. जीवघेणी स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण कशाकशाला मुकलो आहोत, ते यात सांगितले आहे. तोच परिच्छेद सर्वांच्या माहितीसाठी. या मजकुराला जाणीव   असे नाव देण्यात आले होते.

जाणीव

दिवाणखान्यात टी.व्ही आल्याने बोलणे विसरलो आहे

घरात गाडी आल्यापासून चालणे विसरलो आहे

खिशात कॅल्कुलेटर आल्यापासून पाढे विसरलो आहे

ऑफीसमध्ये एसीत बसून झाडाखालचा गारवा विसरलो आहे

रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलो आहे

मनालाच इतके कष्ट होतात की शरीराचे कष्ट विसरलो आहे

कचकड्यांची नाती जपतांना प्रेम करायला विसरलो आहे

बॅंकांमधली खाती सांभाळतांना पैशांची किंमत विसरलो आहे

उत्तेजक चित्रांच्या बरबटीमुळे सौदर्य पाहणे विसरलो आहे

कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे

फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीची ढेकर विसरलो आहे

पॉप व रॉपच्या दणदणाटात संगीत समाधी विसरलो आहे

क्षणभंगूर मृगजळाच्या मागे धावतांना सत्कर्माला विसरलो आहे

माझीच तुंबडी भरतांना दुसऱयाचा विचार करणं विसरलो आहे

धावत धावत असतांना क्षणभर थांबणंही विसरलो आहो

जागेपणीचं सुख जाऊच द्या सुखाची झोपही विसरलो आहे

कृत्रिम व खोट्या विनोदामुळे  खळखळून हसणं विसरलो आहे

आणि हसणं विसरल्याने जीवन जगणेच विसरलो आहे


खूप छान आणि मनाला भावणारे असे हे शब्द आहेत. हे ज्या लिहिले असतील, त्यांचे अभिनंदन. 

19 November 2009

शिवप्रताप दिन

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या प्रतापगड येथे झालेल्या भेटीच्या वेळेस अफजलखान याने दगाफटका करुन शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. महाराष्ट्रावर चालून आलेल्या अफजलखानरुपी राक्षसाचा शिवाजी महाराजांनी वध केला. हा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. इंग्रजी कालगणनेनुसार येत्या २४ नोव्हेंबर रोजी हा दिवस येत असून यंदाच्या वर्षी या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वाई येथील प्रतापगड उत्सव समितीने वाई येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.



प्रतापगडाच्या युद्धात शिवाजी महाराज यांनी विजय संपादन करुन आणि अफजलखानाचा वध करुन बलाढ्य शत्रूला नेस्तनाबूत करण्याचा इतिहास घडवला. शिवाजी महाराज यांचे हे धाडस, चातुर्य, राजकारण, त्यांच्या मावळ्यांची कामगिरी हा सर्व इतिहास प्रत्येकालाच अभिमान वाटावा असा व प्रेरणादायी आहे. या दिवसाची आठवण म्हणून प्रतापगड उत्सव समितीने पंधरा वर्षांपूर्वी प्रतापगडाच्या परिसरात हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. अफजलखान वधाच्या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे समितीने ठरवले आहे.


शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या प्रतापगडाच्या युद्धाचा दाखला जागतिक युद्धशास्त्रातही अभ्यासासाठी देण्यात येतो. आपण मात्र पाहिजे तितके या प्रकरणाकडे पाहात नाही. अफजलखान वध ही ऐतिहासिक सत्य घटना असली तरी त्याचा देखावा लावण्यास परवानगी न मिळणे, पाठ्यपुस्तकातून हा धडा किंवा चित्र वगळणे असे दुर्दैवी प्रकार आपल्याकडे मुस्लिमांच्या लांगुनचालनासाठी केले जात असतात.


प्रतापगड उत्सव समितीने या विषयावर व्यापक जनजागृती करण्याचे ठरवले आहे. सध्या आपल्या देशात दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांनी थैमान घातले आहे. या परिस्थितीत संपूर्ण देशाला आणि प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकामध्ये लढाऊ वृत्ती निर्माण होण्याची गरज आहे. अफजलखानाच्या रुपाने शिलाजी महाराज यांनी महाराष्ट्रावर चाल करुन आलेल्या दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला केला होता. त्यामुळे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अफजलखान वधाचा हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे समितीचे म्हणणे आहे.


हा शिवप्रताप दिन केवळ महाराष्ट्रातच साजरा न होता तो संपूर्ण देशभरात साजरा झाला पाहिजे. या घटनेकडे जातीय किंवा धार्मिक दृष्टीकोनातून न पाहता राष्ट्रहिताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. प्रतापगड उत्सव समितीतर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी वाई येथे शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम होणार आहे. या वेळी कर्नल संभाजी पाटील यांना वीरजीवा महाले तर शिवभक्त हरिदास पडळकर यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


२४ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी काही ना काही कार्यक्रम आयोजित केला जावा, असे आवाहनही या समितीने केले आहे.

प्रतापगड उत्सव समितीचे पदाधिकारी असे

विजयाताई भोसले-निमंत्रक, संजय भोसले-अध्यक्ष, मिलिंद एकबोटे- कार्याध्यक्ष, विनायक सणस-उपाध्यक्ष

अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी

मिलिंद एकबोटे-९४२३५७२३८०

अन्य क्रमांक-९८८१७३४२०३/९७६७७५५९९२/९९२२३४१३२२

18 November 2009

मुजोर रिक्षाचालक, ढिम्म लोकप्रतिनिधी आणि हतबल प्रवासी

डोंबिवली-कल्याणमध्ये ऑटोरिक्षांसाठी मीटर पद्धत लागू करण्यासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आरटीओ अधिकाऱ्यांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याऐवजी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ असे सांगत स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेतली. डोंबिवलीत सर्व आलबेल असल्याचा जावईशोध लावत ‘डोंबिवली पॅटर्न’ची सर्वत्र अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मतही या बैठकीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मात्र ‘डोंबिवली पॅटर्न’ म्हणजे मुजोर रिक्षाचालकांनी मनाला येईल तसे भाडे सांगणे आणि ते प्रवाशांनी निमूटपणे देणे, असाच असल्याचे चित्र डोंबिवलीकरांना सध्या अनुभवास येत आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनाही याच ‘डोंबिवली पॅटर्न’ची अपेक्षा आहे काय, असा सवाल डोंबिवलीकर प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारामुळे मुजोर रिक्षाचालक, ढिम्म लोकप्रतिनिधी आणि हतबल प्रवासी असे चित्र निर्माण झाले आहे.ऑगस्ट महिन्यापासून हा विषय प्रवासी संघटनांनी लावून धरला आहे. १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी जाहीरपणे सांगितले होते. डोंबिवतीत रिक्षाचालकांना गुलाबाचे फूल देऊन त्याची सुरुवात करण्याची गांधीगिरीही करण्यात आली. प्रवाशांनी मीटरप्रमाणे जायची इच्छा व्यक्त केली तर रिक्षाचालकांनी मीटर टाकणे आवश्यक आहे. ज्याला शेअर पद्धतीने जायचे आहे, त्यांना त्याप्रमाणे नेण्यात यावे, डोंबिवलीत या दोन्ही पद्धती सुरू राहतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही रिक्षाचालकांनी मीटर पद्धतीलाच ठाम विरोध केल्याने मीटरसक्ती झालीच नाही. त्यानंतर गणपती, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अशी फुटकळ कारणे देत वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी यांनी रिक्षाचालकांच्या नेत्यांपुढे नांगी टाकल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही डोंबिवलीत प्रवाशांना मीटर पद्धतीने जाता येत नाही. एखाद्या प्रवाशाने तशी इच्छा व्यक्त केली तर त्याला मुजोर रिक्षाचालक नकार देतात. त्यामुळे रिक्षाचालक म्हणतील आणि मागतील तेवढे पैसे त्यांना द्यावेच लागतात. ज्या ठिकाणी जाण्यासाठी मीटर टाकले तर किमान १२ ते १५ रुपये भाडे होईल, तेथे प्रवाशांना रिक्षाचालक म्हणतील तितके पैसे द्यावे लागत आहेत. मध्यंतरी आरटीओ, प्रवासी संघटना यांनी डोंबिवली-कल्याणमध्ये पाहणी करून ठराविक ठिकाणे व स्टॅण्डपासून तेथे जायचे दरपत्रक नक्की केले होते. त्याचे फलक सर्व रिक्षातळांवर लवकरच लावण्यात येतील, असे गणेशोत्सवाच्या काळात सांगण्यात आले होते. गणपती झाले, दिवाळीही गेली तरी ते फलक लावण्यास आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. जवळच्या अंतरावर जायचे असले तरी डोंबिवलीतील रिक्षाचालक १२ रुपये इतके किमान भाडे घेतात. ठाणे किंवा अन्यत्र हेच भाडे ९ रुपये इतके आहे. लांबच्या ठिकाणी जायचे असेल तर रिक्षाचालक जेवढे पैसे मागतील तेवढे दिले तरच तुम्हाला रिक्षात बसण्याची परवानगी असते. याचा फायदा रिक्षाचालकांनाच होतो. पूर्वेकडून पश्चिमेला किंवा पश्चिमेकडून पूर्वेला जायचे असेल तर उड्डाणपूल पार करावा लागतो, हे कारण देत रिक्षाचालक प्रवाशांकडून किमान २५ ते कमाल ४० ते ४५ रुपयांपर्यत भाडे मागतात. मीटर टाकले तर हीच रक्कम अवघी पंधरा ते वीस रुपये किंवा त्यापेक्षाही कमी होऊ शकते. सकाळी आणि रात्रीच्या वेळी काही रिक्षाचालक एकेका रिक्षात चार ते सहा प्रवाशांना घेऊन एका फेरीत (सहा रुपये एका प्रवाशाचे) ३० ते ३६ रुपयांचा गल्ला जमवत असतात. त्यामुळे अशा रिक्षाचालकांचा मीटर पद्धतीला विरोध असणे स्वाभाविकच आहे. वाहतूक पोलिसांची पाठ वळली की डोंबिवलीच्या पश्चिम भागात पं. दीनदयाळ मार्ग चौक, विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोरील रस्ता, कल्याण दिशेकडे उतरणारा पादचारी पूल आदी ठिकाणी काही मुजोर व बेशिस्त रिक्षाचालक वाटेल तशा रिक्षा उभ्या करुन उभे असतात. त्यामुळे सुभाष रस्ता, महात्मा फुले मार्ग येथून दिनदयाळ मार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना या अडथळ्यातून वाहने नेण्याचे दिव्य पार - पाडावे लागते. जाणारे आणि येणारे नागरिक आणि पश्चिमेला लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास होतो. एखाद्या रिक्षाचालकाला सांगितले तर त्यांच्याकडून प्रवाशालाच दमदाटी करण्यात येते. खरे तर येथून हाकेच्या अंतरावर विष्णूनगर पोलीस ठाणे आहे. मात्र त्याचा वचक मुजोर रिक्षाचालकांना नाही. डोंबिवलीतील रिक्षाचालक-मालक संघटनांचे नेते महापालिकेत नगरसेवक आहेत. त्यामुळे ते नेहमीच प्रवाशांच्या ऐवजी मूठभर रिक्षाचालकांची बाजू घेत असतात. डोंबिवलीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण हे टोलमुक्तीसाठी उपोषणास बसतात, मात्र डोंबिवलीकर प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या ठरलेल्या या विषयावर अद्याप तोंड उघडावेसे त्यांना वाटलेले नाही. त्यांना फक्त मोटारवाल्यांचीच काळजी वाटते का असा सवाल जनता करीत आहे. रिक्षा मीटरच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधींची उदासीनता शिवसेनेचे अनेक नेते रिक्षा युनियनचे नेते आहेत. यामध्ये पुंडलिक म्हात्रे, प्रल्हाद जाधव, नगरसेवक प्रकाश पेणकर यांचा समावेश आहे. पेणकर यांची अनुपस्थिती नुकत्याच झालेल्या बैठकीत तीव्रतेने जाणवत होती. मनसे नेत्यांच्या रिक्षा युनियन नसल्या तरी त्यांचे नेते मात्र ऐन गर्दीच्या वेळेत डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर वाहतूक कोंडी होईल अशा ठिकाणी आपली वाहने उभी करून ठेवतात. नित्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. या नेत्यांनीही रिक्षा मीटर पध्दत होण्यासाठी पुढाकार घ्यावा. केवळ राज ठाकरे यांचे विचार फलकावर लावून जनतेला ऐकवले म्हणजे समाजसेवा होत नाही. यासाठी मनसेने पत्रकबाजी, फलकबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी, अशा नागरिकांच्या अपेक्षा आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसेल तर मीटर पध्दत पुढील १०० वर्षे शहरात अमलात येणार नाही. कारण रिक्षा युनियनचे नेते आणि आरटीओ अधिकारी यांच्यामध्ये घरोब्याचे संबंध असतात. या संबंधांनीच मीटर पध्दतीचा घात केला आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मीटर पद्धतीला आमचा विरोध नाही, ती झाली पाहिजे असे सांगत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपली सुटका करून घेतात. पण मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाहीत किंवा प्रत्यक्ष कोणती कृतीही करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. राज्याचे परिवहनमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. आता किमान त्यांनी तरी या प्रश्नात लक्ष घालावे किंवा राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रमुखांनी डोंबिवलीतील आपापल्या पक्षांच्या पुढाऱ्यांना या प्रश्नात प्रवाशांची बाजू घेऊन लक्ष घालण्यास सांगावे, अशी माफक अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महत्वाचे- हा प्रश्न फक्त डोंबिवली-कल्याणपुरताच मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या अनेक भागातील प्रवाशांना याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

17 November 2009

गोमूत्र एक वरदान

डोंबिवलीतील माझे परिचित दीपक केसकर यांच्याकडून मला नुकताच गो विज्ञान संशोधन संस्था-पुणे व पुरुषार्थ मासिक यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेला गोवंश एक शाश्वत वरदान हा अंक वाचायला मिळाला. या अंकात गोवंश संवर्धन व संरक्षण या विषयाबरोबरच गाईचे दूध, तूप, दही, शेण आणि गोमूत्र याविषयी सविस्तर माहिती देणारे विविध लेख, चौकटी देण्यात आल्या आहेत. या विषयाची आवड असणाऱयांनी आणि नसणाऱयांनीही एक नवीन विषय म्हणून हा अंक वाचायला हवा. हा अंक वाचून गोमूत्राचा तसेच त्यापासून तयार केलेल्या विविध औषधांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करुन घेता येईल, त्याचे मार्गदर्शन या अंकात आहे. शंभर वर्षांपूर्वी चौंडे महाराज यांनी वाई मुक्कामी कसायाच्या तावडीतून गाई सोडवल्या. गोमांस निर्यात करुन चार पैसे कनवटीला लावता यावेत म्हणून ब्रिटिशांनी गोहत्येस प्रोत्साहन दिले. चौंडे महाराज यांनी कसायाच्या तावडीतून गाईंना वाचवले त्या घटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. चौंडे महाराज यांनी पुढे आपले सर्व आयुष्य गोरक्षण व संवर्धन या विषयाला वाहून घेतले. अनेक ठिकाणी गोसेवा संघ स्थापन होत आहेत. मात्र संपूर्ण भारतात गोवंशहत्या बंदी व्हावी आणि आपल्या कृषीवर आधारित अर्थव्यवस्थेला सुनिश्चित गती प्राप्त व्हावी त्या दृष्टीने आधुनिक वैज्ञानिक शास्त्र वापरून गोवंशाचा अधिकाधिक चांगला उपयोग करता यावा, म्हणून बरेच काही करावयाचे आहे. त्याची जागृती व्हावी म्हणून हा विशेषांक प्रकाशित करण्यात आल्याचे अंकाच्या संपादकीयात म्हटले आहे. अंकात हिंदी आणि मराठीतील या विषयाशी संबंधित विविध लेख आहेत. तसेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गोसेवा, संशोधन करणाऱया काही संस्थांची माहिती, गोमूत्र व त्याचे उपयोग, पंचगव्य, गोमूत्राचा वापर करुन केलेली शेती आणि अन्य संग्राह्य माहिती आहे. मुख्य म्हणजे चौंडे महाराज यांचा परिचय व त्यांच्या कार्याची ओळखही अंकात काही लेखांद्वारे करुन देण्यात आली आहे. प्रभाकर पुजारी यांनी वेदातील गोसूत्रे सांगितली आहेत. डॉ. म. रु. पाचेगावकर यांनी गोपालन भारतीय संकल्पना-सद्यस्थिती आणि आव्हाने याविषयी सखोल विवेचन केले आहे. भारतात आढळणाऱया विविध जातींच्या गाईंची माहिती त्यांच्या छायाचित्रांसह देण्यात आली आहे. डॉ. केशव चौंडे यांनी जीवनदायिनी गोमाता या लेखात गाईचे दूध, तूप, दही, गोमूत्र यांची माहिती व औषधी उपयोग सांगितले आहेत. डॉ. स्मीता बोरा यांनी आयुर्वेदीय दृष्टीकोनातून गोविज्ञान सांगितले आहे. गोमूत्राचे रासायनिक पृथ्थकरण केले असता त्यात आढळणारी बावीस विविध रासायनिक द्रव्ये आणि रोग बरा होण्यासाठी होणारा त्याचा उपयोग, गोमूत्रामुळे बरे होणारे रोग याचीही माहिती आहे. आयुर्वेदातील गोमूत्र व गोमय यांचे महत्व वैद्य अजित जोशी यांनी तर गाईच्या शेणाचे औषधातील उपयोग या विषयी वैद्य सुविनय दामले यांनी माहिती दिली आहे. गोसेंद्रीय शेती, गोमूत्र शेतीला वरदान, गोसेंद्रीय शेतीचे शेतकऱयांचे अनुभवही अंकात आहेत. अकोला, नागपूर, मुंबईतील भाईंदर तसेच अन्य ठिकाणी असलेल्या गोसेवा संशोधन संस्था, या संस्थेकडून गोमूत्रापासून तयार केली जाणारी विविध औषधे यांचीही माहिती आहे. गोमूत्र उपचार पद्धतीकडे आता लोक वळायला लागले आहेत. या उपचार पद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार झाला पाहिजे. अधिक माहितीसाठी इच्छुकांना गोविज्ञान संशोधन संस्था, ७५९/३२, गोपिकाश्रम, डेक्कन जिमखाना, पुणे-४ या पत्यावर किंवा ०२०-२५६७२७८५ तसेच ०२०-२४४५११४३ (वितरण) येथे दुपारी ४ ते ८ या वेळेत संपर्क साधता येईल. गोमूत्रापासून औषधे तयार करणाऱया अन्य काही संस्था अशा आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प, माधवनगर, म्हैसपूर फाटा, वाशीम रोड, अकोला दूरध्वनी ०७२४-२२४६८३५. गोसेवा परिषद, केशवसृष्टी गोशाला, उत्तन, भाईंदर (पश्चिम), ०२२-२८४५१०३१/२३०९४३०६

16 November 2009

हे जीवन सुंदर आहे

येणारा आत्ताचा क्षण हा आपला असतो, उद्याचा तर जाऊ दे पुढचा क्षणही आपला असेल की नाही, ते आपल्याला सांगता येत नाही. आपले मानवी जीवन हे असेच क्षणभंगूर आहे. मात्र पुढचा किंवा उद्याचा क्षण कसा असेल, त्याची काळजी करत बसण्यापेक्षा हातात असलेला प्रत्येक क्षण सार्थकी कसा लागेल, त्या क्षणी आपल्याला आणि दुसऱयानाही आपल्याला फक्त आनंद आणि आनंदच कसा देता येईल, याचा विचार केला तर हे जीवन सुंदर आहे, असे आपल्या लक्षात येईल. काहीही आजार नसलेला आणि धडधाकट असलेला माणूस अचानक आपल्यातून निघून जातो आणि आजारपणामुळे वर्षानुवर्षे/महिनोंमहिने अंथरुणाला खिळून असलेला कोणी जाऊ म्हटले तरी जात नाही. खरेच देवाची आणि दैवाची लिला आपल्याला कळत नाही हेच खरे. म्हणतात ना देवाचे/यमाचे बोलावणे आले की आपल्याला जावेच लागते. एखाद्याने देवा मला ने रे असे म्हटले तरी तो नेत नाही किंवा एखाद्याने मला नेऊ नको असे म्हटले तरी तो थांबत नाही. सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरुप घरी येईल की नाही, त्याचीही सध्याच्या काळात शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे आपला माणूस सुखरुप घरी येईपर्यंत घरच्यांच्या मनाला चैन पडत नाही. कधी कोणी मृत्यूचे बोलावणे आल्यासारखा त्याच्याबरोबर जातो तर कोणी त्याचे बोलावणे आलेले असूनही नशिबामुळे, देव, दैव आणि पूर्वपुण्याईमुळे वाचतो. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका दुखद घटनेची बातमी सर्वच वृत्तपत्रातून आली होती. लिफ्टमधून जाताना सहा अग्निशमन दलाच्या जवांनाना आतमध्ये गुदमरुन प्राणाला मुकावे लागले होते. त्यांच्याबरोबरच लिफ्टमध्ये पाऊल टाकलेली एक महिला पोलीस अधिकारी ऐनक्षणी नंतर जाऊ म्हणून लिफ्ट बाहेर पडली आणि ती वाचली. याला काय म्हणायचे. अनेकदा अपघात किंवा अन्य दुर्घटनांमध्ये लहान बालके, तान्ही मुले आश्चर्यकारकपणे वाचतात तर काही जण मृत्यूमुखी पडतात. एखादा तरुण ज्याने आपल्या भावी आयुष्याची काही स्वप्ने रंगवलेली असतात तो अचानक जातो तर कोणाच्या जीवनाची नुकतीच सुरुवात झालेली असतानाच म्हणजे लहान वयातच त्यांना मृत्यू गाठतो. अनेक मृत्यू/अपघात हे कुलदेवतेच्या दर्शनाला किंवा देवाच्या दर्शनाला जाताना/परतताना झाले असल्याचे वाचायला किंवा ऐकायला मिळते. काही वेळेस रेल्वे, बस किंवा विमानाच्या भयानक अपघातात अनेकांचा एकाच वेळी मृत्यू होतो. त्या सगळ्यांचे मरण एकाच वेळी लिहिलेले असते का, अर्थात यातूनही काही वाचतात, पण अपघातात आलेल्या अपंगत्वामुळे अरे त्यापेक्षा आपण सुटलो असतो तर बरे झाले असते, असे विचार त्यांच्या मनात येऊन जातात. काही खरोखरच भाग्यवान ठरतात, जीवघेण्या अपघातात त्यांना केवळ खरचटण्यापलीकडे किंवा थोडेसे लागण्याखेरीज काही होत नाही. त्यांचे गंडांतर टळलेले असते. किंवा त्यांचा मृत्यूयोग तेव्हा नसतो, असेच म्हणावे लागते. या सगळ्याचा विचार केला की आपलेच डोके भणभणायला लागते. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानात माणसाने केलेली प्रगती, विविध शोध, औषधे, वैद्यकीय सोयी-सुविधा, अत्याधुनिक उपकरणे यामुळे सुसह्य झालेल्या जीवनामुळे आपण निसर्गावर विजय मिळवला, त्याच्यावर मात केली अशा थाटात वावरत असतो. पण आत्ताचा आणि येणारा पुढचा क्षण आपला आहे की नाही या बाबतीत मात्र आपल्याला काही कळत नाही. मात्र पुढचा क्षण कसा असेल त्याची काळजी करत बसण्यापेक्षा आत्ताचा क्षण आपण आनंदाने जगू या, दुसऱयाला मदत करु या, आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य घडणार नाही, त्याची खबरदारी घेऊ या आणि आपल्या कृतीने समोरच्या व्यक्तीच्या जीवनात आनंद फुलवू या असे प्रत्येकाने ठरवले तर क्षणभंगूर असेलेले आपले मानवी जीवन सार्थकी लागेल...

15 November 2009

नवा भस्मासूर

महाराष्ट्रात इतकी वर्षे राहून मला मराठी येत नाही असे निर्लज्जपणे सांगत आणि राज्य घटनेचा आधार घेत अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतली. सोयीचे असेल केव्हा भारतीय राज्य घटनेचा आधार आणि सोयीचे नसेल तेव्हा ती धाब्यावर बसवण्याचा हा प्रकार आहे. अबू आझमी यांने केलेल्या या कृत्यामुळे समाजवादी पक्षाला आनंदाच्या उकळ्या फूटत असून अबूला आता त्याचा जाहीर सत्कार करुन त्याला पद्धतशीर हिरो बनवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र यातून नवा भस्मासूर निर्माण होणार आहे, असे मला वाटते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवाले यांच्या रुपाने असाच भस्मासूर निर्माण केला होता मात्र शेवटी त्यानेच त्यांचा बळी घेतला, हा इतिहास विसरुन चालणार नाही. अखंड भारताची फाळणी होऊन केवळ धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झाले. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर या देशात बहुसंख्य हिंदू नागरिक राहिले. त्यामुळे जर धर्माच्या नावावर पाकिस्तान निर्माण झाले तर भारताला हिंदुस्थान या नावाने ओळखायला आणि तेव्हाच्या राज्यकर्त्यांनीही तसे नामकरण करायला काहीही हरकत नव्हती. परंतु मुस्लिमांचे तुष्टीकरण हाच एककलमी कार्यक्रम असल्यानुसार कॉंग्रेसने आपल्या देशाला सर्वधर्मसमभाव असलेला किंवा धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यास सुरुवात केली. आज इतक्या वर्षानंतर काय दिसते, आपण खरोखरच धर्मनिरपेक्ष आहोत का, भारतात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्याऐवजी अल्पसंख्यांक म्हणून मुस्लिमांचे लाड का केले जातात, खुद्द पाकिस्तानातही अल्पसंख्य असलेल्या हिंदुना भारतातील मुस्लिमांसारखे स्थान आहे का, भारतात मुस्लिमाना शासन दरबारी जितकी मानाची पदे मिळाली तितकी ती पाकिस्तानातील हिंदुना मिळाली का, भारतात धर्माच्या आणि अन्य बाबतीत मुस्लिमाना जितक्या सलवती मिळतात, तितक्या त्या जगातील अन्य मुस्लिम राष्ट्रांमध्ये राहणाऱया मुसलमानांना तरी मिळतात का, खुद्द पाकिस्तानातील मुसलमान किंवा अल्पसंख्य असलेल्या हिंदूना मिळतात का, याची उत्तर नाही अशीच आहेत. आजच बहुतेक मराठी दैनिकात समाजवादी पक्षासंदर्भातील एक बातमी वाचनात आली. हिंदीतून शपथ घेण्याच्या हट्टामुळे अबू आझमी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यामुळे झाल्या प्रकाराचा फायदा उठविण्यासाठी समाजवादी पक्षातर्फे आता अबू आझमी यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. हा सर्व प्रकार म्हणजे केवळ मुस्लिम तुष्टीकरणासाठी कॉंग्रेस आणि सपा यांच्यात चाललेली स्पर्धा आहे, असे मला वाटते. आजवर कॉंग्रेस पक्ष म्हणजे मुस्लिमांचा कैवारी अशी प्रतिमा होती. मात्र गेल्या काही वर्षात समाजवादी पक्षाने आपली प्रतिमाही (ज्या पक्षाचा अध्यक्ष एक हिंदू आहे ) मुस्लिमांचा पक्ष म्हणून निर्माण केली आहे. कॉंग्रेसने आजवर मुस्लिमांच्या मतपेढीवर डोळा ठेवून, स्वतला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत कायम धर्माधिष्ठीत राजकारण केले. त्यासाठी देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या भावनांना नेहमीच पायदळी तुडवले. मुस्लिम आक्रमकाच्या नावाने ओळखली जाणारी आणि गेल्या कित्येक वर्षात ज्या मशिदीत नमाजही पढला जात नव्हता ती बाबरी मशिद पाडली गेली म्हणून मुस्लिमांच्या बरोबरीने याच कॉंग्रेसी मंडळीनी आपले उर बुडवून घेतले होते. देशातील कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा अशी होती की या ठिकाणी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला. काळाच्या ओघात बाबराकडून तेथील मंदिर उध्वस्त करून तेथे मशिद बांधण्यात आली. त्यामुळे हे स्थान हिंदूना देण्यात यावे, अशी समस्त हिंदूंची भावना होती. त्यामुळे कॉग्रेस शासनाने ठणकावून हा वाद तेव्हाच का नाही सोडवला. पण आपण तसे केले तर आपली प्रतिमा हिंदुचे कैवारी अशी होईल, मग मुस्लिम मतपेढी नाराज झाली तर काय, वंदे मातरम हे राष्टीय गीत म्हणण्यास नकार देणाऱया इमाम आणि मौलवीनाही साधी अटक करुन गुन्हा दाखल करण्याची धमक कॉंग्रेसचे नेते दाखवू शकलेले नाहीत. आता कॉंग्रेसच्या बरोबरीने समाजवादी पक्ष मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहे. अबू आझमीला महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात जी मारहाण झाली, त्याचे भांडवल करुन अबू आझमी याला मुस्लिमांचा नेता म्हणून पुढे आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. मात्र असे करणे म्हणजे नवा भस्मासूर निर्माण करण्यासारखे आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच खलिस्तान समर्थक भिंद्रनवाले याचा भस्मासूर तयार केला आणि शेवटी त्याच भस्मासुरामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे समाजवादी पक्षाने अबू आझमी याला प्रोत्साहन देऊन नाहक हिरो करु नये. मुस्लिमांचा नेता म्हणून त्याला पुढे आणणे हे समाजवादी पक्ष आणि या देशासाठीही घातक ठरू शकते. वेळीच सावध व्हावे...

14 November 2009

डाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi

मुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदणे, बोअरवेल किंवा रिंगवेल खणणे हे पर्याय असले तरी त्यामुळे पाणी लागेल की नाही आणि लागले तर ते गोडे असेल का, याची खात्री नसते. त्यामुळे जमिनीखालील गोडय़ा पाण्याचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासन डाऊझिंग तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार करत आहे.

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हल्ली सर्रास बोअरवेल किंवा रिंगवेलला प्राधान्य दिले जाते. बोअरवेल खणताना जमिनीत सुमारे सत्तर ते ऐशी फूट खोल जावे लागते. इतके खोल गेल्यानंतरही पाणी लागेल की नाही आणि लागले तर ते गोडे असेलच याची खात्री नसते. त्यामुळे जमिनीखाली नेमके कुठे पाणी लागेल, याचा शोध ज्या प्रक्रियेमार्फत घेतला जातो त्याला डाऊझिंग असे म्हणतात.

विशिष्ट झाडाची वाय आकाराची फांदी किंवा धातुची काटकोनातील काठी घेऊन जमिनीखालील पाण्याचा शोध घेण्यात येतो. खेडेगावात अशा पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोध घेणाऱ्या माणसांना ‘पाणाडे’ असे म्हटले जाते. राज्याच्या अनेक भागात अशा प्रकारे पाण्याचा शोध या माणसांकडून घेण्यात येतो.दरम्यान पश्चिम उपनगरातील काही सहकारी गृहनिर्माण संस्थांनी डाऊझिंगच्या मदतीने बोअरवेल/रिंगवेल खणून घेतल्या असून त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

तांबे किंवा अन्य धातूची काठी काटकोनात धरुन डाऊझिंग तज्ज्ञ जमिनीवर पुढे पुढे चालत राहतो. ज्या ठिकाणी हमखास पाणी लागण्याची शक्यता असेल तेथे ती काठी जमिनीच्या दिशेने झुकते. हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या पद्धतीचा वापर केला होता, अशी माहिती महापालिकेचे उपप्रमुख अभियंता (जल बांधकाम) मुकुंद पाठक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

विहिर खणल्यानंतर त्याला पाणी लागणे किंवा न लागणे हे माणसाच्या नव्हे तर निसर्गाच्या हातात. आहे. जमिनीखाली न खोदता जर अगोदरच पाणी लागेल की नाही, ते गोडे असेल का हे कळले तर विहिर खणून पाणी लागले नाही किंवा खारे पाणी लागले तर होणारा खर्च वाया जाणार नाही आणि हेच या पद्धतीने शोधून काढता येते, असे डाऊझिंग पद्धतीचे अभ्यासक आणि पाणीसमस्येवर मात करण्यासाठी विविध प्रयोग करणारे तज्ज्ञ गोविंद पंडीत व अजय काळे यांनी सांगितले. जमीन न खणता या पद्धतीने काढलेले निष्कर्ष ९० टक्के बरोबर येतात, असा दावाही पंडीत यांनी केला.

13 November 2009

२९ वर्षात झाली ५१ वादळे

लैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना या नावाने ओळखण्यात येणार आहे. भारतासह बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड इत्यादी देशांनी समुद्री वादळांची ही संभाव्य नावे तयार केली आहेत. मुंबईला धडक देण्याची शक्यता असलेल्या चक्रीवादळाचे ‘फयान’ हे नाव म्यानमार या देशाने दिलेले होते. अशा साठहून अधिक नावांची यादी तयार करण्यात आली आहे. भारताच्या विविध राज्यांना तडाखा देणारी ही वादळे नेहमीच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होत असतात. ‘फयान’च्या पूर्वी आत्तापर्यंत १९७० ते १९९९ या कालावधीत दोन्ही महासागरात ५१ चक्रीवादळे येऊन गेली आहेत. बंगालच्या उपसागरात सगळ्यात पहिले चक्रीवादळ ७ ते १४ जुलै १९७१ या काळात तयार झाले होते. ओरिसाचा दक्षिण किनारा व आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनाऱ्यावर तयार झालेले हे वादळ पुढे दिल्लीपर्यंत सरकले होते. याचा फटका ओरीसामधील पुरी, कटक इत्यादी ठिकाणी बसला होता. पुढे त्याच वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीतही चक्रीवादळाचा फटका भारताला बसला होता. १९७२ मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत चक्रीवादळे तयार झाली असल्याची माहिती मिळते. १९७० ते १९९९ या कालावधीत बंगालच्या उपसागरात प्रश्नमुख्याने सप्टेंबर ते डिसेंबर या काळात तयार झाली होती. तर १९७९ मध्ये १० ते १३ मे या कालावधीतही आंध्र प्रदेश जवळ वादळ तयार झाले होते. अरबी समुद्रात १९९९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत ११ चक्रीवादळे तयार झाली आहेत. त्याची सुरुवात १९७५ मध्ये झाली. १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत या वादळाचा फटका सौराष्ट्र, जामनगर, राजकोट इत्यादी ठिकाणांना बसला. अरबी समुद्रात तयार झालेली ही वादळे मे, जून, ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीतील आहेत. या वादळांचा फटका प्रामुख्याने गुजरात राज्यालाच बसला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळांचा भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला मोठा तडाखा बसला आहे. दरम्यान बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या या वादळांना नाव देण्याचा ठराव २००० मध्ये मंजूर करण्यात आला. मस्कत येथे झालेल्या बैठकीस बांगलादेश, भारत, मालदिव, म्याननार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड इत्यादी देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक देशाने सुचवलेले नाव अक्षर वर्णमालेनुसार लिहिण्यात आले आहे. सध्या ६० हून अधिक नावांची यादी तयार करण्यात आली असून आगामी काळात येणाऱ्या वादळाचे नाव ‘वरद/वरध’ असे ठेवण्यात आले आहे. जगभरातील सात ‘रिजनल स्पेशलइज्ड मिटिओरोलॉजिकल सेंटर (आरएसएमसी) त्या-त्या प्रदेशात येणाऱ्या वादळांचे बारसे करत असतात. आपल्याकडे या आठ देशांनी सुचवलेल्या नावांच्या यादीत हेलन, चपला, फोनी, जल, लहेर, मेघ, सागर, वायू, लैला, नीलम, मराजन, कयान, महा, लुबान, बुलबुल, सोबा, प्रिया, महा, मोहरर, निलोफर, आदी चित्रविचित्र नावांचा समावेश आहे.

12 November 2009

चक्रीवादळाचा झंजावात

मुंबईच्या किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता असलेले फयान हे चक्रीवादळ मुंबईला हुलकावणी देऊन गुजरातकडे निघून गेले असले तरी या चक्रीवदाळाने कोकणाला आपला तडाखा दिला. चक्रीवादळ निर्माण होणे आणि त्याला नाव देणे हे शास्त्रज्ञांसाठी आता नेहमीचेच झाले आहे. या चक्रीवादळांना देण्यात येणारी चित्रविचित्र नावे वाचून सर्वसामान्यांना मोठी गंमत वाटते. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात एला हे चक्रीवादळ तयार झाले आणि त्याने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाला जबरदस्त तडाखा दिला. ही वादळे कशी तयार होतात, त्यांना ही नावे कशी देण्यात येतात, असे प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. त्याविषयी आजच्या जोशीपुराणावर... ही वादळे भारताप्रमाणेच मुख्यत: उष्ण हवामानाच्या प्रदेशातच ( विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना) तयार होतात. या प्रदेशातील उष्णतेमुळे समुद्रावर हवेचा कमी दाब निर्माण होतो आणि मग इतर ठिकाणची हवा कमी दाबाच्या दिशेने वाहते. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्याचा परिणाम म्हणून ही बाहेरून येणारी हवा थेट कमी दाबाच्या क्षेत्रात प्रवेश करीत नाही, तर ती त्याच्या भोवती फिरत राहाते. त्यातूनच चक्रीवादळाचा जन्म होतो. बाष्प मिळत जाईल तसे ते अधिक तीव्र होत जाते आणि किनाऱ्याकडे येऊन विध्वंस घडवते. त्याच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढावे लागते. म्हणूनच तर चक्रीवादळांची निर्मिती पृथ्वीवर विशिष्ट पट्टय़ातच होते, असे लोकसत्ता दैनिकात ३० मे २००९ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या चक्रीवादळाच्या अंतरंगात या अग्रलेखात म्हटले आहे. भारतीय उपखंडात ती ‘सायक्लॉन’ म्हणून ओळखली जातात. अमेरिका, मेक्सिको, कॅरिबियन बेटांच्या परिसरात उद्भवणारी ‘हरिकेन’; जपान, तैवान, चीन, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया या भागातील ‘टायफून’, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या परिसरातील ‘विली-विली’ हीसुद्धा हवामानाच्या दृष्टीने आपल्या चक्रीवादळांचीच भावंडे! त्यामुळेच अमेरिकेत २००५ साली विध्वंस करणारी ‘कॅटरिना’, ‘रीटा’, ‘डेनिस’ ही वादळे किंवा चीन-तैवान-इंडोनेशियामध्ये धडकणारी ‘डय़ुरियन’सारखी वादळे आणि भारतीय उपखंडातील चक्रीवादळे यांच्यात निर्मितीच्या दृष्टीने फरक करता येत नाही. या वादळांची निर्मिती लाखो-कोटय़वधी वर्षांपासून सुरु अहे. केवळ भारतच नव्हे तर उपखंडातील आठ देश एकत्र येऊन वादळांचा वेध घेऊ लागले आहेत. (म्हणूनच वादळांना या वेगवेगळय़ा देशांची ‘एला’, ‘गोनू’, ‘ओग्नि’, ‘सिद्र’, ‘मूरजान’ अशी चित्रविचित्र नावे दिली जात आहेत.) असल्याचीही माहिती या अग्रलेखात आहे. याच संदर्भात १२ नोव्हेंबर २००९ च्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यात म्हटले आहे की, वादळ किनाऱयावर धडकल्यानंतर त्याला त्या त्या ठिकाणचे नाव देण्याची प्रथा पूर्वी होती. वादळाला आधीच नाव दिल्याने स्थानिक आणि आंतराष्ट्रीय पातळीवर ते ओळखण्यास मदत होते. एकाच ठिकाणी दोन वादळे निर्माण झाली तरी त्यात गोंधळ होत नाही. जगभरात सात रिजनल स्पेशलाइज्ड मिटिओरोलॉजिकल सेंटर त्यांच्या प्रदेशात येणाऱया वादळांना नावे देतात. बंगालचा उफसागर व अरवी समुद्रात तयार होणाऱया वादळांना नाव देण्याचा ठराव २००० मध्ये मस्कत येथे झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. त्या बैठकीस बांगलादेश, भारत, मालदिव, म्यामनार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका व थायलंड या देशांचे प्रतिनिधी हज होते. प्रत्येक देशाने सुचवलेली नावे अक्षरमालेच्या क्रमानुसार लिहिण्यात आली आहेत. सध्या अशा ६४ नावांची यादी तयार आहे. आता भविष्यात वादळ झाल्यास त्याला ओमान जेशाने सुचवलेले वरद हे नाव देण्यात येणार आहे. व त्यानंत तयार होणाऱया वादळाला पाकिस्तानने सुचवलेले लैला हे नाव देण्यात येणार आहे. इच्छुकांना लोकसत्ताचा हा अग्रलेख http://www.loksatta.com/old/daily/20090530/edt.htm या लिंकवर वाचता येऊ शकेल

11 November 2009

अजून वेळ गेलेली नाही...

आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला असे म्हणण्याचे दिवस असताना मुंबईकर आणि राज्यातील लोकांना घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा असे म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात पाऊस नाही आणि थंडीच्या दिवसात चक्क पाऊस, असे बदललेले ऋतूचक्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरे तर लहरीपणाने वागणे हा माणसाचा स्वभाव आहे. निसर्ग कधीही लहरीप्रमाणे वागत नाही. निसर्गाची प्रत्येक गोष्ट नियमानुसारच सुरु असते. मग गेल्या काही वर्षात असे काय घडले की निसर्गालाही आपले नियम गुंडाळून ठेवावे लागले. त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, नववनीन शोध आणि माणसाचे झालेले सुखवस्तू व भोगवादी जीवन यामुळे आपण निसर्गावर विजय मिळवला असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत असतो. पुराणात अगस्ती ऋषींनी समुद्र पिऊन टाकला, परशुराम यांनी समुद्र हटवला आदी कथा आपण वाचतो. मात्र आधूनिक काळात राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, शासकीय अधिकारी, पोलीस आदींच्या अभद्र युतीने समद्रात भराव टाकून समुद्र बुजवला. मुंबईत बॅकबे रेक्लमेशन उभे राहिले. समुद्र बुजवून किंवा त्याला हटवून किती बांधकामे उभी करायची याला काही धरबंद व मर्यादा राहिली नाही. २६ जलै २००५ व्हायला ते ही एक प्रमुख कारण असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. पूर्वी निसर्ग हा नियमाप्रमाणे वागायचा. म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात पावसाळा आणि ऑक्टोबर ते जानेवारी या काळात थंडी असायची. फेब्रुवारी ते मे हा काळ उन्हाळ्याचाच असायचा. पण सध्या चित्र वेगळेच दिसते आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस नाही आणि थंडीच्या दिवसात थंडी नाही. गेल्या वर्षी मुंबईत थंडी अजिबात पडलीच नव्हती. बदलते पर्यावरण, ग्लोबल वॉर्मींग, पर्यावरणाचा नाश त्यामुळे निर्माण होणाऱया विविध समस्या याकडे आपण सगळे जण कळत असून वळत नसल्यासारखे करत आहोत. मुंबईतील डोंगर, टेकड्या आपण भूईसपाट करुन टाकल्या. झाडे, जंगले इतकेच नव्हे तर खाडी किनाऱयावरील तिवरांची झुडपेही आपण तोडून टाकली. नद्या, नाले, तलाव विविध रासायनिक द्रव्ये सोडून प्रदूषित करुन टाकली. त्यामुळे या पाण्यातील जलजर आणि अन्य वनस्पती, जीवसृष्टीलाही आपण धोका पोहोचवला. रासायनिक कंपन्या, वाहनांची प्रचंड संख्या यामुळे हवेतील प्रदूषणात भर टाकली. मुंबईत ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे सर्वत्र उंच इमारती बांधल्या. पावसाचे ढग अडवायला डोंगर आणि झाडेच आपण शिल्लक ठेवली नाहीत. सिमेंट-क्रॉंक्रीटचे जंगल उभारून पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जमीनच शिल्लक ठेवली नाही. ज्या निसर्गाने आपल्याला गेली शेकडो वर्षे भरभरुन दिले, ते आपण अवघ्या काही वर्षात अक्षरश ओरबाडून घेतले. त्याबदल्यात निसर्गाला आपण काहीच दिले नाही. आणि हे सगळे करुन आपण आमचा विकास कसा करु घेतला, निसर्गावर कसा विजय मिळवला, त्याच्याच गप्पा मारत राहिलो. आपण या सगळ्याचा गर्व बाळगला. माणसाला त्याच्या बुद्धीचा अहंकार चढला. त्यामुळेच सध्या हा अहंकार आणि माणसांची घमेंड उतरवण्याचे काम निसर्ग आपल्यापरीने करत आहे. एवढे सगळे होत असूनही आपले डोळे उघडत नाही हे दुर्देव आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण वेळीच सावध होऊन पुन्हा निसर्गाकडे गेले पाहिजे. अन्यथा निसर्ग त्याच्यावर केलेल्या अन्यायाचा बदला या ना त्या स्वरुपात घेतच राहील आणि हे जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आपण केलेल्या या चुकांबद्दल भावी पिढी आपल्याला कधीच क्षमा करणार नाही...

10 November 2009

उलट्या बोंबा

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अबू आझमी यांच्याबाबतीत जो काही प्रकार घडला त्या बद्दल सर्वसामान्य जनतेत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र अबू आझमी सारख्या माणसाबद्दल जे काही झाले ते चांगलेच झाले, अशी प्रतिक्रिया बहुतांश लोकांकडून व्यक्त होत आहे. फक्त त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो मार्ग अवलंबिला तो चूक की बरोबर याबद्दल वाद असू शकतो. मुळात सर्वस्वी चूक ही अबू आझमी यांची आहे. एकीकडे भारतीय राज्य घटनेचा आधार घेऊन अबू आपण हिंदीतून घेतलेल्या कृत्याचे समर्थन करत आहेत. मात्र अबू यांची ही कृती म्हणजे उलट्या बोंबा आहेत. मनसेने विधीमंडळात केलेली ही कृती अचानक केली नव्हती. मराठी ही राजभाषा असून त्याचा सगळ्यांनी सन्मान करावा आणि त्यासाठी सर्व आमदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. खरे तर त्यात काही चूक नाही. परंतु अबू आझमी यांनी मुद्दामहून व मनसे आणि मराठी माणसांना डिवचण्यासाठी मी हिंदीतूनच शपथ घेणार असे जाहीर केले होते. अबू यांना अचानक हिंदीचा पुळका कसा काय आला. तुम्ही जर इतकी वर्षे मुंबई व महाराष्ट्रात राहात आहात तर तुम्हाला किमान काही वाक्ये तरी मराठीत बोलता आलीच पाहिजेत आणि तुम्ही मराठीचा आदर केला पाहिजे, अशी अपेक्षा कोणी ठेवली तर त्यात काही चूक नाही. त्यामुळे अबू यांनी शपथ घेताना मी अल्लाला स्मरून शपथ घेतो की, असे शब्द मराठीत बोलून आता पुढील वाक्ये मी हिंदीत बोलतो, असे सांगितले असते तरी कदाचित इतका गदारोळ झाला नसता. पण अबू यांना कुरापत काढण्यासाठी काहीतरी निमित्तच हवे होते. भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आपल्याला हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेचा दर्जा असलेल्या भाषेतून शपथ घेता येऊ शकते, असे त्यांनी सांगितल्याचे जाहीर झाले आहे. अरे वा रे वा, हे म्हणजे अबू यांच्या उलट्या बोंबा आहेत. म्हणजे सोयीचे असेल तेव्हा भारतीय राज्यघटना तोंडी लावायला यांना असते काय, नुकताच काही धर्मांध मुस्लीम इमामांमी वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही, आमच्या ते धर्माविरुद्ध आहे, मुस्लीमांना ते म्हणू नये, असा फतवा काढला होता. तेव्हा त्याचा थेट निषेध करण्यासाठी अबू यांचे तोंड शिवले होते का, त्यांनी तातडीने त्या फतव्याचा निषेध का केला नाही, काही वर्षांपूर्वी शाहबानो खटल्यात तेव्हांचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल फिरवला तेव्हा, पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात फटाके वाजविणारे काही धर्मांध मुसलमान, ज्या मशिदीत गेली अनेक वर्षे कोणी नमाज पढत नव्हते आणि भारतावर वेळोवेळी आक्रमण करणारा बाबर याच्या नावाने ओळखली जाणारी मशिद पाडली गेली म्हणून देशभरात दंगली घडविणारे, भिवंडीत पोलीस ठाणे बांधायला विरोध करुन पोलिसांना जिवंत मारण्याची झालेली गुंडगिरी, काश्मिरमध्ये जाळण्यात आलेला भारताचा राष्ट्रध्वज, मुंबईत झालेली बॉम्बस्फोट मालिका, गेल्या वर्षी झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला, संसदेवर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला या आणि अशा अनेक घटनांबाबत अबू आणि तथाकथित मुस्लीम नेते, त्या समाजातील सेलिब्रेटी गप्प का बसतात, अशा अशा वेळी त्यांना भारतीय राज्यघटना, राष्ट्र, राष्ट्रध्वज, देशाचे मानबिंदू यांची का आठवण होत नाही. वंदेमातरम हे राष्ट्रगीत नाही, तर ते राष्ट्रीय गीत आहे, असे वंदेमातरमला विरोध करणाऱयांकडून सांगितले जाते. खरे तर अशा घटना घडल्यानंतर केंद्रशासन व देशातीव विविध राज्य शासनांनी कठोरपणे राष्ट्रद्रोह करणाऱया व्यक्तींना अटक करुन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. आपल्याकडे संसदेवर हल्ला करणाऱया अपझल गुरुला फाशी द्यायची की नाही त्यावरुन तसेच समान नागरी कायदा लागू करण्यावरुनही मुठभर मुसलमानांचा विरोध. का तर ते शरियतला मान्य नाही. मग प्रश्न असा उपिस्थत होतो की तुम्हाला हे मान्य नाही, तुम्हा शरियतच जर प्रमाण मानायचे असेल तर भारतात का राहता, भारतात राहून सर्व फायदे का उकळता, फौजदारी गुन्ह्यांबाबत तुम्हाला भारतीय दंड विधानानुसार का शिक्षा द्यायची, असे प्रश्न हिंदुत्ववाद्यांनी उपिस्थत केले तर त्यात काय चुकीचे आहे. मुसलमान गुन्हेगार असेल तर त्याला शरियतनुसार हात तोडणे, डोळे फोडणे अशीच शिक्षा करायला पाहिजे. त्याला तुमची तयारी आहे का म्हणजे आपल्याला सोयीचे असेल तिथे भारतीय राज्य घटनेचा आधार घ्यायचा आणि सोयीचे नसेल तेव्हा तिला धाब्यावर बसवायचे, असे सुरु आहे. अबू आझमी यांच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी आपण जागे होणार आहोत की नाही.

09 November 2009

बहुजनांचा सांस्कृतिक दहशतवाद

ब्राह्मण, ब्राह्मण्य किंवा ब्राह्मणवाद यावर टीका करण्याची सध्या एक फॅशन झाली आहे. ब्राह्मणांवर टीका केली म्हणजे आपले पुरोगामीत्व सिद्ध होते, असे काही मंडळींना वाटते. यातूनच पूर्वीच्या ब्राह्मण इतिहासकारांचे संशोधन कसे चुकीचे आहे, हे सांगण्याची सध्या अहमहमिका लागली आहे. ब्राह्णण इतिहासकारांनी केलेले संशोधन आणि त्यांचे पांडित्य केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून नाकारण्यात येत आहे. ब्राह्मण इतिहासकारांचे संशोधन जर नव्या पुराव्याच्या आधारे चुकीचे निघाले, तर तसे म्हणायला किंवा ते स्वीकारायला काही हरकत नाही, पण त्यासाठी भक्कम पुरावा आणि अभ्यास हवा. किस्त्रीम च्या दिवाळी अंकात याच महत्वाच्या विषयावर श्यामसुंदर द. मुळे यांनी बहुजनांचा सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर विविध संदर्भ आणि दाखले देत एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. खरे म्हणजे तो मुळातून वाचला पाहिजे. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही जातीने ब्राह्णण नव्हती, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा ब्राह्मणांनी खून केला, संभाजीला ब्राह्मणांनी पकडून दिले, त्यामुळे त्याला हालहाल करुन औरंजेबाने ठार मारले, ब्राह्णण हेच खरे शिवाजीचे शत्रू होते, त्यांनी शिवाजीला विष घालून मारले, दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरु नव्हते. रामदास स्वामी हे औरंजेबाचे गुप्तहेर होते, अशा प्रकारचे हे अब्राह्णण संशोधन आहे. ब्राह्मणेतर लेखकांचे हे लेखन प्रामुख्याने नकारात्मक आहे. मुख्य म्हणजे ते जाती द्वेषावर आधारित आहे. एेतिहासिक लेखन हे कथा-कादंबरीसारखे अलंकारिक आणि कल्पनारम्य असू नये, हे जसे खरे तसेच ते अतिद्वेषाने बरबटलेलेही असू नये, असे मुळे यांनी लेखात म्हटले आहे. शिवाजी महाराज यांचे काही शत्रू जसे ब्राह्णण होते तसेच ते शहाण्णवकुळी मराठा देखील होते. शिवाजी महाराजांना ज्या आप्तस्वकीयांनी छळले, त्यात संभाजी मोहिते, चंद्रराव मोरे, खंडोजी खोपडे, सुलतान जगदाळे, सर्जेराव घाडगे, सूर्याजी सुर्वे, कमलोजी व जसवंतराव कोकाटे, सिंदखेडचे दत्ताजी जाधव, कृष्णाजी काळभोर, जयवंत दळवी, कल्याण यादव, प्रतापराव मोरे, नाईकजी खराटे, बाजी घोरपडे, मोहिते मामा, केदारजी देशमुख, जवळीकर पाटील अशी नावे आहेत. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून असलेला दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आल्यानंतर आनंदाने टिऱया बडविणाऱया मराठा संघटनांनी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना पाठ्यपुस्तकातून शिवाजीने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, हा मजकूर जेव्हा वगळण्यात आला तेव्हा का शेपट्या घातल्या होत्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केल्याबद्दल गांधीवादी समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या खुनाची सुपारी दिली जाते आणि आयुष्यभर शिवचरित्राचा अभ्यास व ध्यास घेतलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना खुनाची धंमकी दिली जाते, हा महाराष्ट्रातील बहुजनांचा सांस्कृतिक दहशतवाद मुस्लीम अतिरेक्यांपुढे मात्र नांगी टाकताना दिसतो, अशा शब्दात मुळे यांनी आपल्या लेखाचा समारोप केला आहे. आम्ही तुमच्याविरुद्ध काहीही लिहिले, तरी त्याबद्दल तुम्ही आम्हाला पुरावा मागायचा नाही. पण तुम्ही मात्र आमच्याविरुद्ध काहीही लिहावयाचे नाही. लिहाल तर याद राखा, असा ब्राह्मणेतर लेखकांचा सांस्कृतिक आणि एेतिहासिक दहशतवाद आहे. स्वातंत्र्योत्तर गेल्या पन्नास-साठ वर्षात महाराष्ट्रात शासन कोणाचे आहे, युतीच्या काळातील एक मनोहर जोशी यांचा अपवाद वगळता राज्यात ब्राह्मणेतर मख्यमंत्री सत्तारुढ झालेले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही ब्राह्मणांचे स्थान नगण्य आहे. असे असूनही जर देहू आणि आळंदी यांच्या विकासातील फरक प्रकर्षाने जाणवत असेल तर त्यावा ब्राह्णण जबाबदार कसे, असे काही परखड सवालही मुळे यांनी या लेखात केले आहेत. बहुजनांच्या सांस्कृतिक दहशतवादाला आणि सातत्याने ब्राह्मणांना झोडपणाऱयांना मुळे यांनी या लेखाद्वारे विविध संदर्भ व दाखले देत उघडे पाडले आहे. त्याबद्दल मुळे यांचे अभिनंदन.

08 November 2009

मोबाईलवर मराठी टायपिंग

मोबाईल ही आता चैनीची गोष्ट न राहता गरजेची आणि आवश्यक अशी बाब झाली आहे. कर लो दुनिया मुठ्ठी में असे स्लोगन देणाऱया कंपनीने मोबाईल हा सर्वसामान्य माणसांच्या हातात आणून ठेवण्याचे मोठे काम केले. आजकाल तर मोबाईल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना जास्त सुविधा कोण देतो आणि आपल्याकडे ग्राहकांना कोण खेचून घेतो यात चढाओढ लागलेली असते. विविध नामांकित कंपन्यांच्या मोबाईल हॅण्डसेटमुळे ग्राहकांना कोणता घेऊ आणि कोणता नको, असा प्रश्न पडतो. मला असे वाटते की ज्या मोबाईलमध्ये मराठीतून पाठवलेला एसएमएस वाचता येतो आणि मराठीतून एसएमस लिहिता येतो, तोच मोबाईल शक्यतो विकत घ्यावा. मराठीतून आलेला एसएमएस वाचणे खूप छान वाटते. माझा नोकियाचा ३११० क्लासिक हा फोन असून त्यावर मराठीसह हिंदी, गुजराथी, बंगाली आणि अन्य काही भारतीय प्रादेशिक भाषांमधून आपल्याला लिहिता येऊ शकते आणि त्या प्रादेशिक भाषेत पाठवलेला एसएमएस वाचताही येऊ शकतो. मराठीतून एसएमएस लिहिताना सुरुवातीला थोडे कठीण जाते परंतू अवघ्या चार-पाच दिवसात आपला हात त्या त्या कीजवर बसला की टाईप करणे खूप सोपे जाते. मग इंग्रजी किंवा रोमन भाषेतून (how are you/ tu kasa ahes) लिहिण्यापेक्षा आपल्याला थेट तू कसा आहेस, असे मराठीत लिहिता येऊ शकते. मराठीतून आपल्या मातृभाषेतून पाठवलेला एसएमएस वाचायलाही खूप छान वाटते. सर्वाच्या माहितीसाठी नोकिया ३११० क्लासिकवरील मराठी शब्द जेथे आहेत, त्या जागा अशा. सर्वसाधारणपणे नोकियाच्या मोबाईल हॅण्डसेटवर अशाच प्रकारचे शब्द असतात. ४ जीएचआय-क, ख, ग, घ./ ५ जे, के, एल-च, छ, ज, झ/ ६ एमएएनओ-ट, ठ, ड ७ पी, क्यु, आर, एस-त, थ. द, ध/८ टी, यु, व्ही-प, फ, ब, भ, म/९ डब्लु, एक्स, वाय-य, र, ल, व, स तसेच १ या आकड्यावर पाय मोडणे, रफार, पूर्णविराम, २ या आकड्यावर अ, आ, इ, ई आणि ३ या आकड्यावर ए, औ ओ अशा अक्षरे आहेत. मराठी बाराखडी एकदा लक्षात ठेवली की मोबाईलवर टाईप करणे खूप सोपे जाते. समजा सुप्रभात असे आपल्याला लिहायचे असेल तर ९ आकड्यावर स पर्यंतयेऊन २ आकड्यावरुन ह्रस्व (पहिला) उकार द्याचया. प्र हे अक्षर टाईप करण्यासाठी ८ आकड्यावर येऊन प दाबायचा, नंतर प चा पाय मोडून ९ आकड्यावरील र अक्षर दाबायचे. हे वाचतांना खूप कठीण वाटेल, पण एकदा करायला लागलो की खूप सोपे वाटते. मी सध्या सगळे एसएमएस मराठीतूनच पाठवत आहे. इतकेच नव्हे तर एमपी थ्री (म्युझिक फाईल/मिडियामध्ये जी गाणी अनुक्रमाने आपण पाहतो ती ) मधील सर्व गाण्यांच्या सुरुवातीची ओळही मी मराठीतून टाईप केली आहेत. मराठी गाण्यांची ओळ इंग्रजीतून वाचण्यापेक्षा मराठीतून वाचणे मस्त वाटते. असो, आपणही आपल्या मोबाईलवर असा प्रयोग करुन पाहा, आपल्यालाही ते नक्की जमेल.

07 November 2009

घरबसल्या मिळवा मायबोलीतील पुस्तके

मराठी पुस्तक प्रकाशन आणि विक्री व्यवसायातही आता मार्केटिंगचे नवे फंडे अवलंबिण्यात येत असून त्यामुळे मराठी पुस्तक विक्री आणि प्रकाशन व्यवसायालाही मोठी मदत होत आहे. पुस्तके घेण्यासाठी वाचक जर पुस्तकांच्या दुकानात येत नसेल तर पुस्तकेच थेट त्याला घरबसल्या मिळावी, या उद्देशाने ‘मायबोली’ या संकेतस्थळाने ऑनलाईन पुस्तक खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आत्तापर्यंत ही सुविधा परदेशस्थ भारतीयांसाठीच उपलब्ध होती ती आता भारतातील तमाम मराठी साहित्यप्रेमी आणि वाचकांनाही उपलब्ध झाली आहे.‘मायबोली’च्या http://kharedi.maayboli.com या संकेतस्थळावर ही सोय आहे. या ऑनलाईन खरेदीमुळे मराठी वाचकांना आता घरबसल्या आपली आवडती पुस्तके कुरिअरद्वारा मिळू शकतील तसेच भारतात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांनाही ते भेट म्हणून ही पुस्तके ‘मायबोली’द्वारे पाठवू शकतील. मराठीतील अनेक मान्यवर प्रकाशकांची पुस्तके या ऑनलाईन खरेदीत संकेतस्थळावर पाहायला मिळू शकतात. पुस्तकाचा लेखक, पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकाची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. पुस्तकांच्या किमती सध्या ‘युएसडी’ मध्ये देण्यात आल्या असून लवकरच त्या भारतीय चलनातही देण्यात येणार आहेत.मायबोलीच्या ‘खरेदी’ या विभागात आरोग्य, समाज, कविता, संगीत, पर्यटन आणि अन्य विषयावरील विविध पुस्तके उपलब्ध आहोत. ‘संगीत’ विभागात गंधर्वगाथा (भा. द. खेर), माझे संगीत (केशवराव भोळे), नादवेध (सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले), स्वरार्थरमणी (किशोरी आमोणकर) तर ‘पर्यटन’ या विभागात मीना प्रभू यांची चिनीमाती, मेक्सिकोपर्व, तुर्कनामा, ग्रीकांजली तसेच अनिल अवचट यांचे ‘अमेरिका’, मिलिंद गुणाजी यांचे ‘भटकंती’ आदी पुस्तके वाचकांना पाहायला मिळू शकतात. भाऊसाहेब पाटणकर (दोस्त हो), सुरेश भट (एल्गार) आणि अन्य कवितासंग्रह व अन्य विषयांवरील अनेक पुस्तके आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठी तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट सर्फिगची आवड मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. ‘मायबोली’प्रमाणेच इतरही काही संकेतस्थळांकडून ऑनलाईन मराठी पुस्तक खरेदीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नेटसॅव्ही असलेल्या या तरुणांना डोळ्यासमोर ठेवून मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी असे नवे मार्ग चोखाळले जात आहेत.