03 September 2011

श्लोक गणेश-२ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा

महाराष्ट्रातील संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी यांना महत्त्वाचे स्थान आहे. श्रीराम आणि हनुमान हे उपास्यदैवत असलेल्या रामदास स्वामी यांनी या दैवतांच्या भक्तीबरोबरच बलोपासनेलाही प्राधान्य दिले होते. रामदास स्वामी यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. समर्थ रामदास स्वामी यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली. साधी-सोपी भाषा आणि परखड विचार हे त्यांच्या लेखनाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणता येईल.
दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, अभंग, आरत्या, भूपाळी आदी विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले. त्यांच्या रचनांमधील ‘जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’, ‘धटासी असावे धट, उद्धटासी असावे उद्धट’, ‘केल्यांने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’, ‘सामथ्र्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’ अशी काही वाक्ये / ओव्यांनी मराठी भाषेत स्थान मिळवले आहे. सर्वसामान्य माणूसही नेहमीच्या बोलण्यात या ओव्यांचा वापर करत असतो. राष्ट्रउभारणी / राष्ट्रसंघटनेबरोबच रामदास स्वामी यांनी प्रपंच, परमार्थ, विवेक, लोकशिक्षण या विषयांवरही समाजाचे प्रबोधन केले आहे.
रामदास स्वामी यांनी लिहिलेले ‘मनाचे श्लोक’ प्रसिद्ध आहेत. मनाच्या श्लोकांची एकूण संख्या २०५ इतकी आहे. ‘मनाचे श्लोक’ हे प्रत्येक व्यक्तीने समाजात आणि कुटुंबात कसे वागावे, प्रत्येकाला चांगली बुद्धी प्राप्त व्हावी, सर्वानी सन्मार्गाने चालावे, आपल्यातील दोष दूर व्हावेत या उद्देशाने समर्थानी त्यांची रचना केली आहे.
मनाच्या श्लोकांची सुरुवात रामदास स्वामी यांनी
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंद या राघवाचा
या श्लोकाने केली आहे.
या श्लोकात रामदास स्वामी यांनी गणेशाची स्तुती केली आहे. अवघ्या चार ओळींच्या या श्लोकात रामदास स्वामी प्रारंभीच ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ असे म्हणतात.
‘गण’ म्हणजे सैन्य आणि पती म्हणजे त्यांचा नेता. गणपती हा मोठा योद्धा असून तो विघ्नहर्ता आहे. गणपती हा सर्व गणांचा नेता / राजा आहेच पण तो ‘ईश’ सर्वा गुणांचा असल्याचे  समर्थ रामदास स्वामी म्हणतात. म्हणजेच प्रत्येक व्यकतीने आपल्यातील दोष, दुर्गुण दूर सारून चांगल्या गुणांचा, सद्विचारांचा, सन्मार्गाचा अंगीकार करावा, असे रामदास स्वामी यांना म्हणायचे आहे.
‘चत्वार वाचा’ म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाचांनी विद्येची आराधना करावी, असेही समर्थ सांगतात. ‘श्रीराम’ हे समर्थाचे उपास्य दैवत असून रामाला मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते. प्रत्येकाने सन्मार्गाने चालावे आणि आपल्यातील दोष काढून टाकून आनंदाने जीवन जगावे, असेच रामदास स्वामी यांना सांगायचे आहे. 

(हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (३ सप्टेंबर २०११) च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
http://epaper.loksatta.com/11164/indian-express/03-09-2011#p=page:n=17:z=1 

No comments:

Post a Comment