13 March 2012

कहाणी हेमलकसाची

कुष्ठरुणांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले दिवंगत बाबा आमटे यांचे सुपुत्र आणि आपल्या वडिलांच्या सामाजिक सेवेचा वारसा ताकदीने पुढे नेणारे व सामाजिक कार्यासाठी आपले आयुष्य झोकून दिलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा हे महाराष्ट्राला परिचित आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांचे नाव व काम पोहोचले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प आणि त्यांनी या भागात आदिवासींसाठी केलेले काम ही त्यांची मुख्य ओळख आहे. हेमलकसाची ही कहाणी आता लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. विधिज्ञ समृद्धी पोरे यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन पोरे यांचे आहे.

धाडसी निर्णय एवढ्यासाठीच म्हटले की अशा विषयावर चित्रपट तयार करणे, बॉक्स ऑफिसवरील आणि अन्य व्यावसायिक गणिते जुळविणे यात कदाचित हा सर्व व्यवहार आतबट्ट्याचाही ठरू शकेल. पण समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱया अशा माणसांचे कार्य आणि कर्तृत्व समाजापुढे येणे खरोखऱच आवश्यक आहे. सध्याच्या मी आणि माझे एवढ्यापुरतेच पाहण्याची वृत्ती वाढीस लागलेल्या समाजासाठी असे काम करणारी मंडळी दीपस्तंभ आहेत. समृद्धी पोरे यांनी चित्रपटाच्या माध्यमातून ते समाजापुढे आणण्याचे ठरवले याबद्दल त्यांचे अभिनंदन.

हेमलकसा आणि लोकबिरादरीच्या कामाची माहिती देणारे डॉ. प्रकाश आमटे यांनी लिहिलेले प्रकाशवाटा हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचा आधार चित्रपटसाठी घेतला जाणार आहे. १९७१ मध्ये या भागात वीज, पाणी, आरोग्यविषयक सुविधा अजिबात नव्हत्या.घनदाट आणि रौद्र जंगल, अत्यंत विषम हवामान, राहायला घर नव्हे तर झोपडी किंवा सपाट जमीन नाही, अशी प्रतिकूल परिस्थिती येथे होती. भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासींमध्ये विश्वास निर्माण करून आपले काम त्यांच्यात रुजविणे, हे खरोखरच आव्हानात्मक काम होते.  डॉ. प्रकाश व मंदा आणि त्यांच्या सहकाऱयांनी येथे अक्षरश शून्यातून सगळे काही उभे केले. आज या आदिवासी भागात उत्तम प्रकारची शाळा, दवाखाने, रुग्णालय, पाळणाघर, वीज, रस्ते, पाणी आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा पुस्तकातील एक प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. ते लिहितात
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेला एक माडिया उपचारांसाठी आला. त्याच्या चेहर्‍याचा ओठांपासूनचा टाळूपर्यंतचा भाग अस्वलाने एखादे फळ सोलावे, तसा सोलून काढला होता. (त्या चेहर्‍याचा फोटो तर डोळ्यांसमोरुन जाता जात नाही). डोळे फुटलेले, संपूर्ण आंधळा झालेला तो माणूस शुद्धीवर होता, आपल्यावर हल्ला कसा झाला ते सांगत होता. जखमेत माती, पालापाचोळा गेलेला. ती जखम बघून एक शिकाऊ डॉक्टरला तर चक्करच आली.मी हळूहळू ती जखम स्चच्छ केली. जखम शिवायची म्हटले तर भूल कुठेकुठे म्हणून द्यायची, म्हणून भूल न देताच त्याचा फाटलेला चेहरा शिवायला सुरवात केली. जखमेवर घातलेले दीडशे टाके पूर्ण होईतो तो माडिया शांतपणे सहन करत बसला होता. चार-पाच दिवसांत तो बरा होऊन चालत आपल्या घरी गेला. 

असे अनेक प्रसंग, आठवणी डॉ. आमटे यांनी यात सांगितल्या आहेत. असो. तर अशा ध्येयवेड्या आणि समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलेल्या दाम्पत्याची कहाणी आणि प्रकल्पाची ओळख या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. खरे तर समाजात अशा प्रकारचे काम करणाऱया मंडळींची आणि त्यांच्या कामाची ओळख दूरचित्रवाहिनी  मालिका, चित्रपट, नाटक अशा दृकश्राव्य माध्यमातून अधिक प्रमाणात झाली पाहिजे. लेख, कादंबरी अशा माध्यमातून हे कार्य लोकांपुढे येत असतेच. पण छापील शब्दांपेक्षा दृकश्राव्य माध्यमाचा परिणाम मोठा असतो. प्रेक्षकांच्या मनाचा तो जास्त प्रमाणात ठाव घेतो. समाजातील तरुणांना त्यापासून प्रेरणा मिळण्यासाठी ते परिणामकारक ठरू शकते.

अर्थात असे चित्रपट आणि नाटक तयार झाले म्हणजे संपूर्ण समाज एका रात्रीत बदलेल असा भावडा विश्वास नाही. पण चित्रपट/नाटक पाहून त्यापैकी काही टक्के लोकांनी तरी प्रेरणा घेतली आणि त्यांच्या मनोवृत्तीत बदल झाला तरी ते यश आहे, असे नक्की म्हणता येईल.
 
डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा-लोकबिरादरी प्रकल्पाबाबत http://lokbiradariprakalp.org/ या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकेल. जिज्ञासूंनी येथे जरुर भेट द्यावी.


No comments:

Post a Comment