31 May 2012

नावात काय आहे


नावात काय आहे, असा प्रश्न कोणाला विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल नावात काय, काही नाही तर कोणी सांगेल नावातच सर्व काही आहे. खरय ते. जात नाही ती जात असे म्हटले जाते, तसेच आपल्या जन्मापासून शेवटपर्यंत जे आपल्याबरोबर असते आणि मृत्यूनंतरही मागे राहते ते आपले नाव. एखाद्याने काही कर्तृत्व गाजवले तर आपण अमूक अमूक यानं तमूक तमूक याचं नाव काढलं हो, असं म्हणतोच. नाव काढण्याबरोबरच नाव ठेवणं हा सुद्धा एक प्रकार आहे. नाव ठेवणं म्हणजे बारसं करणं या अर्थी मी म्हणत नाहीये. खरोखरच नाव ठेवणं असं मला म्हणायचाय. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्या नावडत्या किंवा खडूस शिक्षकांना, मित्र-मैत्रणिंना नाव ठेवणं, हे आपण प्रत्येकानं कधी ना कधी तरी केलेलं असेलच.
नावात काय आहे, असं म्हटलं तरी नावातच सर्व काही आहे. म्हणूनच आपल्या मराठी भाषेत नाव ठेवणं किंवा नाव यावरून काही म्हणी आणि वाकप्रचारही तयार झाले आहेत. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा, नाव मोठं लक्षण खोटं,
अनेकदा आपण प्रत्येकाने व्यवहारात हा अनुभव घेतलेला असतो. एखाद्याचे नाव वाचून किंवा ऐकून आपल्या मनात त्या व्यक्तीची एक प्रतिमा तयार होते आणि काही वेळेस ती व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर आपला चक्क भ्रमनिरास होतो. बेबी, बाळ या नावाच्या व्यक्ती कितीही म्हाताऱया झाल्या तरी शेवटपर्यंत बाळचं राहतात.
जे व्यक्तींच्या नावाचं तेच चित्रपटांच्या नावाबाबतही म्हणता येईल. काही चित्रपटांची नावे पाहिली तर केवळ विचित्र नाव आहे म्हणून आपण कदाचित नाक मुरडू आणि पाहायलाही जाणार नाही. लावू का लाथ, बाबुरावला पकडा, चल गजा करू मजा, गोंद्या मारतोय तंगडं, सालीनं केला घोटाळा, झक मारली नी बायको केली, सासू नंबरी, जावई दसनंबरी आणि आणखी कितीतरी. चित्रपटांच्या अशा नावांवरून चित्रपट सुमार दर्जाचा, कंबरेखालचे विनोद असलेला, फडतूस अभिनेते असलेला असा असेल असा कोणी समज (कदाचित गैरसमज) करून घेतला तर त्यात बिचाऱया रसिक प्रेक्षकांची काहीच चूक नाही. मुळात अशी चित्रविचित्र नावं ठेवावीत का,
नावांप्रमाणेच आपली आडनावंही अशीच मजेशीर असतात. अशा चित्रविचित्र आडनावांमुळं अनेकदा मुला-मुलींची लग्नं जमविणेही कठीण होऊन जाते. त्यामुळे आपलं आडनाव बदलून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अनेक जण तसं करतातही. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये तसे प्रसिद्धही करावे लागते. गावावरून आडनावं असतात, पण आपली आडनावं ही व्यवसायावरूनही ठेवली गेलेली आहेत. मी येथे मुद्दामहून अशा काही आडनावांचा उल्लेख करत नाही, पण मला काय म्हणायचं आहे, ते समजलं असेल.
नाव घेणं हा एक आणखी प्रकार. लग्न झालेल्या नवीन वधूला नाव घ्यायला सांगतात. नवी नवरीही आपल्या नवऱयाचे नाव मजेशीरपणे घेत असते. आत्ताच्या काळात ज्यांचा प्रेमविवाह झालेला आहे किंवा ज्यांचा झालेला नाही अशी जोडपी एकमेकांना नावानं हाक मारतात. पण पूर्वीच्या काळी स्त्री आपल्या नवऱयाचं नाव घेत नसे. अहो, ह्यांनी, इकडून,तिकडून अशा प्रकारे नवऱयाला संबोधलं जायचं. नवराही पत्नीला अहो किंवा मुलगा/मुलीची आई असे म्हणत असे.
टोपणनावं हा आणखी एक प्रकार, आपल्याला घरी किंवा मित्र-मैत्रीणी आपल्या नावाऐवजी अनेकदा एखाद्या टोपण नावानं हाक मारत असतात. अनेक साहित्यिकानाही लेखनासाठी टोपण नावांचा वापर केला. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज. त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी आणि अनेक जण. 
आपल्या स्वतच्या नावाबरोबच अनेकदा शाळा, कॉलेज, गाव, आपण राहतो ती सोसायटी, जिल्हा, तालुका, मूलगा/मुलगी, नातवंडे, पत्नी अशा अनेकविध प्रकाराने आपण प्रत्येकजण दररोज नाव घेत असतो आणि ठेवतही असतो. त्यामुळे विख्यात इंग्रजी लेखक विल्यम शेक्सपीअर यानी नावात काय आहे, असं जरी म्हटलेलं असलं तरी सर्व काही नावातच आहे. खरं ना.
    (माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवर २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)



    No comments:

    Post a Comment