28 June 2012


गीताईची लाखांची गोष्ट

ज्येष्ठ गांधीवादी आणि भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेल्या ‘गीताई’च्या आत्तापर्यंत २६१ आवृत्या प्रकाशित झाल्या असून एकूण ४० लाख ३० हजार प्रतींची विक्री झाली आहे.
यंदा ‘गीताई’ला ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘गीताई’ हे संस्कृतमधील श्रीमद्भगवद्गीतेचे केलेले सुबोध मराठी भाषांतर असून ‘गीताई’ची पहिली आवृत्ती १९३२ मध्ये प्रकाशित झाली होती. 
संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ प्रमाणेच विनोबा भावे यांनी भाषांतरित केलेल्या ‘गीताई’ला मराठी संस्कृतीत महत्त्व आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे मराठीत गीतेचे भाषांतर कर, असे विनोबा यांच्या आईने त्यांना सांगितले होते. आईने सांगितल्यावरून विनोबांनी श्रीमद्भगवद्गीता ‘गीताई’च्या रुपाने मराठीत आणली.
‘गीताई’चे प्रकाशन विनोबा भावे यांनीच स्थापन केलेल्या ग्रामसेवा मंडळ व परमधाम प्रकाशन यांच्यातर्फे केले जाते. विनोबा भावे यांनी १९३०-३१ च्या सुमारास ‘गीताई’ लिहिली. १९३२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गीताई’ची किंमत फक्त एक आणा होती. शेठ जमनालाल बजाज यांनी  वैयक्तिकरित्या पहिल्यांदा ‘गीताई’ प्रकाशित केली. धुळे येथील मुद्रणालयात त्याची छपाई करण्यात आली, अशी माहिती वध्र्याच्या पवनार आश्रमाचे गौतम बजाज यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
२०११ मध्ये नवी आवृत्ती प्रकाशित झाली असल्याचे सांगून बजाज म्हणाले की, मोठा, मध्यम आणि बारीक अशा तीन प्रकारच्या टाईपमध्ये ‘गीताई’ प्रकाशित केली जाते. आजच्या काळातही त्याची किंमत अगदी अत्यल्प म्हणजे ७ आणि १५ रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे. मूळ संस्कृतसह गीताई असेही आमचे प्रकाशन असून त्याची किंमत २५ रुपये आहे, असे ते म्हणाले. 
आजही ‘गीताई’ला मोठय़ा प्रमाणात मागणी असून महाराष्ट्राबाहेरही ‘गीताई’ वाचली जाते. मूळ ‘गीताई’चा अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद झालेला नसला तरी त्याचा आधार घेऊन हिंदू, गुजराथी आदी भाषांमध्ये ‘गीताई पोहोचली असल्याचेही बजाज यांनी सांगितले. 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात २८ जून २०१२ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे)
  

31 May 2012

नावात काय आहे


नावात काय आहे, असा प्रश्न कोणाला विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल नावात काय, काही नाही तर कोणी सांगेल नावातच सर्व काही आहे. खरय ते. जात नाही ती जात असे म्हटले जाते, तसेच आपल्या जन्मापासून शेवटपर्यंत जे आपल्याबरोबर असते आणि मृत्यूनंतरही मागे राहते ते आपले नाव. एखाद्याने काही कर्तृत्व गाजवले तर आपण अमूक अमूक यानं तमूक तमूक याचं नाव काढलं हो, असं म्हणतोच. नाव काढण्याबरोबरच नाव ठेवणं हा सुद्धा एक प्रकार आहे. नाव ठेवणं म्हणजे बारसं करणं या अर्थी मी म्हणत नाहीये. खरोखरच नाव ठेवणं असं मला म्हणायचाय. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्या नावडत्या किंवा खडूस शिक्षकांना, मित्र-मैत्रणिंना नाव ठेवणं, हे आपण प्रत्येकानं कधी ना कधी तरी केलेलं असेलच.
नावात काय आहे, असं म्हटलं तरी नावातच सर्व काही आहे. म्हणूनच आपल्या मराठी भाषेत नाव ठेवणं किंवा नाव यावरून काही म्हणी आणि वाकप्रचारही तयार झाले आहेत. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा, नाव मोठं लक्षण खोटं,
अनेकदा आपण प्रत्येकाने व्यवहारात हा अनुभव घेतलेला असतो. एखाद्याचे नाव वाचून किंवा ऐकून आपल्या मनात त्या व्यक्तीची एक प्रतिमा तयार होते आणि काही वेळेस ती व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर आपला चक्क भ्रमनिरास होतो. बेबी, बाळ या नावाच्या व्यक्ती कितीही म्हाताऱया झाल्या तरी शेवटपर्यंत बाळचं राहतात.
जे व्यक्तींच्या नावाचं तेच चित्रपटांच्या नावाबाबतही म्हणता येईल. काही चित्रपटांची नावे पाहिली तर केवळ विचित्र नाव आहे म्हणून आपण कदाचित नाक मुरडू आणि पाहायलाही जाणार नाही. लावू का लाथ, बाबुरावला पकडा, चल गजा करू मजा, गोंद्या मारतोय तंगडं, सालीनं केला घोटाळा, झक मारली नी बायको केली, सासू नंबरी, जावई दसनंबरी आणि आणखी कितीतरी. चित्रपटांच्या अशा नावांवरून चित्रपट सुमार दर्जाचा, कंबरेखालचे विनोद असलेला, फडतूस अभिनेते असलेला असा असेल असा कोणी समज (कदाचित गैरसमज) करून घेतला तर त्यात बिचाऱया रसिक प्रेक्षकांची काहीच चूक नाही. मुळात अशी चित्रविचित्र नावं ठेवावीत का,
नावांप्रमाणेच आपली आडनावंही अशीच मजेशीर असतात. अशा चित्रविचित्र आडनावांमुळं अनेकदा मुला-मुलींची लग्नं जमविणेही कठीण होऊन जाते. त्यामुळे आपलं आडनाव बदलून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अनेक जण तसं करतातही. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये तसे प्रसिद्धही करावे लागते. गावावरून आडनावं असतात, पण आपली आडनावं ही व्यवसायावरूनही ठेवली गेलेली आहेत. मी येथे मुद्दामहून अशा काही आडनावांचा उल्लेख करत नाही, पण मला काय म्हणायचं आहे, ते समजलं असेल.
नाव घेणं हा एक आणखी प्रकार. लग्न झालेल्या नवीन वधूला नाव घ्यायला सांगतात. नवी नवरीही आपल्या नवऱयाचे नाव मजेशीरपणे घेत असते. आत्ताच्या काळात ज्यांचा प्रेमविवाह झालेला आहे किंवा ज्यांचा झालेला नाही अशी जोडपी एकमेकांना नावानं हाक मारतात. पण पूर्वीच्या काळी स्त्री आपल्या नवऱयाचं नाव घेत नसे. अहो, ह्यांनी, इकडून,तिकडून अशा प्रकारे नवऱयाला संबोधलं जायचं. नवराही पत्नीला अहो किंवा मुलगा/मुलीची आई असे म्हणत असे.
टोपणनावं हा आणखी एक प्रकार, आपल्याला घरी किंवा मित्र-मैत्रीणी आपल्या नावाऐवजी अनेकदा एखाद्या टोपण नावानं हाक मारत असतात. अनेक साहित्यिकानाही लेखनासाठी टोपण नावांचा वापर केला. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज. त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी आणि अनेक जण. 
आपल्या स्वतच्या नावाबरोबच अनेकदा शाळा, कॉलेज, गाव, आपण राहतो ती सोसायटी, जिल्हा, तालुका, मूलगा/मुलगी, नातवंडे, पत्नी अशा अनेकविध प्रकाराने आपण प्रत्येकजण दररोज नाव घेत असतो आणि ठेवतही असतो. त्यामुळे विख्यात इंग्रजी लेखक विल्यम शेक्सपीअर यानी नावात काय आहे, असं जरी म्हटलेलं असलं तरी सर्व काही नावातच आहे. खरं ना.
    (माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवर २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)



    30 May 2012

    माथ्यावर तळपे उन

    काय उन्हाळा चांगलाच तापलाय ना, कधी एकदा पावसाला सुरुवात होतेय, असं झालय. खरं आहे. या उन्हाळ्याबद्दल जरा पुन्हा थोडेसे. आपण गाण्याचे शौकीन असाल तर विविध मूड्समधील गाणी आपण ऐकली असतील. काय काही वेगळं लक्षात येतंय. थंडी किंवा पाऊस या विषयावर मराठीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा/उन या विषयी गाणी कमी आहेत, असं नकोसा उन्हाळा या मागील लेखात मी म्हटलं होतं. हिवाळा किंवा पावसाळा हे दोन ऋतू आपल्याला जेवढे आवडतात त्या तुलनेत उन्हाळा हा ऋतू विशेषत्वानं कोणाला आवडत नाही. उन्हाळा म्हटला की आपण नाक मुरडतो. मग आपल्याप्रमाणेच कवी/गीतकार यांनाही उन्हाळा विशेष आवडत नसल्याने त्याचे प्रतिबिंब गाण्यातून फारसे उमटले नसावे का. पण उन/उन्हाळा हा शब्द असलेली काही गाणी आहेत आणि ती चांगली लोकप्रियही आहेत.
    गाण्यांमधून ऊन किंवा उन्हाळा हा शब्द असलेली गाणी आठवताहेत का, जरा विचार करा. एकदम सोपं असलेलं आणि प्रत्येकाला माहिती असलेलं आहे हे गाणं. पिकनिक, घरगुती गाण्यांची मैफल, भेंड्या किंवा मराठी वाद्यवृदातून हे गाणं हमखास म्हटलं जातं, त्याला वन्समोअरही मिळतो. अजून लक्षात येत नाहीये.
    सांगतो
    ही चाल तुरुतुरू, उडती केस भुरभुरू
    डाव्या डोळ्यावर बट ढळली
    कशी मावळत्या उन्हात
    केवड्याच्या बनात, नागीण सळसळली
    ज्येष्ठ गायक दिवंगत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील आणि शांता शेळके यांनी लिहिलेले व देवदत्त साबळे यांनी संगीत दिलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्यात उन हा शब्द आलेला आहे.
    उन हा शब्द असलेलं आणखी एक माहितीचे आणि लोकप्रिय असलेलं गाणं म्हणजे उषा मंगेशकर यांच्या आवाजातील
    वेळ झाली धर्मासांन
    माथ्यावर तळपे उन
    नको जाऊ कोमेजून
    माझ्या प्रितीच्या फुला
    हे गाणं. ज्येष्ठ गायक-संगीतकार यशवंत देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून ही कविता कवी आ. रा. देशपांडे ऊर्फ अनिल यांची आहे. काही वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून म्हणजे आत्ताची अस्मिता वाहिनीवरून हे गाणं बरेचदा प्रसारित होत असे. या गाण्यात उन्हाळ्यातील रखरखाट, अंगाची होणारी काहिली हे सर्व काही आलं आहे.
    कारण पुढील कडव्यातील शब्द
    तप्त दिशा झाल्या चारी
    भाजतसे सृष्टी सारी
    कसा तरी जीव धरी
    माझ्या प्रितीच्या फुला
    असे आहेत.
    या गाण्याबरोबरच मला शाळेत शिकलेले बालकवी यांची कविता आठवली. यातही उन हा शब्द आहे.
    श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
    क्षणात येत सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे
    उन हा शब्द असलेलं आणखी एक लोकप्रिय गाणे सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आहे.
    आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
    स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
    हे गाणेही अधूनमधून आकाशवाणीवर लागत असते.
    आशा भोसले यांच्या आवाजातील
    तुझी नी माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात
    आपण दोघी बांधू या गं दादाचं घर उन्हात
    या गाण्यातही उन हा शब्द आलेला आहे.
    ग. दि. माडगूळकर यांचं गीत, सुधीर फडके यांचं संगीत आणि माणीक वर्मा यांच्या आवाजातील एका लावणीतही उन हा शब्द आलेला आहे. ही लावणी आजही लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंद किंवा विविध वाहिन्यांवरील गाण्यांच्या स्पर्धेच्या रिअॅलिटी शो मध्ये एखादा तरी स्पर्धक ही लावणी म्हणतो आणि वन्समोअर घेतो.
    जाळीमंदी पिकली करवंद या लावणीत
    भर उन्हात बसली धरुन सावली गुरं
    न्हाई चिंता त्यांची तिन्हीसांज पातुरं
    चला दोघं मिळूनी चढू टेकडीवर
    चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद
    जाळीमंदी पिकली करवंद
    या प्रमाणेच आशा भोसले यांच्या आवाजातील
    भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
    बाई श्रावणाचं उन मला झेपेना
    या गाण्यातही उन हा शब्द आलेला आहे.
    तर सहज आठवतील अशी उन/उन्हाळा हा शब्द असलेली ही काही गाणी. असो. गाण्यांमधल्या उन शब्दानेही अंगाची काहिली झाली असेल तर पावसाला अजून सुरुवात व्हायची आहे. तो पर्यंत थंडी आणि पाऊस असलेली गाणी आठवा. तेवढाच मनालाही गारवा...

    (माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवरील ब्लॉगमध्ये २८ मे २०१२ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे)

    25 May 2012

    नकोसा उन्हाळा
    तुमचा सर्वात आवडता ऋतू कोणता, असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील हे खरे असले तरी बहुतांश मंडळी हिवाळा आणि पावसाळा हेच उत्तर देतील. अगदी नक्की. आम्हाला उन्हाळा आवडतो, असे सांगणारी अगदी कमी मंडळी असतील. अंगाची काहिली करणारा, घामाच्या धारा काढणारा, जीवाची तगमग करणारा, सगळीकडे रखरखीतपणा आणणारा हा उन्हाळा अगदी नकोसा होतो.
    उन्हाळा संपून कधी एकदा पावसाळा सुरू होतो, याचे वेध आपल्याला एप्रिल महिन्यापासूनच लागतात. पावसाला सुरुवात झाली की रखरखीत झालेल्या वातावरणात एकदम बदल होतो. तप्त झालेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडतो, तेव्हा येणारा मातीचा सुगंध मन धुंद करून टाकतो. असं वाटतं की हा वास आपल्या श्वासात भरून घ्यावा किंवा कोणीतरी संशोधन करून पहिल्या पावसानंतर येणाऱया सुगंधाचं परफ्युम/अत्तर तयार करावे.
    मे महिन्याच्या शेवटापासून पावसाचे वेध लागायला सुरुवात होते. आकाशात मळभ दाटून आलेले असते. उन-सावलीचा खेळ सुरू झालेला असतो आणि एकदाचा पाऊस सुरू होतो.
    बघता बघता पावसाळा संपतो आणि थंडीचे दिवस सुरू होतात. पावसाळा संपून थंडी सुरू होण्यापूर्वीही वातावरणात आल्हाददायक बदल होतो. मोकळी शेते किंवा जमीन असेल तर वाऱयाच्या लहरींबरोबर एक वेगळा सुगंध आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. ही थंडी सुरू होण्याची चाहूल असते. थंडी हा ऋतू खरोखरच एकदम मस्त आहे. वातावरणात सुखद बदल झालेला असतो. बघा ना, उन्हाळ्यात आपल्याला कधी कधी एकदम गळून गेल्यासारखे वाटते, काम करण्याचा उत्साह नसतो, तसे थंडीचे नाही. झक्कास वातावरण असते. थंडी सुरू झाली की ती संपूच नये असे वाटते.
    पण फेब्रुवारीच्या मध्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. आता पावसाला सुरुवात होईपर्यंत अशाच घामाच्या धारा आणि अंगाची काहिली होत राहणार, याची आपण मनाशी खुणगाठ बांधतो. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसातील तापमान वाढता वाढता वाढे असेच होत चालले असून अमूक ठिकामी तापामापकाने ४९ अंशाचा तर तमूक ठिकाणी पन्नाशी गाठली अशा बातम्या वाचायला मिळतात. ज्या ठिकाणी इतके तापमान जात असेल, तेथील लोकांचे काय हाल होत असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांना आगीच्या ज्वाळांत वेढलो गेलोय, अशा पद्धतीने हा उन्हाळा भाजून काढत असतो.
    गंमत म्हणजे उन्हाळा संपून आपण पावसाळा कधी सुरू होतोय त्याची तसेच पावसाळा संपून हिवाळा कधी सुरू होतोय, त्याची आतुरतेने वाट पाहात असतो. पण हिवाळा संपून कधी एकदाचा उन्हाळा सुरू होतोय, असे आपण चुकुनही म्हणत नाही.
    एकूणच आपल्या सर्वांचा उन्हाळा हा नावडता आहे, तसाच तो कवी, गीतकार, लेखक यांचाही आहे. जरा आठवून पाहा. पाऊस, थंडी, वारा, चंद्र, चांदणे, गारवा, ढग याविषयी मराठी किंवा हिंदीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा किंवा उन या विषयी खूपच कमी आहेत. कविता किंवा लेखनातून उन्हाळ्यामुळे सगळीकडे झालेला रखरखीतपणा, सुकून गेलेली झाडे व धरती, शेतात पेरणी करण्यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी याचे वर्णन आलेले आहे. पण थंडी किंवा पाऊस जसा गुलाबीपणे रंगवलेला आहे तसे उन्हाळ्याबाबत झालेले नाही. असो.
    पण असे असले तरी माणसाचे मन कसे असते पाहा. अंगाची काहिली करणारा उन्हाळा नकोसा होतो, आणि पावसाला कधी एकदा सुरुवात होते, असे वाटते. धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली की सगळीकडे होणारा चिखल, ओलेपण, सूर्याचे न घडणारे दर्शन यामुळे कधी कधी कधी एकदाचा पाऊस संपतोय, असेही मनाला वाटून जाते. थंडी मात्र हवीहवीशी आणि संपूच नये असे वाटते.
    त्यामुळे उन्हाळा हा नकोसा वाटत असला आणि फक्त थंडी व पावसाळा हेच दोन ऋतू असावेत, असे वाटत असले तरी निसर्गचक्रानुसार हा प्रत्येक ऋतू वेळेवर सुरू होणे व संपणे गरजेचे असते. कारण निसर्गाने तशी योजना केलेली आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासून हे ऋतूचक्र पार बदलून गेले आहे. त्याला आपण माणसेच कारणीभूत आहोत. निसर्गाचा विनाश आणि पर्यावरणाची पार वाट लावल्यामुळे पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतही राहतो आणि थंडी मार्चपर्यंत पडते. तर जून संपून जुलै उजाडला तरी पाऊस सुरू होत नाही. अत्याधुनिक जीवनशैली, प्रगती आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरण पर्यायाने निसर्गाचा केलेला विनाश, नष्ट केलेली झाडे, डोंगर, प्रदुषित केलेल्या नद्या, तलाव, समुद्र यामुळे कोणकोणत्या समस्या समोर उभ्या ठाकल्या आहेत आणि भविष्यात भेडसावणार आहेत हे आपण पाहतोय, आपल्याला सर्व काही कळतय पण वळत मात्र नाही हे आपले आणि भावी पिढीचेही दुर्देव...
    (माझा हा मजकूर लोकसत्ता ब्लॉगवर २४ मे २०१२ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे)
    http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228556:2012-05-24-12-57-03&catid=235:2009-09-14-09-37-24&Itemid=235

    16 May 2012

    मंडळी सध्या उन्हाळा सुरू असून उकाड्याच्या काहिलीने आणि वैशाख वणव्याने अंग भाजून निघत आहे. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे त्यांचाही धुडगूस सुरू आहे. एवढी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे या दिवसात आणखी एका गोष्टीला खूप महत्व असते. वसंतपेय म्हणून ओळखले जाणारे कैरीचे पन्हे हे असतेच. पण त्याजोडीला आणखीही काही खास असते. सुरुवातीला ही गोष्ट सर्वसामान्यांच्या  आवाक्याबाहेरची असते. पण जसजसे दिवस सरतात, तसतशी ती आवाक्यात येऊ लागते. उन्हाळा आणि ही वस्तू खाल्ली नाही, असे होऊच शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने जसा जमेल तसा त्याचा आस्वाद घेतच असतो. त्याचे विविध प्रकारही आपण चाखत असतो. काय लक्षात येतय का,  अगदी बरोब्बर. आंबा
    उन्हाळा आणि आंबा हे जणू समीकरणच आहे. आंब्याचा रस अर्थात आमरस हा या दिवसात रोजच्या जेवणातील अविभाज्य भाग बनलेला असतो. आमरसाबरोबरच पन्हे, कैरीचे लोणचे, आंबापोळी, आंबावडी, मॅंगोपल्प, आम्रखंड, मॅंगो मिल्कशेक, आंबा आईस्क्रिम, कॅण्डी अशा विविध प्रकारे आपण या आंब्याचा आस्वाद घेत असतो.
    हे आंबापुराण एवढ्यावरच थांबत नाही तर तो मराठीतील काही गाण्यांचाही एक भाग झालेला आहे. मराठीतील अनेक गाण्यांमध्येही आंब्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात अगदी सहज ओठावर येणारे गाणे म्हणजे
    नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच
    सबकुछ पुल असलेल्या देवबाप्पा या चित्रपटातील हे गाणे ग. दि. माडगूळकर यांचे असून त्याचे संगीत पुलंचेच आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील या गाण्याची लोकप्रियता आज इतक्या वर्षांनंतरही कमी झालेली नाही. मराठी वाद्यवृंदातून आजही हे गाणे हमखास म्हटले जाते आणि या गाण्याला वन्समोअरही घेतला जातो. गाण्याचे सहजसोपे शब्द आणि मनात गुंजणारे संगीत यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे.
    गीतकार शांताराम आठवले यांनी शेजारी या चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यातही आंबा हा शब्द आलेला आहे.
    हासत वसंत ये वनी अलबेला हा
    प्रियकर पसंत हा मनी, धरणीला हा
    या गाण्याच्या पुढील कडव्यात
    घनवनराई बहरून येई,
    कोमल मंजुळ कोमल गाई
    आंबा पाही फुलला हा
    चाफा झाला पिवळा हा
    जाई जुई चमेलीला, भर आला शेवंतीला
    घमघमला हा
    अर्थात आता ऐकायला हे गाणे तसे दुर्मीळ आहे.
    आंबा हा शब्द असलेले आणखी एक लोकप्रिय गाणे म्हणजे सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील
    पाडाला पिकलाय आंबा ही लावणी.
    आला गं बाई आला गं, आला गं,
    आला आला आला,आला
    पाडाला पिकलाय आंबा
    तुकाराम शिंदे यांचे गीत आणि संगीत असलेली ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी अशा काही ठसक्यात सादर केली आहे की आजही ती रसिकांच्या ओठावर आहे. विविध वाहिन्यांवर गाण्यांच्या कार्यक्रमाचे होणारे रिअॅलिटी शो, नृत्याचे कार्यक्रम यातून हे गाणे आजही सादर झाले की वन्समोअर मिळतोच मिळतो.
    लहान मुलांच्या तोंडी असलेले आणि पारंपरिक गीत असलेले
    आंबा पिकतो, रस  गळतो
    कोकणचा राजा झिम्मा खेळतो
    या गाण्यातही आंबा हा शब्द आहे.
    कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ बी  यांनी लिहिलेले, वसंत प्रभू यांचे संगीत असलेले आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील लोकप्रिय
    चाफा बोलेना, चाफा चालेना
    चाफा खंत करी काही केल्या उमलेना
    या गाण्यातही आंबा हा शब्द आहे.
    गेले आंब्याच्या वनी,
    म्हटली मैनेसवे गाणी
    आम्ही गळ्यात गळे मिळवूनी रे
    असे कवीने पुढील कडव्यात म्हटले आहे.
    गीत, संगीत आणि गायक अशा भूमिकेतील संदीप खरे यांच्या
    मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
    मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
    या गाण्यातही आंबा आलेला आहे.
    गाण्याच्या शेवटच्या कडव्यात संदीप खरे यांनी
    मज जन्म फळाचा मिळता मिळता मी केळे झालो असतो
    मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
    मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
    मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही
    असे म्हटले आहे.
    काही वर्षांपूर्वी प्रदशिर्त झालेल्या जोगवा या चित्रपटातील संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिलेल्या
    मन रानात गेलं गं, पानापानात गेलं गं
    मन चिंचेच्या झाडात, आंब्याच्या पाडात गेलं गं
    या गाण्यातही आंबा या शब्दाचा वापर केलेला आहे. याचे संगीत अजय-अतुल यांचे आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यावर हे गाणे चित्रित झाले असून ते श्रेया घोषाल यांनी गायलेले आहे.
    आंबा हा शब्द असलेले आणखी एक लोकप्रिय गाण्याने या आंबा पुराणाची सांगता करतो.
    बालकराम वरळीकर यांनी गायलेल्या
    गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय
    दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय
    या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याचा उल्लेख असून
    आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर
    पोरीचा  बापूस कवठं चोर
    करवल्या खुडतांना आंब्याच्या डांगल्या
    म्हायेरा जावा सांजवल
    आंब्याची डांगली हलविली
    नवऱयाने नवरीला पलविली
    असे यातील शब्द आहेत
    तर आंबा हा शब्द असलेली अशी ही विविध गाणी. दुधाची तहान ताकावर या उक्तीप्रमाणे आज न परवडणारा आंबा या गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला चाखायला मिळतो हेही काही कमी नाही.

    (माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवरील ब्लॉगमध्ये १५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)
    त्याची लिंक अशी-
    मंडळी सध्या उhttp://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=226847:2012-05-15-14-10-06&catid=235:2009-09-14-09-37-24&Itemid=235

    13 April 2012

    तरंगते अभंग संत तुकाराम यांच्या भिजक्या वहीतील

    संत तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील ‘भिजक्या वहीचे अभंग’ हे पुस्तक ६२ वर्षांनंतर पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. पुनर्मुद्रित पुस्तकाची विशेष बाब म्हणजे या पुस्तकासोबत तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील (मोडी लिपीतील) पाच अभंग असलेले आणि विशिष्ट रासायनिक प्रक्रिया केलेले एक पान पाण्यावर तरंगणारे आहे. 
    alt


    तुकाराम महाराजांच्या वंशजांकडे १९३० पर्यंत असलेले तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील अभंग हे ‘भिजक्या वहीतील अभंग’ म्हणून ओळखले जात होते. बॅ. बाबाजी परांजपे यांनी देहू येथे जाऊन या वहीतील अभंग उतरवून घेतले आणि १९५० मध्ये या अभंगांचे पुस्तक काढले. बाबामहाराज सातारकर यांच्या वडिलांनी निरुपण केलेल्या या अभंगांचे पुस्तक धनंजयराव गाडगीळ यांनी प्रकाशित केले होते.


     अत्यंत दुर्मिळ असलेल्या या पुस्तकाच्या फक्त तीन प्रती उपलब्ध होत्या. अभ्यासक आणि तुकाराम महाराज यांच्या भक्तांसाठी ‘वरदा प्रकाशन’ या संस्थेने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे.  बॅ. बाबाजी परांजपे यांच्या मूळ पुस्तकाच्या तीन प्रती पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, तुकाराम महाराज पादुका मंदिर आणि तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळाचे दिलीप धोंडे यांच्याकडे होत्या. धोंडे यांनी त्यांच्याकडील प्रत आम्हाला दिली आणि आम्ही त्या मूळ पुस्तकावरून हे पुस्तक पुनर्प्रकाशित केल्याचे वरदा प्रकाशनाचे ह. अ. भावे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. 


    मासिकाच्या आकारातील सुमारे ३९२ पानाच्या या पुस्तकात पाच अभंगांचे स्वतंत्र पान देण्यात आले आहे. पाच अभंगांचे एक पान फ्रेम करून घेण्यासाठी तर एक पान वेगळ्या प्रकारे उपलब्ध करून दिले आहे. रासायनिक अभियंता असलेले आमचे मित्र शरद हर्डिकर यांनी तयार केलेले विशिष्ट रसायन या पानासाठी वापरण्यात आले असून त्यामुळे हे पान पाण्यात बुडत नाही किंवा बुडवले तरी खराब न होता तरंगणारे असल्याची माहितीही भावे यांनी दिली.

    संत तुकाराम यांच्या मूळ अभंगगाथेत सुमारे साडेचार हजार अभंग असून त्यात या भिजक्या वहीतील साडेसातशे अभंगांचाही समावेश आहे. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकात हे साडेसातशे अभंग  आहेत. मूळ वहीतील ३६० ते ३६४ या क्रमांकांचे पाच अभंग आम्ही वेगळ्या पानावर दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही हे तरंगणारे पान तयार केले असून त्यामागे तुकाराम महाराज यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. मूळ पुस्तक पुर्नमुद्रित करताना काहीतरी वेगळे करावे, हाच उद्देश यामागे असल्याचेही भावे यांनी स्पष्ट केले.
    (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात (१३ एप्रिल २०१२) पान क्रमांक ७ वर प्रसिद्ध झाली आहे)

    12 April 2012

    तुकाराम महाराज यांचे चरित्र आता कोंकणीत

    आपल्या विविध अभंगांमधून सामाजिक समरसतेचा संदेश देणारे तसेच समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यावर कोरडे ओढणारे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्वाचे संत तुकाराम यांचे चरित्र आता लवकरच कोंकणी भाषेत उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचाही कोंकणी अनुवाद असणार आहे. 


    गोवा राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे माजी अध्यक्ष, गोवा साक्षरता अभियानाचे संचालक आणि गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणारे पद्मश्री सुरेश आमोणकर हे तुकाराम यांचे चरित्र कोंकणीत अनुवादित करत आहेत. आमोणकर यांच्या ‘गीता प्रसार’ या संस्थेतर्फेच हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.


     संत तुकाराम यांच्यावरील ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर ह.भ.प. श्रीधर महाराज मोरे-देहुकर यांनी लिहिलेल्या तुकाराम महाराज यांच्या संक्षिप्त चरित्राचा आणि काही अभंगांचा कोंकणी भाषेत अनुवाद आमोणकर यांनीच केलेला आहे.

    यासंदर्भात ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती देताना आमोणकर म्हणाले की, तुकाराम महाराज यांनी समाजातील सर्व प्रकारच्या वैयक्तिक आणि सामाजिक ढोंगांवर कोरडे ओढले आहेत. त्यांनी  आपले अभंग आणि कृतीतून साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी सामाजिक समतेचा जो संदेश दिला, त्याचीच समाजाला सध्या गरज आहे. संत तुकाराम यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग आणि घटना यांचा यात समावेश असेल.    
    (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात ( १२ एप्रिल २०१२) पान क्रमांक दहावर प्रसिद्ध झाली आहे)