19 November 2011

‘शिवसेने’च्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे!



altमराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि आता महाराष्ट्रात प्रमुख राजकीय पक्ष म्हणून स्थान मिळविलेल्या ‘शिवसेना’या संघटनेच्या स्थापनेची मूळ कल्पना दिवंगत साहित्यिक, नाटककार आणि संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची होती. ५२ वर्षांपूर्वी अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात ‘शिवसेना’या नावाचा अग्रलेख लिहून मराठी तरुणांचे संघटन आणि या विषयीचा सविस्तर उहापोह केला होता.संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकाने महत्वाची भूमिका बजावली. अत्रे यांच्या घणाघाती लेखणीने आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. आचार्य अत्रे यांचे ‘मराठा’ हे दैनिक आता लवकरच  डिव्हिडीवर उपलब्ध होणार असून या डिव्हिडीमध्ये १५ नोव्हेंबर १९५६ ते १९६० च्या डिसेंबर अखेपर्यंतचे अंक असणार आहेत. आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै (आचार्य अत्रे यांच्या कन्या आणि ज्येष्ठ साहित्यिका शिरीष पै यांचे सुपुत्र) हे याविषयीची जबाबदारी सांभाळत आहेत. या निमित्ताने शिरीष पै यांनी ‘मराठा’च्या आठवणींना उजाळा देताना ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, १५ नोव्हेंबर १९५६ रोजी  ‘मराठा’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालखंडही याच सुमारास सुरू झाला. या डिव्हिडीत ‘मराठा’चे संपूर्ण अंक पाहायला मिळणार आहेत. ‘शिवसेना’ संघटनेची मूळ कल्पना माझ्या वडिलांची, आचार्य अत्रे यांचीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवादल या संघटनांप्रमाणे मराठी तरुणांची बिगर राजकीय विचारांची संघटना स्थापन करावी आणि त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे विचार अत्रे यांनी ‘मराठा’ मध्ये मांडले होते.
२५ जुलै १९५९ या दिवशी ‘मराठा’ दैनिकात ‘शिवसेना’याच नावाने अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. समाजापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे आणि त्यासाठी ‘शिवसेना’ या नावाने संघटना स्थापन करावी, असे त्यांनी सुचविले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन केले आणि त्यातूनच पुढे हिंदूवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र विचारांच्या मराठी तरुणांनी या मावळ्यांप्रमाणे एकत्र येऊन संघटित व्हावे, असे अत्रे यांनी सुचविल्याचे शिरीषताई म्हणाल्या.
अत्रे यांच्या या लेखानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाची संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अशी संघटना स्थापन करण्याचा विचार असेल, तर ‘शिवसेना’ हेच संघटनेचे नाव ठेवा, असेही प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचविले, आणि विचार पक्का होताच, संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. जून १९६६ मध्ये आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील मराठी तरुणांची संघटना साकार झाली..
(माझी ही बातमी लोकसत्ताच्या मुख्य अंकात पान क्रमांक १२ वर १९ नोव्हेंबर २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194502:2011-11-18-15-11-17&catid=26:2009-07-09-02-01-2

http://epaper.loksatta.com/17108/indian-express/19-11-2011#page/12/1

09 November 2011

शोध हरवलेल्या मुंबईचा

दिवसेंदिवस मुंबईत येणारे लोंढे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईची जुनी ओळख हरवली जात आहे. अरुण पुराणिक यांनी याच हरवलेल्या मुंबईचा शोध ‘हरवलेली मुंबई’ या पुस्तकात घेतला आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशन नुकतेच हे पुस्तक प्रकाशित केले आहे. शाहीर पठ्ठे बापुराव यांनी ‘मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका’ अशा शब्दात मुंबईवर लावणी लिहिली तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ‘या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची’ असे मुंबईचे वर्णनकेले. काळ बदलतो, सामाजिक गरजा बदलतात, वस्ती बदलते तशीच तेथील स्थानिक संस्कृतीही बदलते. म्हणूनच तिथे राहिलेल्या वयोवृद्ध मंडळींना मुंबई आता परकी वाटते. अशा या मुंबईच्या हरविलेल्या पैलूंवर पुराणिक यांनी प्रकाश टाकला असून पुस्तकातील काही लेख यापूर्वी ‘लोकसत्ता’, ‘साप्ताहिक लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. पुराणिक यांनी आपले हरविलेले बालपण परत जोपासण्यासाठी आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याकरिता अनेक ठिकाणी भेटी दिल्या, वयोवृद्धांच्या मुलाखती घेतल्या, संदर्भपत्रे, कागदपत्रे पाहिले. मुंबईची दुर्मिळ छायाचित्रे मिळवली आणि यातून ‘हरवलेली मुंबई’ हे पुस्तक साकार झाले आहे. पुराणिक यांचे मुंबईवरील विविध लेख वाचून ‘मॅजेस्टिक पब्लिकेशन’चे अनिल कोठावळे स्वत: त्यांना भेटायला गेले आणि यातून हे पुस्तक तयार झाले. स्मरणरंजनात घेऊन जाणारी मोठी कृष्णधवल छायाचित्रे हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे. चाळ संस्कृती, गिरगाव चौपाटी, पानसुपारी, नाक्यावरचे इराणी, चोरबाजार, पानवाले, क्षुधाशांती गृहे, मुंबईतील गणेशोत्सव, सार्वजनिक शौचालये, रामागडी, मुंबईतील वारांगना आणि अन्य विषयातून पुराणिक यांनी हरवलेल्या मुंबईचा शोध घेतला आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशन- संपर्क (०२२२४३०५९१४)
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ८ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झालेली बातमी)

08 November 2011

पुलकित गाणी

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच पु. ल. देशपांडे यांचा परिसस्पर्श ज्याला झाला, त्याचे सोने झाले. पुलंनी लिहिलेली नाटक, कथाकथन, चित्रपट पटकथा-संवाद, चित्रपटातील अभिनय किंवा एकपात्री अभिनय असो. पुलंनी या सर्वावर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांनी ‘पुल’कित केलेल्या गाण्यांबद्दलही असेच म्हणता  येईल. पुलंनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही तितकीच टवटवीत आणि गुणगुणावी वाटतात, यातच सर्व काही आले. पुलं म्हटले की सगळ्यांच्या ओठावर असलेले आणि मराठी वाद्यवृंदात सादर केल्या जाणाऱ्या गाण्यांमधील हमखास वन्समोअर घेणारे गाणे म्हणजे ‘नाच रे मोरा’. ‘देवबाप्पा’या चित्रपटातील हे गीत ग.
दि.मा. यांचे असून स्वर आशा भोसले यांचा आहे. आज ५८ वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेला आणि ज्या
चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली असा ‘सबकुछ’ चित्रपट म्हणजे ‘गुळाचा गणपती’. या चित्रपटातील ‘ही कुणी छेडिली तार’ (आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे), श्रीहरी विदुराघरी पाहुणा (माणिक वर्मा), इथेच टाका तंबू (आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे), केतकीच्या बनात, उतरत्या उन्हात (आशा भोसले) या गाण्यांचा उल्लेख करता येईल. याच चित्रपटातील पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘इंद्रायणी काठी’ हे गाणेही न विसरता येणारे. शाळेत असताना पाठ केलेली
‘इवल्या इवल्याश्या, टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी’ही कविता आपल्या आठवणीत आहे. ‘देवबाप्पा’ या चित्रपटातील हे गाणे आशा भोसले यांनी गायलेले आहे. पुलंकडे माणिक वर्मा यांनी गायलेली ‘कबिराचे विणतो शेले’, (देवपावला) ‘कुणी म्हणेल वेडा तुला कुणी म्हणेल वेडी मला’ (देवपावला) ‘जा मुली
शकुंतले सासरी’ (देवपावला), ‘तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं’, ‘हसले मनी चांदणे’ ही गाणीही रसिकांना माहितीची आहेत. मंगेश पाडगावकर यांचे शब्द आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर लाभलेली पुलंची आणखी दोन लोकप्रिय गाणी ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ आणि ‘माझे जीवन गाणे’. या गाण्यांची गोडी अविट आहे. ‘माझिया माहेरा जा रे पाखरा’ (ज्योत्स्ना भोळे) हे गाणेही रसिकांना माहिती आहे. या सह ‘दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया’ (आशा भोसले), ‘माझ्या कोंबडय़ाची शान’ (पं. वसंतराव देशपांडे) आणि अन्य ‘पुल’कित गाणीही आहेत. साहित्यिक, नाटककार, एकपात्री प्रयोगकर्ते आणि कथाकथनकार पुल अशी त्यांची प्रामुख्याने ओळख असली तरीही गायक, हार्मोनिअम वादक आणि संगीतकार पुल अशी असलेली त्यांची ओळख या गाण्यांच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न. 

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ८ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर माझी ही बातमी प्रसिद्ध झाली आहे)
http://epaper.loksatta.com/16135/indian-express/08-11-2011#p=page:n=15:z=1

07 November 2011

दुर्मिळ पुस्तकांचा खजिना

ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नव्हे तर साहित्य आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे. विविध साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि ती वृद्धिंगत करण्याचे काम ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ ही संस्था गेली ११३ वर्षे करत आहे.
वाचन आणि साहित्यप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट १८९८ मध्ये गिरगाव येथील ठाकुरद्वार येथे संग्रहालय स्थापन केले. या संस्थापक मंडळींमध्ये गुर्जर, पीटकर, शेजवलकर, पागे, जोशी, बाक्रे, पुणतांबेकर, मोडक, गद्रे आदींचा समावेश होता. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते संग्रहालयाच्या ठाकुरद्वार शाखेचे उद्घाटन तर संग्रहालयाच्या दादर येथील वास्तूचे उद्घाटन पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. संस्थेच्या आज एकूण ४४ शाखा आहेत.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्यालय अधीक्षक सुनील कुबल यांनी ‘वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना सांगितले, की संग्रहालयाच्या सर्व शाखा मिळून १२ हजार ८०० सर्वसाधारण तर सुमारे साडेचार हजार आजीव सभासद आहेत. संस्थेकडे सुमारे पावणेतीन लाख पुस्तकांचा संग्रह असून नऊशेहून अधिक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे. आचार्य अत्रे यांचे ‘मराठा’चे अंकही संग्रहालयाकडे जतन करून ठेवण्यात आले आहेत. संग्रहालयाकडून ग्रंथालयाबरोबरच अन्य विविध उपक्रम राबविले जातात. मराठी संशोधन मंडळ, इतिहास संशोधन मंडळ, साने गुरुजी बाल विकास विभाग आदी संग्रहालयाचे उपविभाग आहेत. या उपविभागांतर्फे व्याख्याने, स्पर्धा, साहित्यिकांची जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रम, अन्य सांस्कृतिक आणि साहित्यविषयक उपक्रम आयोजित केले जातात.
संग्रहालयातर्फे संदर्भ विभाग चालविला जातो. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अभ्यासक आणि नागरिकही याचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेत आहेत. संग्रहालयाकडे असलेल्या काही दुर्मिळ पुस्तकांचे मायक्रोफिल्मिंग करण्यात आले असून यासाठी सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिराकडून आर्थिक मदत मिळाली होती. संग्रहालयाकडे १८६० पासूनची काही दुर्मिळ पुस्तके असून साधारणपणे १९५० पर्यंतची पुस्तके संगणकावर स्कॅन करून जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनोहर जोशी या उपक्रमासाठी निधी देणार असून अन्य खासदारांकडूनही मदत मिळविण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहितीही कुबल यांनी दिली. वैजनाथ शर्मा लिखित ‘सिंहासन बत्तीशी’ (१८१४), ग्रॅट डफ यांची ‘मराठय़ांची बखर’ (१८२९), दादोबा पांडुरंग यांचे ‘मराठी नकाशांचे पुस्तक’ (१८३९), सदाशिव छत्रे यांचे ‘इसापनीती कथा’ (१८५१) यासह अनेक जुनी दुर्मिळ पुस्तके संग्रहालयाच्या दादर येथील संदर्भ विभागाकडे आहेत.  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (दादर-पूर्व) ०२२-२४१३४२११/२४१२१९०१ संदर्भ विभाग- (०२२-२४१८५९६०)  संग्रहालयाचे संकेतस्थळ  www.mumbaimgs.org 

(हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त, ६ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाला आहे)

06 November 2011

ज्ञान भांडार

गेल्या दोनशे वर्षांच्या प्राच्यविद्या, भारतीय विद्या आणि सांस्कृतिक इतिहासाची मूक साक्षीदार असलेली मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी’ ही संस्था शब्दश: ज्ञानाचे भांडार आहे. दुर्मिळ हस्तलिखिते, पोथ्या, ग्रंथ, विविध भाषांमधील पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रे, दुर्मिळ वस्तू, संशोधन विभाग यामुळे संस्थेने वाचक, अभ्यासक, संशोधक यांनाही अनुभव आणि ज्ञानसमृद्ध केले आहे. २६ नोव्हेंबर १८०४ मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. altतेव्हा ही संस्था ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ म्हणून ओळखली जात होती. १९३० मध्ये तिचे नामकरण ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ असे झाले आणि १९४७ नंतर आता ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या नावाने ती ओळखली जाते. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत डॉ. अरुण टिकेकर हे गेल्या पाच वर्षांपासून एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
altपरळ येथे ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित १६ ब्रिटिश विद्वानांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. न्यायमूर्ती जेम्स मॉकिन्टॉस यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संस्था पश्चिम भारतातील संशोधनात्मक कार्य करणारी पहिली-वहिली संस्था होती. स्थापना झाल्यानंतर मॉकिन्टॉस यांचीच अध्यक्ष आणि विल्यम आस्किर्न यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. १८३० मध्ये परळ येथून संस्थेची वास्तू दक्षिण मुंबईत टाऊन हॉल येथे स्थलांतरित झाली. न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग, भगवानलाल इंद्रजी, डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर आदी दिग्गजांनी संस्थेची धुरा यापूर्वी सांभाळली आहे. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी एशियाटिक सोसायटीच्या संशोधन कक्षात बसून ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ चे खंड लिहिले. पुढे याच कामासाठी त्यांना ‘भारतरत्न’हा बहुमान मिळाला. ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिका दुर्गाबाई भागवत आणि अन्य अनेक मान्यवरांनी आपल्या सहभागाने ही संस्था मोठी केली आहे.
संस्थेकडे आज तीन लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह असून यात मराठीसह गुजराथी, हिंदूी, संस्कृत, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, फ्रेंच, इटालियन भाषेतील ग्रंथसंपदा आहे. संस्कृत भाषेतील सुमारे तीन हजारांहून अधिक दुर्मिळ हस्तलिखिते, पोथ्या आहेत. ‘लंडन टाइम्स’, ‘इंदूप्रकाश’, ‘बॉम्बे गॅझेट’ अशी जुनी वर्तमानपत्रेही येथे संग्रहित करण्यात आली आहेत. संस्थेकडे १५० वर्षांहून जुनी आणि दुर्मिळ अशी सुमारे दीड लाख पुस्तके असून ती डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या संग्रहात मौर्यकालीन आणि ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील सुमारे १२ हजार नाणीही आहेत. नालासोपारा येथे काही वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननात बौद्ध स्तुपाचे अवशेष मिळाले होते. एका मोठय़ा मातीच्या भांडय़ात सोने, चांदी, तांबे यांची छोटी भांडी सापडली होती. या सर्व वस्तूही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर या संस्थेच्या कामकाजाबाबत बोलताना म्हणाले, की संग्रहात असणाऱ्या दुर्मिळ पुस्तकांचे जतन, बायडिंग, मायक्रोफिल्मिंग, डिजिटलकरण आदी सर्व कामे संस्थेच्या वास्तूतच केली जातात. एकही पुस्तक बाहेर नेऊ दिले जात नाही. पुस्तकांचे जतन करण्यासाठी ग्रंथ दत्तक योजनाही कार्यान्वित आहे. संस्थेतर्फे जे संशोधनात्मक प्रकल्प हाती घेण्यात येतात, त्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि उद्योग जगताकडून देणगी मिळते. यातून असे उपक्रम आणि पुस्तक प्रकाशनाचे कामही केले जाते.
सोसायटीतर्फे सर्वसाधारण ग्रंथालय (वाचकांसाठी) आणि संशोधनात्मक चळवळ असे उपक्रम चालवले जातात. एशियाटिक सोसायटीतर्फे दरवर्षी १२ हून अधिक स्मृती व्याख्याने तसेच अन्य साहित्य-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. संस्थेकडे असलेल्या विविध दुर्मिळ वस्तूंची मालकी संस्थेकडेच अबाधित ठेवून या वस्तू छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या असून त्या लोकांना पाहण्यासाठी संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. परदेशी आणि परप्रांतीय संशोधक अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी एशियाटिक सोसायटीत मोठय़ा प्रमाणात येत असल्याचेही डॉ. टिकेकर यांनी सांगितले.
१९९४ मध्ये एशियाटिक सोसायटी आणि मध्यवर्ती ग्रंथालय यांचे विभाजन झाले.  संस्थेकडे असलेल्या ग्रंथसंपदेत कला, इतिहास, हस्तलिखिते, पोथ्या, आत्मचरित्र, इतिहास, तत्त्वज्ञान आदी विविध विषयांवरील पुस्तके आहेत. पाश्चात्त्य लेखक डान्टे यांच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ या मूळ इटालियन हस्तलिखितासह अनेक दुर्मिळ ग्रंथ संस्थेच्या संग्रहात आहेत. जणू ज्ञानाचे हे भांडारच!
एशियाटिक सोसायटी संपर्क ०२२-२२६६०९५६/२२६६५५६०
ई-मेल - asml@mtnl.net.in
संकेतस्थळ- www.asiaticsocietymumbai.org 

(लोकसत्ता-रविवार वृत्तान्तमध्ये ६ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)
http://epaper.loksatta.com/15963/indian-express/06-11-2011?show=clip#page=21:w=757:h=1344:l=25:t=247
या लिकवर ई-पेपरवरही हा लेख वाचता येईल

04 November 2011

आवाजाची ग्राफिक स्टोरी

दिवाळी अंकामध्ये ‘खिडकी चित्रे’ देण्याची सुरुवात करणाऱ्या ‘आवाज’ने पुढील वर्षीच्या ‘आवाज’च्या दिवाळी अंकात ‘ग्राफिक स्टोरी’ (चित्ररूप कथा) देण्याचा नवा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. दिवाळी अंकासाठी असा प्रयोग पहिलाच ठरणार असल्याचा दावा ‘आवाज’चे संपादक भारतभूषण पाटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
दिवंगत मधुकर पाटकर यांनी सुरू केलेल्या ‘आवाज’ची यंदा एकसष्टी होती. केवळ ‘विनोद’ विषयालाच वाहिलेल्या या मासिकाची धुरा आता पाटकर यांचे सुपुत्र भारतभूषण पाटकर पाहात आहेत. यंदाच्या वर्षी ‘आवाज’ दिवाळी अंकाच्या ३५ हजार प्रतींची विक्री झाली आहे.
आमच्या वडिलांनी ‘आवाज’ची घडी बसवून दिली. आम्ही तीच परंपरा पुढे सुरू ठेवली असून काळानुरूप अंकात काही बदल करत गेलो आहोत. मराठीतील तरुण वाचक (जो विशीच्या पुढे आहे) ‘आवाज’कडे वळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षीच्या दिवाळी अंकात आम्ही ‘ग्राफिक स्टोरी’ देणार असल्याचे सांगून पाटकर म्हणाले की, ‘चित्ररूप कथा’ असे त्याचे स्वरूप असेल. ही कथा किमान आठ पानांची आणि जास्तीत जास्त सोळा किंवा त्यापेक्षा अधिक पानांची असेल. आजच्या तरुणांना आवडेल असा कथेचा विषय असेल. या नव्या प्रयोगाविषयी सध्या आमची ‘आवाज’च्या परिवारातील विनय ब्राह्मणीया, गजू तायडे यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. आपल्याकडे लहान मुलांसाठी ‘कॉमिक्स’ पुस्तके आता बऱ्यापैकी लोकप्रिय झालेली आहेत, पण मोठय़ांसाठी मात्र अशा प्रकारची पुस्तके/कथा नाहीत. ‘आवाज’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग करत आहोत.
आमची नक्कल करणारे काहीजण नामसाधम्र्यासह बाजारात आपले अंक विक्रीस आणत आहेत. मात्र असे असले तरी ६१ व्या वर्षांतही ‘आवाज’ची लोकप्रियता कायम आहे हे यंदाच्या वर्षी जी विक्री झाली त्यावरून दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई या शहरी भागांबरोबरच राज्यभरातील ग्रामीण भागांत आणि गावांमध्ये ‘आवाज’ला मागणी आहे. ग्रंथालयांबरोबरच वैयक्तिकपणे ‘आवाज’ विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे पाटकर म्हणाले.

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ४ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)
http://epaper.loksatta.com/15791/indian-express/04-11-2011#p=page:n=17:z=1

03 November 2011

आठवणीतील कविता-बालभारतीच्या

शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता आपण अभ्यासाकरिता पाठ करत असतो. शाळा आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कधी तरी आपल्याला शाळेच्या दिवसांतील एखादी कविता किंवा त्यातील ओळ आठवते आणि आपण स्मरणरंजनात जातो. ‘बालभारती’मधील स्मरणरंजनात घेऊन जाणाऱ्या आठवणींच्या कवितांचा हा खजिना आता ई-पुस्तक स्वरूपात रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे. ई-साहित्य प्रतिष्ठानने या कवितांचे ई-पुस्तक प्रकाशित केले असून त्याची संकल्पना आणि संकलन सुरेश शिरोडकर यांचे आहे.
स्मरणरंजनाचा आनंद देणाऱ्या या कविता ‘बालभारती- आठवणीतल्या कविता’ या ई-पुस्तकात एकत्र करण्यात आल्या आहेत. ग. ह. पाटील यांच्या ‘छान किती दिसते फुलपाखरू’ या कवितेने आपण कवितांच्या खजिन्यात पाऊल टाकतो. इंदिरा संत यांची ‘गवतफुला’, ग. ह. पाटील यांचीच ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, कुसुमाग्रज यांची ‘उठा उठा चिऊताई’, मंगेश पाडगावकर यांची ‘टप टप पडती अंगावरती’, नारायण गोविंद शुक्ल यांची ‘लाल टांगा घेऊनी आला लाल टांगेवाला’, वा. भा. पाठक यांची ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे’, केशवकुमार यांची ‘आजीचे घडय़ाळ’ यासह इतर अनेक कविता येथे आहेत.
या कवींबरोबरच ना. धों. महानोर, वसंत बापट, प्रा. शंकर वैद्य, बा. भ. बोरकर, पद्मा गोळे, बालकवी, कवी ग्रेस, वामन पंडित, यशवंत, ना. घ. देशपांडे, ना. वा. टिळक, माधव ज्युलियन, केशवसुत, मोरोपंत, साने गुरुजी, भा. रा. तांबे आदींच्याही कविता या पुस्तकात असून कोणतीही कविता उघडून वाचायला सुरुवात केल्यानंतर वाचक नक्कीच शाळेच्या आठवणीत पोहोचतील.
या संदर्भात ‘वृत्तान्त’शी बोलताना शिरोडकर म्हणाले की, बालभारतीमधील आठवणीतल्या कवितांचा माझा ब्लॉग असून त्यावरही या कविता संकलित केल्या असून या सर्व कविता ई-साहित्य प्रतिष्ठानने पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिल्या भागात १५० कवितांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य कविता पुढील भागात देण्यात येतील. तसेच पहिला भाग वाचून रसिक वाचकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याची दखल घेऊन या सर्व कविता सुधारित स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तर ई-साहित्य प्रतिष्ठानचे वितरक सुनील सामंत यांनी सांगितले की, आजवर आम्ही १६० ई-पुस्तके प्रकाशित केली आहेत.
‘बालभारती- आठवणीतल्या कविता’ या उपक्रमात रसिक वाचकांनाही सहभागी होता येईल. उपक्रमास मदत करणाऱ्या वाचकाला ई-साहित्य प्रतिष्ठानच्या १५० ई-पुस्तकांचा समावेश असलेली सीडी भेट म्हणून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क
ई-साहित्य प्रतिष्ठान -esahity@gmail.com
सुरेश शिरोडकर -skarsuresh@gmail.com 

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त-३ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)

02 November 2011

प्रयोग ध्वनिचित्रमुद्रित मासिकाचा

संगणक, लॅपटॉप आणि सोशल नेटवर्किंग साईट्स ही आजच्या तरुणाईची ओळख झाली आहे. अनेक तरुण, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या गोष्टींचा सहज वापर करत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आणि मराठी साहित्यात एक वेगळा प्रयोग ठरेल असे ध्वनिचित्रमुद्रित ‘तुतारी’ हे मासिक येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. या प्रयोगाची सुरुवात ‘तुतारी’च्या ध्वनिचित्रमुद्रित दिवाळी अंकापासून झाली आहे.
या अनोख्या ध्वनिचित्रमुद्रित मासिकाची संकल्पना आणि संपादन शिवा घुगे यांचे आहे.
प्रभात प्रकाशनातर्फे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणारे तरुण प्रकाशक म्हणून घुगे यांची मराठी साहित्यविश्वाला ओळख आहे. ‘समकालीन संस्कृती’ हे मासिकही त्यांनी काही काळ चालवले. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या ‘कागदी बाण’ या पुस्तकाने त्यांनी प्रकाशनास सुरुवात केली. नवीन काही तरी करावे या एकमात्र उद्देशाने आपण ध्वनिचित्रमुद्रित मासिकाचा प्रयोग करण्याचे ठरवले असल्याचे घुगे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
‘तुतारी’च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी ‘पोवाडा आणि लावणी’ याविषयी केलेले विवेचन, कुमार सप्तर्षी यांनी ‘जागतिक क्रांती आणि देशातील आंदोलने’ या विषयावर व्यक्त केलेले मनोगत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सकपाळ यांनी कवितांचे केलेले निरूपण, शाहीर लीलाधर हेगडे यांनी सादर केलेला ‘गांधी हत्या’ आणि स्वातंत्र्यावरील पोवाडा, बाल्या नृत्य, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या जाहीर कार्यक्रमातील काही अंश आदी साहित्य असल्याचे सांगून घुगे म्हणाले की, अंकातील सहभागी मान्यवरांनी कोणतेही मानधन न घेता आपला सहभाग दिला आहे.
दर महिन्याला एक विषय घेऊन ‘तुतारी’ हे ध्वनिचित्रमुद्रित मासिक प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. डिसेंबर महिन्यातील अंक ‘निवडणूक’ विशेष तर जानेवारी महिन्यातील अंक ‘कविता’ या विषयावरील असेल.  मासिकासाठी एक हजार सभासदांकडून शंभर रुपये घेऊन ‘तुतारी’चे अंक डीव्हीडी स्वरूपात देण्याचा विचार आहे. तसेच या उपक्रमास कोणा प्रायोजकाकडून आर्थिक मदत मिळाली तर ‘तुतारी’चा दिवाळी अंक आणि प्रकाशित होणारे पुढील अंक ‘फेसबुक’वर टाकण्याचा प्रयत्न असल्याचेही घुगे यांनी सांगितले.
कवी केशवसुत यांनी आपल्या ‘तुतारी’ या कवितेत ‘एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने’ असे म्हटले होते. अपघातामुळे डाव्या पायाला झालेले फ्रॅक्चर आणि त्यामुळे पायाला आलेले अपंगत्व, फीट येणे अशा शारीरिक व्याधींवर मात करून जिद्दीने घुगे यांनी ध्वनिचित्रमुद्रित मासिकाच्या अनोख्या मासिकाची ‘तुतारी’ तर फुंकली आहे.. घुगे यांचा संपर्क- ८१०८२६१५२५/ ८६५५५२३४३०

(ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)

14 September 2011

आठवणींचा आल्बम

ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांना प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी वाहिलेली श्रद्धांजली आठवणींचा आल्बम
माझी  ही बातमी लोकसत्ता- १४ सप्टेंबर २०११ च्या मुख्य अंकात पान २ वर प्रसिद्ध झाली आहे. 
------
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित ते काजोल आणि अन्य ‘तारांगणा’बरोबरच लष्करी शिस्तीचे सॅम माणकेशा, भारतातील विमान उद्योगाचे जनक जे. आर. डी.टाटा, उद्योगपती रतन टाटा, क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर ते कला, उद्योग, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे खरे तर अशा मान्यवरांचे व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव आणि साक्षात ती व्यक्ती छायाचित्रातून उलगडणारे ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष आज आपल्यात नाहीत, यावर खरेतर विश्वासच बसत नाही.
गेल्या तीन दशकात छायाचित्रण, लेखनात त्यांनी केलेली मुशाफिरी आणि छायाचित्रण कलेत केलेले काम विसरता येणे शक्य नाही. माझ्यासाठी ते श्रद्धास्थान होते. मी त्यांच्याकडे पाहूनच छायाचित्रकार झालो. छायाचित्रण कलेच्या पलिकडेही ते माणूस म्हणून खूप मोठे होते. माझे भाग्य की मला त्यांच्या सहवासात खूप काळ घालवता आला. गौतम राजाध्यक्ष हे छायाचित्रण कलेतील माझे आदर्श होते. मोठे झाल्यावर ‘गौतम राजाध्यक्ष’ व्हायचे, असे मी मनाशी ठरवले होते.
आमीर खान याचा ‘बाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी नवखा होतो. छायाचित्रणाला नुकतीच सुरुवात केली होती. या चित्रपटात आमीर खानवर स्त्री वेषात एक गाणे चित्रित करण्यात आले होते. त्या गाण्याचे करण्यात आलेले चित्रिकरण पाहण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आले होते. या वेळी मी पहिल्यांदा त्यांना पाहिले. त्यांना पाहून मी भारावून गेलो होतो. या प्रसंगानंतर माझी आणि त्यांची दोन-चार वेळा भेट झाली. आमचा परिचय वाढला. मी काढलेली छायाचित्रे घेऊन त्यांना दाखवायला त्यांच्या घरी जायचो. छायाचित्रे पाहून ते त्यांचे स्पष्ट मत व्यक्त करत असत. छायाचित्रे आवडली तर मनापासून कौतूक करायचे आणि आवडली नाहीत तर ते सुद्धा सांगायचे.
गौतम राजाध्यक्ष यांच्या छायाचित्रांबद्दल बोलायचे तर त्यांच्या छायाचित्रात साधेपणा होता. त्यांच्या छायाचित्रांत कोणतेही ‘गिमिक्स’ नसायचे.त्यांनी काढलेल्या छायाचित्रातून ती व्यक्ती आणि त्यांचा स्वभाव अलगद उमटायचा. कोणतेही गिमिक्स न करताही चांगले छायाचित्र कसे काढायचे, हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री त्यांच्यासमोर खुलतात कसे? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. पण त्यांचे व्यक्तिमत्वच असे होते की ते त्यांच्यासमोर बसलेल्या कोणत्याही व्यक्तिला आपलेसे करायचे. कितीही मोठी व्यक्ती असली तरी ती त्यांच्यापुढे खुलायची. ‘शब्देविणू संवादू’ अशी त्यांची खासियत होती. त्यांची छायाचित्रे साधी असूनही ती खूप बोलकी होती. ते ही डिजिटल कॅमेऱ्यावर छायाचित्रे काढायचे. पण त्यातही आपले वेगळेपण त्यांनी शेवटपर्यंत जपले.
अन्य क्षेत्रातील एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेली तर त्या व्यक्तिचा वारसा पुढे चालवला जातो. पण छायाचित्रण हा असा एक व्यवसाय आहे की, राजाध्यक्ष यांच्याबरोबरच ती कला आता संपली आहे. त्यांनी काढलेल्या छायाचित्रातून ते आपल्या सदैव बरोबर असतील आणि स्मरणातही राहतील. पण आता त्यांनी काढलेली छायाचित्रे आपल्याला पाहता येणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच माझे आणि त्यांचे बोलणे झाले होते. लवकरच ते माझा नवा स्टडिओ पाहण्यासाठी येणार होते. पण त्यांच्या अचानक जाण्याने आता ते कधीच घडू शकणार नाही आणि ही खंत माझ्या कायम मनात राहील..
(शब्दांकन-शेखर जोशी)

या बातमीची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181838:2011-09-13-17-01-49&catid=212:2009-08-18-16-27-

11 September 2011

श्लोक गणेश-९ स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम्

लेखमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा अष्टविनायक स्थानांची नावे असलेला श्लोक घेतला आहे.  महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांप्रमाणेच गणपतीची ही आठ स्वयंभू स्थाने प्रसिद्ध आहेत. भाविक आणि गणेशभक्त अष्टविनायकाची ही यात्रा नेमाने करत असतात. या आठ स्थानांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्य़ात (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री), दोन रायगड जिल्ह्य़ात (महड व पाली)आणि एक अहमदनगर (सिद्धटेक) जिल्ह्य़ात आहे. अष्टविनायक स्थानातील प्रत्येक गणपती स्वतंत्र नावाने ओळखला जातो. अष्टविनायकातील पहिला गणपती हा मोरगावचा ‘मयुरेश्वर’ आहे. थेऊरचा दुसरा गणपती हा  ‘चिंतामणी’, सिद्धटेकचा तिसरा गणपती ‘सिद्धिविनायक’, रांजणगावचा चौथा गणपती ‘महागणपती’, ओझरचा पाचवा गणपती हा ‘विघ्नेश्वर’ या नावाने भक्तांमध्ये परिचित आहे. सहावा गणपती हा लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मक’म्हणून, महडचा सातवा गणपती ‘वरदविनायक’ आणि शेवटचा पाली येथील आठवा गणपती ‘बल्लाळेश्वर’ नावाने माहितीचा आहे.  अष्टविनायकांतील सर्व स्थानांचे वर्णन करणारा श्लोक आपल्या सर्वाच्या परिचयाचा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात विविध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात किंवा घरोघरीही आरतीनंतर हा श्लोक म्हटला जातो. अभिनेता-दिग्दर्शक सचिन यांचे वडील शरद पिळगावकर यांच्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटाच्या अखेरीस या सर्व अष्टविनायकांचे दर्शन घडविणारे गाणे आहे. हे गीत जगदीश खेबूडकर यांचे असून संगीत अनिल-अरुण यांचे आहे. या गाण्यातील प्रत्येक कडव्याला मराठीतील आघाडीच्या गायकांनी आपला आवाज दिला असून मराठीतील अनेक अभिनेते-अभिनेत्री यांच्यावर यातील प्रत्येक कडवे चित्रित करण्यात आले आहे. आज इतक्या वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. या गाण्याच्या सुरुवातीला अष्टविनायकातील सर्व गणपतींची नावे गुंफलेला
स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्
बल्लाळम्  मुरुडम् विनायक मढम् चिंतामणींस्थेवरम्
लेण्याद्रिम् गिरिजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजणसंस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्
हा प्रसिद्ध श्लोक आहे. हा श्लोक संस्कृत भाषेतील असून या रचनेला ‘अष्टक’ रचना असे म्हणतात. गणपतीचा हा श्लोक आपण लग्नकार्यात वर्षांनुवर्षे ‘मंगलाष्टक’ म्हणून ऐकत आणि म्हणत आलो आहोत.  या श्लोकाचे एक खास वैशिष्टय़ म्हणजे हा श्लोक केवळ विशेष नामांनी तयार झाला आहे. श्लोकाच्या अखेरीस सर्व काही मंगलमय होवो, एवढी एकच ओळ येते. संपूर्ण श्लोकात अष्टविनायक स्थाने आणि नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. आरतीनंतर हा श्लोक किंवा अष्टविनायकाच्या या स्थानांच्या प्रत्येक गणपतीचे नाव घेऊन त्याचा गजर केला जातो. 

(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई रविवार वृत्तान्तमध्ये ११ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी)
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181463:2011-09-10-17-01-26&catid=41:2009-07-15-03-58-1

10 September 2011

श्लोक गणेश- ८ गणपती तुझे नाव चांगले

‘श्लोक गणेश’ या लेखमालिकेत आजवर आपण जे विविध श्लोक घेतले त्यातील आजचा श्लोक सगळ्यात सोपा आणि सहज अर्थ समजेल असा आहे. हा श्लोक घरी किंवा शाळेत नेहमी म्हटला जातो. हा श्लोक आणि त्यातील शब्द इतके सोपे आहेत की नुकत्याच बोलायला लागलेल्या लहान मुलालाही तो अगदी सहज म्हणता येऊ शकेल.
गणपती तुझे नाव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरीनंदना
हे दयानिधे, श्री गजानना
या ओळी वाचतानाच आपल्याला याचा अर्थ लक्षात येईल. या श्लोकात गणपतीच्या नावाचा उल्लेख करून गणपतीची स्तुती करण्यात आली आहे. आपल्या सर्वाच्या आवडत्या गणपती बाप्पाची अनेक नावे असून त्यातील विनायक, एकदंत, हेरंब, गौरीपुत्र, वक्रतुंड, भालचंद्र, कृष्णपिंगाक्ष, लंबोदर, चिंतामणी अशी नावे आपल्या सर्वाना माहिती आहेत.
गणपतीचे मस्तक हत्तीचे, मोठे कान, बारीक डोळे, मोठे पोट असे बाह्य़ रूप असले तरी त्याचे हेच रूप सगळ्यांना आवडते, भावते. गणपतीचे हे रूप पाहून भक्तांना आनंद होतो. त्याच्या रूपात आणि नामात भक्त रंगून जातात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी, चिंता, महागाई आणि अन्य प्रश्न भेडसावत असले तरी दरवर्षी येणाऱ्या गणपतीमुळे  सारे वातावरण बदलून जाते. ‘नेमेची येतो गणपती’ असे असले तरी केवळ त्याच्या नावाने आपले दु:ख, चिंता, क्लेश आपण विसरतो आणि आनंदाने त्याचे स्वागत करतो. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘सुखकर्ता-दु:खहर्ता’ या आरतीत ‘दर्शन मात्रे मन कामनापूर्ती’ असे जे म्हटले आहे, त्याची अनुभूती आपण घेत असतो.  भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत त्याची पूजा, आराधना केल्यानंतर त्याला निरोप देताना आपल्याला वाईट वाटते. ‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशी आपली अवस्था होते. आजच्या श्लोकात हेच वेगळ्या शब्दांत सांगितले आहे. हे गणराया, गजानना अरे तुझे नाव खूप चांगले आहे. ते सगळ्यांना आवडणारे आहेच पण तुझे नाव घेतले की  तुझ्या नामात आमचे मन अगदी रंगून जाते. आमच्या चिंता, क्लेश दूर पळून जातात. गणपतीला आपण सुखकर्ता आणि दु:खहर्ता त्यासाठीच म्हणतो. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव गौरीनंदन असे आहे. गणपती हा पार्वतीचा पुत्र. पार्वतीचे आणखी एक नाव गौरी असेही आहे. त्यामुळे हे गौरीपुत्रा, विघ्नहर्त्यां गजानना आम्ही तुझी प्रार्थना करत आहोत, असा या श्लोकाचा अर्थ आहे.

(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तमध्ये (१० सप्टेंबर २०११)च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181253:2011-09-09-15-18-34&catid=41:2009-07-15-03-58-1  

09 September 2011

श्लोक गणेश-७ ओम नमोजी गणनायका

‘श्लोक गणेश’च्या आजच्या भागात घेतलेला श्लोक हा रूढार्थाने श्लोक नाही. संत रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘दासबोध’ या ग्रंथातील ती रचना आहे. अन्य श्लोकांप्रमाणे हा श्लोक म्हटला जात नसला तरी चार ओळींची ही रचना श्लोकासारखीच आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ ही आरती प्रसिद्ध आहे. रामदास स्वामी यांचे आराध्यदैवत श्रीराम आणि हनुमान असले तरी त्यांनी आपल्या साहित्यातून गणपतीचीही स्तुती आणि आराधना केली आहे. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांची सुरुवातच ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ अशी केली आहे.
रामदास स्वामी यांच्या ‘दासबोध’ या ग्रंथाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासाची सुरुवातही गणेश स्तवनाने केली आहे. रायगड जिल्ह्यातील शिवथर घळ येथे रामदास स्वामी यांनी ‘दासबोध’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ एकूण वीस दशकांमध्ये असून प्रत्येक दशकात दहा समास आहेत. प्रत्येक समासात रामदास स्वामी यांनी एक विषय घेऊन सर्वसामान्यांना मार्गदर्शन केले आहे.
पहिल्या समासात श्रोत्यांना ग्रंथाची माहिती देण्याबरोबरच ग्रंथाचे श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे ते सांगितले आहे. दासबोधाचा पहिला दशक हे ‘स्तवननाम’ असून त्यातील दुसऱ्या समासात रामदास स्वामी यांनी गणेश स्तवन केले आहे. गणेश स्तवनात एकूण ३० ओव्या आहेत.
 रामदास स्वामी यांनी गणेश स्तवन करताना-
ओम नमोजी गणनायका
सर्व सिद्धी फळदायका
अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा
असे म्हटले आहे.
संत ज्ञानेश्वरानीही ज्ञानेश्वरीचा आरंभ करताना-
ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
जयजय स्वसंवेद्या आत्मरूपा
देवा तूचि गणेशु, सकलमति प्रकाशु
म्हणे निवृत्तीदासु अवधरिजोजी
असे गणपतीचे वर्णन केले आहे.
रामदास स्वामी गणपतीला ओम नमोजी गणनायका असे म्हणतात. ओंकार हे गणेशाचे स्वरूप मानले जाते. गणपती याचा अर्थ गण, सैन्य यांचा प्रमुख, सेनापती, नायक अर्थात गणनायक अशा या गणेशाला माझा नमस्कार असो. गणपतीला सुखकर्ता आणि दु:खहर्ता असे म्हटले जाते. तो विघ्नहर्ता आहे. त्यामुळे शुभकार्याच्या प्रारंभी गणपतीचेच पूजन केले जाते. गणपती ही देवता भक्तांच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण करणारी आणि भक्तांचे अज्ञान दूर करुन चांगली बुद्धी देणारी आहे. म्हणूनच गणपतीला बुद्धीदाता असेही म्हटले जाते. 
दासबोधातील गणेश स्तवनाच्या सुरुवातीच्या या रचनेचा अर्थ समजायला सोपा आहे.
माझा  हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये ९ सप्टेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी



    08 September 2011

    श्लोक गणेश-६ नेत्र दोन हिरे प्रकाश पसरे

    दिवंगत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी गणपतीवर लिहिलेले ‘गणराज रंगी नाचतो’ हे गाणे प्रसिद्ध आहे. गाण्याचा स्वर लता मंगेशकर यांचा असून संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे. या गाण्यात गणपतीच्या पायात रुणझुण करणाऱ्या घागऱ्या असून कमरेला भरजरी पितांबर असल्याचे म्हटले आहे. तर संत तुकाराम यांनी ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ असे वर्णन केले आहे. अनेक संतकवी, शाहीर आणि गीतकार यांनीही आपापल्या परीने गणपतीच्या रूपाचे वर्णन केले आहे.
    आजच्या ‘श्लोकगणेश’ लेखमालिकेत गोसावीसुत वासुदेव कवी यांनी अगदी सहज-सोप्या भाषेत गणेशरूपाचे जे वर्णन केले आहे, तो चार ओळींचा श्लोक घेतला आहे.
    नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
    माथा शेंदूर झरे वरी बरे, दूर्वाकुराचे तुरे
    माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे
    गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरेश्वराला स्मरे
    गोसावीसुत कवी वासुदेव हे संत कवी आणि गाणपत्य संप्रदायातील होते. त्यांचा कार्यकाल इसवी सन १६५८ ते १७२८ असा मानण्यात येतो. सिंदखेड येथे राहणाऱ्या गोसावीसुत कवी वासुदेव यांनी या ठिकाणी एक गणेश मंदिरही बांधले आहे. यांच्या रचनांवर ज्ञानेश्वरी आणि दासबोधाच्याशैलीचा प्रभाव आहे.
    साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकातही या श्लोकाचा संदर्भ येतो. एका प्रसंगात श्यामची आई श्यामला कोणता श्लोक म्हटलास, लोकांना तो आवडला का? असे
    विचारते, त्यावर श्याम आईला श्लोक म्हटल्याचे खोटेच सांगतो. मी ‘नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे’ हा श्लोक म्हटला असल्याचे सांगून आईला हा श्लोक तो संपूर्ण म्हणून दाखवतो. तेवढय़ात शेजारची मुले येतात आणि ती श्यामच्या आईला, ‘यशोदाकाकू, सर्वजण श्यामला श्लोक म्हण असे सांगत असतानाही श्यामने श्लोक म्हटलाच नाही,’ असे सांगतात, असा एक भाग आहे.
    गोसावीसुत वासुदेव कवी यांनी रचलेला हा श्लोक समजण्यास अत्यंत सोपा आहे. गणपतीचे वर्णन करताना गोसावीसुत म्हणतात की, गणपतीचे डोळे म्हणजे जणू काही दोन हिरे आहेत. अस्सल हिऱ्याचा प्रकाश जसे आपले डोळे दिपवून टाकतो, त्याप्रमाणे नेत्री दोन हिरे असलेल्या गणपतीचे हे रूप भक्तांना आवडणारे व साजिरे असे आहे. गणपतीच्या माथ्यावर म्हणजेच डोक्यावर शेंदूर असून त्यावर वाहिलेल्या दूर्वा या मुकुटावरील एखाद्या तुऱ्यासारख्या शोभत आहेत. गणपतीचे रूप पाहून माझे चित्त हरपून गेले आणि माझ्या सर्व चिंता, काळज्याही मिटल्या. अशा या मोरयाला गोसावीसुत वासुदेव कवी नमस्कार करत असल्याचे या श्लोकात सांगण्यात आले आहे.

    (माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तच्या ८ सप्टेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180816:2011-09-07-15-42-55&catid=41:2009-07-15-03-58-1 

    07 September 2011

    श्लोक गणेश-५ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी

    ‘श्लोक गणेश’ लेखमालिकेतील आजच्या भागात सर्वाना माहिती असलेल्या श्लोकाची ओळख करून घेणार आहोत. हा श्लोक आपल्यापैकी अनेकजण दररोज सकाळी घरातील देवांसमोर हात जोडून म्हणतात. संस्कृतमधील हा श्लोक म्हणायलाही खूप सोपा आहे.
    वक्रतुंड महाकाय
    सूर्यकोटी सम:प्रभ
    निर्विघ्नम कुरु मे देव
    सर्वकार्येषु सर्वदा
    अगदी लहानपणापासून आपल्या सर्वाना हा श्लोक माहितीचा आहे. शाळेतही आपल्यापैकी अनेकांनी प्रार्थना झाल्यानंतर तो दररोज म्हटला असेल आणि आजही म्हणत असतील. श्रीनारदमुनी यांनी रचलेले गणपतीचे संस्कृत भाषेतील ‘प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायक’ हे स्तोत्र परिचयाचे आहे. संस्कृत भाषेतीलच ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष’ही अनेक भाविक रोज म्हणत असतात. ‘प्रणम्य शिरसा देवं’ हा  संस्कृत भाषेतील गणपतीची प्रार्थना असलेला सगळ्यात लहान श्लोक आहे. श्रीगणेशाला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानले जाते. कोणत्याही शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे स्मरण आणि पूजन केले जाते. कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पडण्यासाठी माणसाच्या प्रयत्नांबरोबरच परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता असते. समर्थ रामदासस्वामी यांनीही
    सामथ्र्य आहे चळवळीचे
    जो जो करील तयाचे
    परंतु तेथे भगवंताचे
    अधिष्ठान पाहिजे
    असे म्हटले आहे.
    गणपतीला आपण ‘विघ्नहर्ता’ म्हणतो. कोणत्याही कार्यातील आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातीलही संकटे आणि अडचणी दूर करण्यासाठी भक्त मंडळी विघ्नहर्त्यां गणरायालाच साकडे घालतात.  वक्रतुंड याचा अर्थ वाकडे तोंड असलेला आणि महाकाय म्हणजे मोठे शरीर असलेला असा होतो. गणपतीला आपण लंबोदर या नावानेही ओळखतो. सर्वसामान्यत: एखादा मोठे पोट असलेला माणूस बेढब दिसतो. मात्र गणपतीचे हत्तीचे शीर असलेले आणि तुंदीलतनु असलेले हेच रूप भक्तांना लोभस दिसते. या श्लोकात गणपतीच्या रूपाचे वर्णन करण्याबरोबरच विघ्न दूर करण्याच्या त्याच्या गुणाची महतीही सांगण्यात आली आहे. उगवत्या सूर्याकडे आपण डोळे उघडे ठेवून पाहू शकतो. पण सूर्य जसजसा डोक्यावर येऊ लागतो, तसतसे त्याच्या तेजाकडे आपण पाहू शकत नाही. तेव्हा महाकाय शरीर असणाऱ्या आणि अशा कोटी कोटी सूर्याचे तेज सामावलेल्या गणराया माझ्या मार्गातील सर्व विघ्न/अडथळे तू दूर कर. माझ्या कामात मला यश दे, अशी प्रार्थना या श्लोकाद्वारे गणपतीला करण्यात आली आहे.   

    (श्लोक गणेश लेखमालिकेतील माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तच्या ७ सप्टेंबर २०११ अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180585:2011-09-06-15-54-11&catid=41:2009-07-15-03-58-1      

    06 September 2011

    श्लोक गणेश-४ प्रारंभी विनंती करू गणपती

    आजच्या ‘श्लोकगणेश’च्या भागात सर्वाना माहिती असलेला आणि साधी-सोपी आणि सर्वसामान्यांना सहज समजेल अशी भाषा असलेला श्लोक घेतला आहे. हा श्लोक वाचताना आपल्या सर्वाच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतील.  प्रत्येकाने शाळेत असताना हा श्लोक नक्कीच म्हटला असेल. आज तो पुन्हा वाचताना लहान झाल्यासारखे वाटेल. हा श्लोक अवघ्या दोन कडव्यांचा आहे.
    प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा
    अज्ञानत्व हरूनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा
    चिंता, क्लेश, दारिद्रय़ दु:ख अवघे देशांतरा पाठवी
    हेरंबा गणनायका गजमुखा चित्ता / भक्ता बहू तोषवी
    या श्लोकात मोरेश्वराची आराधना करण्यात आली आहे. अष्टविनायक अर्थात आठ स्वयंभू गणपती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. अष्टविनायक यात्रेला भक्तांच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे. या अष्टविनायकापैकी मोरगाव येथील ‘मयूरेश्वर’ गणपतीलाच मोरेश्वर असे म्हटले जाते. गणपती हा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहे. मंगलप्रसंगी सर्वप्रथम श्रीगणेशाचेच पूजन केले जाते. गणपती ही विद्येची अर्थात बुद्धीची देवता मानली जाते.
    श्लोकात या बुद्धीच्या देवतेची, प्रारंभी प्रार्थना करण्यात येऊन आपले अज्ञान दूर करावे आणि आपल्याला चांगली बुद्धी द्यावी, अशी विनंती गणपतीला केली आहे. प्रत्येकालाच आपण सुखी आणि आनंदी असावे, असे वाटत असते. मात्र सुख आणि आनंद सगळ्यांच्याच वाटय़ाला येत नाही. दैनंदिन जीवनात सर्वसामान्यांना चिंता, त्रास, काळजी, दु:ख, दारिद्रय़ असे अनेक क्लेश भोगावे लागतात. गणपतीच्या आशीवार्दाने, त्याच्या कृपाप्रसादाने हे क्लेश दूर व्हावेत, अशी त्याची अपेक्षा तो विघ्नहर्त्यांकडे व्यक्त करतो.
    याच श्लोकातील आणखी एक विशेष म्हणजे यात गणपतीची काही नावे चपखल गुंफण्यात आली आहेत. या नावांद्वारे १९ अक्षरांच्या ‘शार्दूलविक्रीडित’ या अक्षरगण वृत्ताच्या चालीतही हा श्लोक म्हणता येतो. श्लोकात गणपती, मोरेश्वरा, हेरंब, गणनायक, गजमुख आदी गणपतीची नावे आली आहेत.
    घराघरांमधून पूजा किंवा आरती झाल्यानंतर ‘प्रारंभी विनती करू गणपती’ हाही श्लोक भक्तीभावाने म्हटला जातो. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा अत्यंत सोप्या भाषेतील या श्लोकाद्वारे भाविक आपला सर्व भार त्या विघ्नहर्त्यांवर सोपवून आपले अज्ञान, दोष दूर होऊन चांगली बुद्धी देण्याची विनंती करत असतात.

    (माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (६ सप्टेंबर २०११)च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180379:2011-09-05-15-52-01&catid=41:2009-07-15-03-58-1

    04 September 2011

    श्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे

    गणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झाल्यानंतर रोजच्या परिपाठात किंवा आपल्या घरी एखादी पूजा / आरती झाल्यानंतर हा श्लोक म्हटला जातो.
    मोरया मोरया मी बाळ तान्हे
    तुझीच सेवा करू काय जाणे
    अन्याय माझे कोटय़ानकोटी
    मोरेश्वरा बा तू घाल पोटी
    सर्वसाधारणपणे आपण इतकाच श्लोक म्हणतो. मात्र त्यापुढेही
    कऱ्हेचे तिरी एकसे मोरगावू
    तिथे नांदतो मोरया जाण पाहू
    चला जाऊ यात्रे महापुण्य आहे
    मनी इच्छिले मोरया देत आहे
    असा आणखी एक श्लोक आहे.
    अष्टविनायकातील मोरगावचा मयुरेश्वर एक गणपती असून हे स्थान पुणे जिल्ह्य़ात आहे. गाणपत्य / गणपती संप्रदायाचे हे आद्यपीठ मानले जाते. गणेशपुराणात या स्थानाविषयी माहिती आहे. पूर्वी या गावात मोर मोठय़ा प्रमाणात होते. म्हणून या गावाला मोरगाव हे नाव पडले. मोरालाच मयूर असेही म्हटले जाते. मोरगावचा हा गणपती म्हणूनच मयुरेश्वर या नावाने ओळखला जातो.
    मोरया गोसावी हे गणपतीचे मोठे भक्त होते. त्यांचा जन्म याच ठिकाणी झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची स्थापना केली. मयुरेश्वराबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात येते.
    चक्रपाणी राजाला सिंधू नावाचा एक पुत्र होता. उग्र तपश्चर्या करून त्याने सूर्याला प्रसन्न करून घेतले आणि अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले. पुढे उन्मत्त झालेल्या सिंधूने देवांना जिंकून घेऊन त्यांचा छळ करायला सुरुवात केली. सर्व देव भगवान विष्णूंना शरण गेले. त्यांनी सिंधूशी युद्ध केले, पण त्यांचाही पराभव झाला. अखेरीस सर्व देव गणपतीला शरण गेले. श्रीगणेशांनी पार्वतीच्या पोटी अवतार घेतला. पुढे सिंधूशी युद्ध करून त्याला पराभूत केले. तेव्हापासून मोरगावच्या गणपतीला मोरेश्वर / मयुरेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले.
    आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा आणि आपल्याला जे हवे आहे ते देणारा हा गणपती असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. हे देवा गणेशा, मी अज्ञ आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा मी चुकीचे वागलो असेन, तर मला उदार अंत:करणाने क्षमा कर आणि माझ्या चुका व अपराध पोटात घाल, अशी विनवणी गणपतीला करण्यात आली आहे. ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’ हा श्लोक काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘उलाढाल’ या चित्रपटातील ‘देवा तुझ्या दारी आलो..’ या लोकप्रिय गाण्याच्या अखेरीस घेण्यात आला आहे. जगदीश खेबूडकर यांच्या या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याची सांगता याच पारंपरिक श्लोकानेच करण्यात आली आहे.

    (हा भाग लोकसत्ता-रविवार वृत्तान्त (४ सप्टेंबर २०११)मध्ये पान तीनवर प्रसिद्ध झाला आहे). त्याची लिंक अशी
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180118:2011-09-03-16-30-53&catid=166:2009-08-11-13-00-15&It

    03 September 2011

    श्लोक गणेश-२ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा

    महाराष्ट्रातील संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी यांना महत्त्वाचे स्थान आहे. श्रीराम आणि हनुमान हे उपास्यदैवत असलेल्या रामदास स्वामी यांनी या दैवतांच्या भक्तीबरोबरच बलोपासनेलाही प्राधान्य दिले होते. रामदास स्वामी यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. समर्थ रामदास स्वामी यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली. साधी-सोपी भाषा आणि परखड विचार हे त्यांच्या लेखनाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणता येईल.
    दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, अभंग, आरत्या, भूपाळी आदी विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले. त्यांच्या रचनांमधील ‘जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’, ‘धटासी असावे धट, उद्धटासी असावे उद्धट’, ‘केल्यांने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’, ‘सामथ्र्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’ अशी काही वाक्ये / ओव्यांनी मराठी भाषेत स्थान मिळवले आहे. सर्वसामान्य माणूसही नेहमीच्या बोलण्यात या ओव्यांचा वापर करत असतो. राष्ट्रउभारणी / राष्ट्रसंघटनेबरोबच रामदास स्वामी यांनी प्रपंच, परमार्थ, विवेक, लोकशिक्षण या विषयांवरही समाजाचे प्रबोधन केले आहे.
    रामदास स्वामी यांनी लिहिलेले ‘मनाचे श्लोक’ प्रसिद्ध आहेत. मनाच्या श्लोकांची एकूण संख्या २०५ इतकी आहे. ‘मनाचे श्लोक’ हे प्रत्येक व्यक्तीने समाजात आणि कुटुंबात कसे वागावे, प्रत्येकाला चांगली बुद्धी प्राप्त व्हावी, सर्वानी सन्मार्गाने चालावे, आपल्यातील दोष दूर व्हावेत या उद्देशाने समर्थानी त्यांची रचना केली आहे.
    मनाच्या श्लोकांची सुरुवात रामदास स्वामी यांनी
    गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
    मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
    नमू शारदा मूळ चत्वार वाचा
    गमू पंथ आनंद या राघवाचा
    या श्लोकाने केली आहे.
    या श्लोकात रामदास स्वामी यांनी गणेशाची स्तुती केली आहे. अवघ्या चार ओळींच्या या श्लोकात रामदास स्वामी प्रारंभीच ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ असे म्हणतात.
    ‘गण’ म्हणजे सैन्य आणि पती म्हणजे त्यांचा नेता. गणपती हा मोठा योद्धा असून तो विघ्नहर्ता आहे. गणपती हा सर्व गणांचा नेता / राजा आहेच पण तो ‘ईश’ सर्वा गुणांचा असल्याचे  समर्थ रामदास स्वामी म्हणतात. म्हणजेच प्रत्येक व्यकतीने आपल्यातील दोष, दुर्गुण दूर सारून चांगल्या गुणांचा, सद्विचारांचा, सन्मार्गाचा अंगीकार करावा, असे रामदास स्वामी यांना म्हणायचे आहे.
    ‘चत्वार वाचा’ म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाचांनी विद्येची आराधना करावी, असेही समर्थ सांगतात. ‘श्रीराम’ हे समर्थाचे उपास्य दैवत असून रामाला मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते. प्रत्येकाने सन्मार्गाने चालावे आणि आपल्यातील दोष काढून टाकून आनंदाने जीवन जगावे, असेच रामदास स्वामी यांना सांगायचे आहे. 

    (हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (३ सप्टेंबर २०११) च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
    http://epaper.loksatta.com/11164/indian-express/03-09-2011#p=page:n=17:z=1 

    02 September 2011

    श्लोक गणेश-१ श्री गणेशाय नम:

    श्री गणेशाय नम:
    चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. श्री गणेशाला अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपतीबाप्पाला प्रत्येक शुभकार्यात अग्रपूजेचा मान देण्यात आला आहे. पहिल्यांदा गणेशपूजन करूनच मंगलकार्याची सुरुवात केली जाते.
    घराघरांमधून साजऱ्या होत असलेल्या भाद्रपद महिन्यातील गणपती पूजनाला लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप दिले. हातात पाटी घेऊन त्यावर ‘श्री गणेशाय नम:’ असे लिहूनच आपल्या विद्याभ्यासाला सुरुवात होते. गेल्या हजारो वर्षांपासून आपल्या भारतात गणेशाची उपासना सुरू आहे. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही  गणेशाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. वेद हे भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात प्राचीन वाङ्मय मानले जाते. या वेदांमध्येही गणपतीची ‘ओंकार स्वरूप’म्हणून स्तुती केली आहे.
    सर्व संतांनीही आपल्या लेखनातून श्रीगणेश स्तुती केली आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ही आरती असो किंवा संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या सुरुवातीला  ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरुपा देवा तूचि गणेशु, सकल मति तू प्रकाशु
    अशा शब्दांत गणपतीची केलेली आराधना असो. नारदमुनी यांनी रचलेले ‘प्रणम्य शिरसा देवम्, गौरी पुत्रं विनायकम्’ हे स्तोत्र असो, ही काही प्रातिनिधिक उदाहरणे झाली.
    संस्कृत स्तोत्राप्रमाणेच आरती, भूपाळी, ओव्या, कवने, गाणी आदि विविध प्रकारच्या स्वरूपांतही गणेशाची आराधना आणि स्तुती करण्यात आली आहे. यात ‘श्लोक’ या वाङ्मय प्रकाराचाही समावेश होतो. संस्कृत भाषेबरोबरच मराठी भाषेतही गणपतीविषयक अनेक श्लोक आहेत. अवघ्या चार, सहा किंवा आठ ते दहा कडव्यांमध्ये रचनाकारांनी श्री गणेशाची स्तुती / आराधना केली आहे. सर्व संतांच्या वाङ्मयात किंवा काही प्राचीन ग्रंथात गणपतीची स्तुती करणारे श्लोक आहेत.  आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वाना माहिती असलेल्या आणि नसलेल्या अशा काही गणेश श्लोकांचे केलेले हे संकलन आणि त्यांचा घेतलेला आढावा. उद्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज एखाद्या श्लोकाचा आढावा या सदरात घेण्यात येईल.

    (हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (१ सप्टेंबर २०११) मध्ये पान एकवर प्रसिद्ध झाला आहे)
    http://epaper.loksatta.com/11020/indian-express/01-09-2011#p=page:n=17:z=1

    20 August 2011

    बोक्या सातबंडेवर साहित्य अकादमीची मोहर

    आकाशवाणीवरून ‘श्रुतिका’ पुस्तकाच्या माध्यमातून ‘कथा’ तसेच दूरदर्शन मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रवास झालेल्या ‘बोक्या सातबंडे’ला अलिकडच्या काळातील बालसाहित्याचा ‘नायक’ होण्याचेही भाग्य लाभले आहे. ‘बोक्या’च्या या गुणवत्तेवर साहित्य अकादमीनेही आपली मोहर उमटविली असून दिलीप प्रभावळकर यांना ‘बोक्या सातबंडे’साठी साहित्य अकादमीचा (बाल साहित्य) पुरस्कार जाहीर झाला आहे.
    राजहंस प्रकाशनाने ‘बोक्या सातबंडे’चे सात भाग प्रकाशित केले आहेत. एक ते पाच हे भाग आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या भागांवर आधारित होते. सहावा आणि सातवा भाग ‘लोकसत्ता’च्या लोकरंग पुरवणीतील ‘बालरंग’ पानावर प्रसिद्ध झालेल्या गोष्टींचे आहेत.
    पुरस्काराच्या निमित्ताने प्रभावळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ‘बोक्या सातबंडे’चा प्रवास उलगडला. ते म्हणाले आकाशवाणीच्या मुंबई ‘ब’ केंद्रावरील ‘बाल दरबार’ या कार्यक्रमातून ‘बोक्या’च्या गोष्टी श्रुतिका स्वरुपात पहिल्यांदा प्रसारित झाल्या. ‘बाल दरबार’चे निर्माते माधव कुलकर्णी यांनी ते सर्व भाग सादर केले होते. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या  २५ भागांना खूप लोकप्रियता मिळाली. पुढे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी त्याचे पुस्तक काढले. माजगावकर यांनीच सुचविल्यानुसार पुस्तकासाठी पुस्तकासाठी मी त्याचे पुन्हा नव्याने कथा स्वरुपात लेखन केले.
    आमच्या लहानपणी ना. धो. ताम्हनकर यांचा ‘गोटय़ा’, श्री. शं. खानविलकर यांचा ‘चंदू’ हे बालसाहित्याचे नायक होते. त्यानंतरच्या काळात भा. रा. भागवत यांच्या ‘फास्टर फेणे’ने वाचकांवर मोहिनी घातली होती. लहान मुलांसाठी मी लिहिलेल्या ‘बोक्या सातबंडे’या व्यक्तिरेखेने आकाशवाणी आणि पुस्तक माध्यमाबरोबरच दूरदर्शन मालिका आणि मराठी चित्रपटाच्या रूपानेही आपला ठसा उमटवला आहे. सध्या ‘बोक्या’ची १४ वी आवृत्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून त्यावरून ‘बोक्या’ किती लोकप्रिय आहे, त्याची सर्वाना कल्पना यावी, असेही प्रभावळकर यांनी सांगितले.
    ‘बोक्या सातबंडे’ हा आजच्या काळातील आहे. सध्याचे सभोवतालचे वातावरण, दैनंदिन ताण-तणाव, विविध प्रश्न यात मांडले आहेत. ‘बोक्या’च्या गोष्टीतील बोक्याबरोबरच आजी आणि दादा ही पात्रे वाचक आणि रसिकांना जास्त आवडणारी आहेत. यातील आजी लिहितांना माझ्या डोळ्यासमोर माझी आजी (वडिलांची आई) होती. मी दादरच्या ‘शारदाश्रम’सहकारी गृहनिर्माण संस्थेत वाढलो, लहानाचा मोठा झालो. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वातावरणाची पाश्र्वभूमीही ‘बोकया’मध्ये आहे. ‘बोक्या’च्या आणखी काही नवीन गोष्टी लिहीण्याचा विचार असल्याचेही प्रभावळकर म्हणाले.
    ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे स्वरूप असून तो येत्या नोव्हेंबर महिन्यांत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने तर गेल्या वर्षी मराठी रंगभूमीवरील योगदानासाठी संगीत नाटक अकादमीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
    साहित्य अकादमीच्या पुरस्काराने प्रभावळकर यांना आता तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.     

    (माझी ही बातमी लोकसत्ताच्या मुख्य अंकात( २० ऑगस्ट २०११) पान क्रमांक १५ वर प्रसिद्ध झाली आहे)
    http://epaper.loksatta.com/10197/indian-express/20-08-2011#p=page:n=15:z=1

    17 August 2011

    कोश संत साहित्यातील सुभाषितांचा

    ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी आणि तुकारामांच्या साहित्यातील पाच हजारांहून अधिक सुभाषितांचे संकलन ‘अतिथी’ या विषयावर संत ज्ञानेश्वर यांचे ‘जैसा अपमानिता अतिथी ने सुकृतीची संपत्ती’ हे तर संते एकनाथ यांचे ‘अतिथी जाता परान्मुख त्या सवे जाय पुण्य निक्षेप’ अशी सुभाषिते आहेत. तर ‘आरोग्य’ या विषयावर संत ज्ञानेश्वरांची ३७ सुभाषिते आहेत. याच विषयावर नामदेव-४, एकनाथ-८ रामदास स्वामी-१ आणि तुकाराम यांची ११ सुभाषिते या कोशात देण्यात आली आहेत...
    सुभाषिते ही संस्कृत भाषेतीलच असतात, हा समज दूर करण्याचा प्रयत्न  अठय़ाहत्तर वर्षांच्या रामभाऊ नगरकर यांनी केला आहे. अथक परिश्रम आणि अभ्यासातून नगरकर यांनी संकलित केलेला ‘संत सुभाषित कोश’तयार झाला आहे. या कोशात संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी आणि तुकाराम या पाच संतांच्या साहित्यातील ५ हजार १४७ सुभाषिते एकत्रित देण्यात आली आहेत.
    हा कोश पाचशे पानांचा असून तो मासिकाच्या आकारात आहे. गेली वीस वर्षे नगरकर या कोशावर काम करत होते. या पाच संतांचे सर्व साहित्य वाचून, त्यावर अभ्यास करून सुभाषिताचे निकष ज्याला चपखल बसतील, अशा ओळी त्यांनी अक्षरश: वेचून काढल्या आहेत. हा कोश पुण्याच्या डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केला असून येत्या २८ ऑगस्ट रोजी पुण्यात संत साहित्याचे अभ्यासक आणि पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अद्यासनाचे डॉ. यशवंत पाठक यांच्या हस्ते या कोशाचे प्रकाशन होणार आहे. या कोशाबाबत ‘वृत्तान्त’ला माहिती देताना नगरकर यांनी सांगितले की, या कोशात सुभाषित म्हणजे काय, ते ठरविण्याचे निकष कोणते, सुभाषिते मराठीत असू शकतात का, म्हणी आणि सुभाषिते यातील फरक, संस्कृत सुभाषिते असलेले विविध ग्रंथ, त्यांचा धावता आढावाही आपण घेतला आहे. सुभाषिते ही फक्त संस्कृत भाषेतच असतात, हा गैरसमज आपण या कोशाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुभाषितांची निवड करताना या कोशात त्याचे विषयवार वर्गीकरण करण्यात आले असून ११५ विषय घेण्यात आले आहेत. अतिथी, अभ्यास, आाकाश, आरोग्य, आरसा, गंध, गुरू, ग्रंथ, भक्ती, भीती, मद्य, मासा, मुक्ती, मोक्ष आणि अनेक विषयांवरील मराठी सुभाषिते या कोशात असल्याचे सांगून नगरकर म्हणाले की, कोशात परिशिष्ट देण्यात आले असून या प्रत्येक संतांचे सुभाषित कोठून घेतले त्याचा मूळ संदर्भ देण्यात आला आहे. 

    (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई आणि ठाणे वृत्तान्तमध्ये १७ ऑगस्ट २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे. मुंबई वृत्तान्तमधील बातमीची लिंक अशी
    http://epaper.loksatta.com/9978/indian-express/17-08-2011#p=page:n=19:z=1