24 July 2010

गुरुवंदन

"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"

उद्या २५ जुलै रोजी आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरुला/शिक्षकाला खूप महत्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृतीतही गुरुचे महत्व सांगितले आहे.

आपण वयाने लहान असू किंवा मोठे. आयुष्याच्या आरंभापासून ते अंतापर्यंत आपण नेहमी शिकत असतो. आपली ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. त्यामुळे आपल्याला गुरु किंवा शिक्षक कोणीना कोणीतरी असतोच. लहान असताना आपली आई आपला गुरु असते. घरातील मंडळी आपले गुरू असतात. शाळेत जायला लागल्यानंतर शाळेतील शिक्षक, पुढे महाविद्यालयातील शिक्षक आपले गुरु होतात. एखाद्या कलेचे शिक्षण आपण घेत असू तर ती कला शिकण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जातो, ते आपले गुरु असतात.

शिक्षण संपल्यानंतर आपण नोकरी-व्यवसायाला सुरुवात करतो. येथेही आपल्याला सुरुवातीला कोणीना कोणी शिकवत असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला करून देतात. त्या शिदोरीवर आपण आपली प्रगती करून घेत असतो. गुरु हा वयाने लहान किंवा मोठा असू शकतो. गुरु म्हणजे तो आपल्यापेक्षा मोठाच असला पाहिजे असे नाही. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याकडूनही आपण काही शिकत असतो.

आपल्या आय़ुष्यात तसेच समाजात वावरताना आपण शिकण्याची सवय ठेवावी.  मला सर्व काही येते, अशी भावना ठेवणे योग्य नाही. आपल्यात काही कमीपणा असेल, तर तो मोकळेपणाने मान्य करण्यात काही चूक नाही. तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आला असेल की आपल्याला न येणारी किंवा न जमणारी एखादी गोष्ट आपण दुसऱयाकडून शिकलो आहोत. जे दुसऱयाकडून शिकणे आहे, त्यालाच समोरच्याला मोठेपणा देणे आणि आपण शिष्यत्व पत्करणे असे म्हणता येईल.





    

23 July 2010

हा तर लोकमान्य टिळकांचा अपमान

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री म्हणून दिल्लीच्या राजकारणावर आणि समाजकारणावर सलग तीन टर्म आपला ठसा उमटवल्याबद्दल तसेच समाज सुधारणेसाठी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून मोलाचा सहभाग दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे.

केसरी-मराठा ट्रस्टतर्फे देशाच्या विकासात आणि सामाजिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेल्या व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. एक लाख रुपये, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या राजकारणावर आणि विकासावर काय ठसा उमटवला असेल तो असू द्या. पण शीला दीक्षित यांनी अलीकडेच अफजल गुरू प्रकरणी जी बोटचेपी आणि मुस्लिम लांगुचालनाची भूमिका घेतली होती, त्याचे काय, त्या बद्दल त्यांना कोण जाब विचारणार आहे की नाही, असे प्रश्न मनात येतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव त्यांनीच सुरू करून एका नव्या अध्यायाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जातीपातीच्या समाजाला त्यांनी एकत्र आणले. लोकमान्य टिळक हे प्रखर राष्ट्रवादी, तत्वनिष्ठ होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांची तत्वे आणि विचार पुढे नेणाऱया व्यक्तीला देणे हे अधिक योग्य ठरले असते.

काही दिवसांपूर्वीच संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुच्या फाशी प्रकरणावरून चर्चा रंगली होती. अफजल गुरुला फाशी होऊ नये असे दीक्षित यांना वाटत होते. कारण त्यांना म्हणजे दिल्ली सरकारने याबाबतचा अर्ज केंद्रीय गृहमंत्री/गृहमंत्रालयाकडे पाठवलाच नाही. याविषयी वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमातून माहिती जाहीर झाल्यानंतरचच हे सर्व उघड झाले. अफजल गुरुच्या फाशीबाबतचा अर्ज पुढे न पाठवून शीला दिक्षित यांनी कॉंग्रेसी मुस्लिम तुष्टीकरणाचा कित्ता गिरवला आहे.

भारताच्या संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुच्या फाशीसंदर्भात वेळकाढूपणा करणाऱया शीला दिक्षित यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा हा पुरस्कार देणे म्हणूनच योग्य वाटत नाही. मग भले त्यांनी खूप काही सामाजिक व राजकीय काम केले असले तरी शीला दिक्षित यांनी अफजल गुरुबाबत केलेल्या चुकीमुळे त्या लोकमान्य टिळकांच्या नावे देण्यात येणाऱया या सन्मानास पात्र ठरत नाहीत. त्यांना पुरस्कार देणे म्हणजे लोकमान्य टिळकांचाही अपमान आहे.

        

09 July 2010

ऐशा नरा मोजूनी माराव्या...

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच केंद्र शासनाकडून बेळगावप्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या आणि येथील कोट्यवधी जनतेच्या तोंडाला पाने पुसली जावीत, ही दुर्देवाची बाब आहे. गेली अनेक वर्षे सनदशीर आणि आंदोलनाच्या माध्यमातून बेळगावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्रातील मराठीप्रेमी  मराठी भाषेच्या मुद्यावर बेळगावचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, म्हणून लढा देत आहेत. पण या मागणीला वेळोवेळी वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

भाषेच्या आधारावर देशातील विविध राज्यांची निर्मिती झाली. पण महाराष्ट्रातील जनतेला आपले स्वताचे राज्य मिळविण्यासाठी १९६ हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. केंद्रातील कॉंग्रेस शासनाची महाराष्ट्राच्या बाबतीत नेहमीच आकसाची भूमिका राहिलेली आहे. मराठी भाषा, मराठी नेते यांनाही दिल्लीकडून अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. अर्थात याला काही नव्हे तर बऱयाच अंशी  महाराष्ट्रातील बेशरम राजकीय पुढारी आणि  राजकीय पक्ष जबाबदार आहेत. देशातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यातील राज्यकर्ते, राजकीय पक्ष, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपल्या राज्याच्या प्रश्नावर किंवा भाषेच्या मुद्यावर नेहमी एकत्र येतात. तेथील सर्वपक्षीय खासदारही संसदेत आणि दिल्लीत आपली वज्रमुठ दाखवतात. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याने, खासदाराने, किंवा सर्वपक्षीय खासदारांनी अशी एकजूट कधी दाखवली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर पं. नेहरू यांच्या तोंडावर बाणेदारपणे राजीनामा फेकणारे फक्त सी. डी. देशमुख. त्यांच्यानंतर दिल्लीश्वरांपुढे महाराष्ट्रतील एकाही नेत्याने, लोकप्रतिनिधीने किंवा केंद्रात मंत्रीपदे भुषविणाऱया मराठी मंत्र्यांनी असा बाणेदारणा कधीच दाखवला नाही. केंद्रात महाराष्ट्रातील अनेक मातब्बर नेत्यांना मंत्रीपदे मिळाली. पण त्याचा उपयोग त्यांनी स्वार्थासाठी केला. मराठी भाषा, महाराष्ट्रातील प्रश्न आदी प्रश्नांवर या मंडळींनी कधीही मराठी अस्मिता आणि अभिमान दाखवला नाही. मोडेन पण वाकणार नाही, असे मराठी माणसाबद्दल म्हटले जाते. पण हा समज दिल्लीत गेलेल्या मराठी नेत्यांनी खोटा ठरवला.

खरे तर केंद्र शासनातील मराठी मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय ४८ खासदारांनी ठरवले तर ते आपली एकजूट दाखवून मराठी बाणा  दिल्लीश्वरांना दाखवू शकतात. पण हाच तर मोठा प्रश्न आहे. केंद्राकडून मराठी जनतेचा वारंवार होणारा अपमान, अवहेलना याला महाराष्ट्रातील नालायक राज्यकर्ते, राजकीय पक्ष आणि नेतेच कारणीभूत आहेत. तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा असा दणका देण्याची गरज आहे.

लोकांच्या सहनशक्तीचीही एक मर्यादा असते. महाराष्ट्रातील जनतेची ही मर्यादा बेळगाव प्रश्नाबाबत कधीच संपली आहे. देशाच्या प्रथम नागरिक अर्थातच राष्ट्रपती या एक मराठी आहेत. केंद्रात सत्तारुढ असलेल्या आघाडीत अनेक मराठी मंत्रीही आहेत. पण यापैकी एकालाही या प्रश्नावर ठाम, ठोस आणि मराठी हिताची भूमिका घ्यावीशी वाटलेली नाही, हे आपले दुर्देव. सगळे घालीन लोटांगण हा नेहमीचा यशस्वी प्रयोग पार पाडत आहेत.

महाराष्ट्राला आज गरज आहे ती सी. डी. देशमुख  यांच्यासारख्या बाणेदार नेत्याची. असा नेता महाराष्ट्रला मिळेल का...           

08 July 2010

एका उडीची जन्मशताब्दी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मार्सेलिस येथील बंदरात बोटीतून जी ऐतिहासिक उडी मारली त्या घटनेला आज म्हणजे ८ जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आजच्या विविध वृत्तपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काही लेख आले आहेत. त्या सर्व लेखांच्या तसेच सावरकर यांच्याविषयी असलेल्या अन्य लिंक्स येथे देत आहे.

लोकसत्तामध्ये सागरा प्राण तळमळला  हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
१)http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=83978:2010-07-07-14-27-14&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10

२) मार्सेलिस-१९१० दूरगामी परिणाम करणारी उडी हा लेखही लोकसत्तामध्येच प्रसिद्ध झाला आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=84130:2010-07-07-17-31-16&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210

३)लोकसत्ताचा अग्रलेख वारसा टिळकांचा या विषयाशी संबंधित आहे. हा अग्रलेखही
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=83973:2010-07-07-14-24-09&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7
या लिंकवर वाचता येईल.

४)ऐतिहासिक उडीची शताब्दी हा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6140588.cms

५)सामना दैनिकातही या उडीच्या निमित्ताने एक लेख आहे.
http://www.saamana.com/

६)स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील संकेतस्थळ
http://www.savarkar.org/

७)स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीचा हिंव्हिडिओ
http://video.google.com/videoplay?docid=6998295758226432612#

८) हिंदू जनजागृती समिती यांच्या संकेतस्थळावर सावरकर यांच्याविषयी देण्यात आलेली माहिती
http://www.hindujagruti.org/hinduism/national-icons/veer-savarkar/

05 July 2010

कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला...

मस्त पावसळा सुरू झाला असून ट्रेकिंग आणि पावसाळी सहलीच्या पारंपरिक मंडळींबरोबरच नव्या लोकांनाही आता ट्रेकिंग आणि पावसाळी सहलीचे वेध लागले असतील. शनिवार आणि रविवार असे सुट्टीचे दिवस अनेक मंडळी एखाद्या छानशा ट्रेकला जाऊनही आली असतील. मुंबई आणि जवळच्या परिसरातील अशी काही ठिकाणे खास ट्रेकर्स आणि भटक्या मंडळींसाठी...

लोकसत्तामधील माझा सहकारी कैलास कोरडे हे अशाच ट्रेकर्स आणि भटक्या मंडळींपैकी. लोकसत्ताच्या रविवार वृत्तान्तमध्ये (१३ जून २०१०) त्याने काही दिवसांपूर्वी कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला असा लेख लिहिला होता. तो लेख येथे देत आहे.

हा लेख वाचून मुरलेल्या ट्रेकर्सना स्मृतीरंजनाचा आनंद होईल तर नव्या मंडळींना अरेच्चा आपणही एकदा पावसाळी ट्रेकला जायलाच पाहिजे, असे वाटेल. 

बाष्पयुक्त ढगांच्या पांढऱ्या पुंजक्यांची अरबी समुद्राकडून सह्यकडय़ांकडे कूच सुरू होताच ट्रेकर्स मंडळींना वेध लागतात पावसाचे..लवकरच पाऊस येईल. मृगाच्या सरींनी तृप्त झालेली धरती हिरवी शाल ओढून घेईल.. उन्हाच्या तडाख्याने तापलेले डोंगरमाथे थंडाव्यासाठी धुक्याच्या दुलईत शिरतील. नदी-सागराच्या भेटीसाठी आतूर जलधारा कडय़ांवरून स्वत:ला धबधब्यांत झोकून देतील. संपूर्ण सृष्टीमध्ये नवचैतन्याची सळसळ निर्माण होईल.. जलधारांनी एकीकडे निसर्ग तृप्त होत असतानाच चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या ट्रेकर्सना सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्या, सभोवतालचा निसर्ग, निसरडय़ा वाटा, दुथडी वाहून भरणारे नदी-ओढे खुणावू लागतात. आणि सुरू होते तयारी..पावसाळी ट्रेकची!


दरवर्षी अर्धा मे महिना उलटला ट्रेकिंग ग्रुप्सच्या मीटिंग्जना भरू लागतात. ग्रुपमधील जुनी-नवी उत्साही मंडळी या बैठकीला आवर्जून हजेरी लावतात. कॅलेंडर समोर ठेवून ट्रेकच्या तारखा ठरविल्या जातात. पण पहिला ट्रेक नेमका कधी करायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. या बैठकीपूर्वी मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला असतो. तो केरळला कधी पोहोचणार आणि महाराष्ट्रात कधी धडकणार, याविषयीचे अंदाज हवामान खात्याने वर्तविलेले असतात. पण मान्सूनच्या लहरीपणा लक्षात घेता जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ातील मुहूर्त काढला जातो. प्रवासाची फारशी दगदग आणि जास्त अवघड चढण नसलेले ठिकाण पहिल्या ट्रेकसाठी ठरविण्यात येते.

पहिला ट्रेक एक दिवसाचा असतो. त्याला ‘वॉर्म अप’ ट्रेक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुमारे तीन महिने घामाच्या धारांमध्ये भिजल्यानंतर पावसात मनसोक्त चिंब होणे, हाच या ट्रेकचा उद्देश असतो. यानिमित्ताने ग्रुपचे सदस्य आपल्या ओळखीच्या मंडळींना ट्रेकला घेऊन येतात. या ट्रेकमध्ये येणाऱ्या अनुभवावरून ती मंडळी पुढे ‘रेग्युलर ट्रेकर’ होणार की नाही, हे ठरत असते. पहिल्या ट्रेकमध्येच निसर्गाशी नाळ जुळल्यामुळे आजीवन ट्रेकर झाल्याची अगणित उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या ट्रेकनंतर ट्रेकिंगचे नावही न काढणारेसुद्धा काहीजण आढळतात.

एकदिवसीय ट्रेकसाठी कर्जत-कसारा आणि लोणावळा परिसरात अनेक ‘हॉट स्पॉट’ आहेत. पेठ किंवा कोथळीगड, लोहगड, कोंदिवडे लेणी, कोरीगड, कर्नाळा, ईशाळगड, पेब, उल्हास व्हॅली, तिकोणा, माहुली, कळसूबाई, नाखिंद, माथेरान अशी या ठिकाणांची मोठी यादी आहे. केवळ ट्रेकचे ठिकाण किंवा तारीख ठरवून चालत नाही. प्रत्येक ट्रेकचे व्यवस्थित नियोजन करावे लागते. ट्रेकसाठी निघताना कुठे जमायचे? प्रवास रेल्वेने करायचा की वाहनाने? रात्री निघायचे की भल्या पहाटे? कोणती वेळ सर्वाना सोयीची ठरेल? खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करायची? चढाईला सुरुवात कधी करायची? खर्च किती येईल? यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या गोष्टी ग्रुपकडून ठरविण्यात येत असल्या, तरी प्रत्येक ट्रेकसाठी लीडर आणि को-लीडर ठरविण्यात येतात. ही जबाबदारी ट्रेकिंग स्पॉटबद्दल चांगली माहिती असलेल्या मंडळींवर टाकली जाते.

प्रत्येक ट्रेकिंग ग्रुप आपापल्या सोयीनुसार वर्षभरातील ट्रेकचे नियोजन करतो. काही ग्रुप पावसाळी आणि हिवाळी ट्रेकचा कार्यक्रम एकदाच आखतात, तर काही मे-जूनमध्ये पावसाळी आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिवाळी ट्रेकचे नियोजन आखतात. दोन किंवा तीन आठवडय़ाच्या विश्रांतीनंतर पुढच्या ट्रेकचे नियोजन केले जाते. पहिला ट्रेक सोपा व वनडे असेल, तर पुढील ट्रेक तुलनेने अवघड आणि दोन-तीन दिवसांचेही असतात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत अनेक ट्रेकिंग स्पॉट आहेत. भीमाशंकर, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, कळसूबाई, सुधागड, राजमाची, काळदुर्ग, टकमक, सिद्धगड, गोरखगड, दुर्ग-ढाकोबा, माथेरानमधील वन ट्री हिल पॉइंट व गारबेट पॉइंट यांसारखी ठिकामे निवडली जातात. ट्रेकिंग स्पॉटच्या यादीत दरवर्षी नवनवीन ठिकाणांची भर पडतच असते. गेल्या एक-दोन वर्षांपासून खंडाळा येथील नागफणीच्या बाजूला असलेल्या उंबरखिंडचा ट्रेक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

पावसाळी ट्रेकचे नियोजन करण्याची पद्धत दहा-पंधरा वर्षांपूर्वीही हीच होती. मात्र त्यावेळी फोनाफोनी करून किंवा पत्राद्वारे ग्रुपमधील सर्व सदस्यांना ट्रेकच्या तारखा कळविल्या जायच्या. ‘यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया’सारख्या (वायएचएआय) ट्रेकिंग संस्थांच्या नोटीस बोर्डावर ट्रेकच्या तारखा लावल्या जायच्या. त्यामुळे ट्रेकला जायची हुक्की आल्यास ट्रेकर्सची पावले आपोआप या संस्थांकडे वळायची. आता मात्र ट्रेकचे वेळपत्रक प्रत्येकाच्या ईमेलवरच येते. सोबत ट्रेकसाठी भेटण्याचे ठिकाण, खर्च, आवश्यक सूचना आणि लीडर्सचे मोबाइल नंबर असतात. ट्रेकला निघण्यापूर्वी भेटण्याच्या सर्व ग्रुपच्या जागा कॉमन आहेत. सीएसटीला इंडिकेटरखाली, दादरला स्वामीनारायण मंदिराच्या कोपऱ्यावर, कर्जत-कसाऱ्याला बस स्टॅण्डवर, विरारला तिकीट खिडकीच्या बाजूला..त्या मात्र आजही बदललेल्या नाहीत.

ट्रेकिंग ग्रुप पावसाळ्यात केवळ ट्रेक आयोजित करतात असे नाही. दोन-तीन ट्रेक झाल्यानंतर वॉटर फॉल रॅपलिंग, रेस्क्यू ऑपरेशन, नेचर ट्रेल्स, वृक्षारोपण, सायकलिंग यांसारखे उपक्रमही आयोजित केले जातात. याखेरीज भरारीसारख्या ट्रेकिंग ग्रुपकडून गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात पन्हाळगड ते विशाळगड मोहीम आखण्यात येत आहे. काही ट्रेकिंग ग्रुपकडून भीमाशंकर ते लोणावळा मोहिमेचे आयोजन केले जाते. आता तर मान्सून दाखल झाला आहे. 

संपर्क- कैलास कोरडे
kailash.korde@expressindia.com

kkorde@gmail.com


 

04 July 2010

मनोज नव्हे विक्रम तिरोडकर

मराठी उद्योजक मनोज तिरोडकर यांच्या जीटीएल इन्फ्रा कंपनीने एअरसेल सेल्युलर कंपनीकडून देशातील त्यांचे सर्वच्या सर्व  १७ हजार ५०० मोबाइल टॉवर्स खरेदी करण्याचा करार आता इतिहास झाला. तिरोडकर यांच्या कंपनीने आता अनिल अंबानी समूहातील 'रिलायन्स इन्फ्रा'कडील ७५ हजार टॉवरचे ग्राहक मिळवून एक नवा विक्रम केला आहे. मराठी उद्योजकाच्या या गगनभरारीमुळे त्यांना मनोज ऊर्फ विक्रम तिरोडकर असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल.

अंबानी यांच्याबरोबर केलेल्या करारामुळे 'जीटीएल इन्फ्रा'कडील ग्राहकांची संख्या आता सव्वा लाखाच्या घरात जाणार आहे. व्होडाफोन, रिलायन्स, एअरसेल, आयडिया, ,  भारती एअरटेल,  युनॉर, टाटा टेलि सव्हिर्सेस, व्हिडिओकॉन आणि अन्य काही टेलिकंपन्यांचा समावेश आहे.

तिरोडकर यांनी मोबाइल कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या टॉवर्समध्ये मक्तेदारी मिळविली आहे. टूजी सेवा पुरविणाऱ्या १४ कंपन्या आणि थ्रीजी सेवा पुरविणाऱ्या नऊ कंपन्या तसेच ब्रॉड बँड वायरलेस (बीडब्ल्यूए)ची सेवा पुरविणाऱ्या आठ कंपन्या अशा या सर्व कंपन्यांना जीटीएलच्या टॉवर्सचा वापर केल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही.

आज ग्लोबल समूहात आठ कंपन्या आहेत, त्यापैकी दोन शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या आहेत. त्यांचा व्यवसाय ४६ देशांत चालतो. २२ देशांत स्वत:च्या कंपनीचे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ३५ हजारांवर गेली आहे. आज ग्लोबल समूहात आठ कंपन्या आहेत, त्यापैकी दोन शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या आहेत. त्यांचा व्यवसाय ४६ देशांत चालतो. २२ देशांत स्वत:च्या कंपनीचे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ३५ हजारांवर गेली आहे.

तिरोडकर यांच्या या विक्रमाची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांकडूनही घेण्यात आली आहे. फोर्ब्सच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 'र्वल्ड कॉम समूहा'ने त्यांना 'र्वल्ड यंग बिझनेस अचिव्हर अवॉर्ड' देऊन त्यांचा गौरव केला असून  कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)नेही त्यांना 'यंग आंत्रप्रीनर्स ट्रॉफी' प्रदान केली आहे.

उद्योग व्यवसायात मराठी माणूस यश मिळवू शकत नाही, त्याने केवळ दुसऱयांची चाकरीच करावी, असे मराठी माणसांबद्दल उपहासाने म्हटले जायचे आणि जातेही. पण आता हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. किर्लोस्कर, दांडेकर (कॅम्लीन), बेडेकर, पाठारे (व्हीआय़पी), अत्तरवाले केळकर, पेंढरकर (विको टुथुपेस्ट). चितळे (बाकरवडी, श्रीखंड) आणि अन्य काही असतील (मला पटकन जेवढी नावे आठवली तेवढी लिहिली) त्या मंडळींच्या य़ादीत आता मनोज तिरोडकर यांचे नाव कोरले गेले आहे. समस्त मराठी माणसांसाठी ही अभिमानाची बाब आहे.  

03 July 2010

मराठी सृष्टीचा संदर्भकोश

ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा परिचय, त्यांनी गायलेली गाणी, त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार आणि त्यांच्याविषयीची माहिती आपल्याला एकाच ठिकाणी मिळाली आणि त्याचबरोबर त्यांनी गायलेली गाणी ऐकता आणि पाहताही आली तर? रसिकांसाठी तो दुग्धशर्करा योग ठरेल. अशक्य वाटणारी ही बाब ‘मराठी सृष्टी डॉट कॉम’ या संकेतस्थळाने शक्य करून दाखवली आहे.

या संकेतस्थळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच अप्रसिद्ध पण समाजासाठी वेगळे काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या संदर्भकोशाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या संकेतस्थळावर विविध क्षेत्रातील दोन हजार मराठी व्यक्तिमत्वांचा परिचय वाचक, अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे.


मराठी भाषा आणि संस्कृती याविषयी अनेक संकेतस्थळांचा पर्याय सध्या मराठी रसिकांना उपलब्ध आहे. त्यामुळे आम्हाला त्यापेक्षा वेगळे असे काही द्यायचे होते. त्यातून संदर्भकोश ही संकल्पना आम्हा सहकाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आली, अशी माहिती संकेतस्थळाचे संचालक कालिदास वांजपे यांनी दिली. ते म्हणाले की, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्तींची माहिती गुगल किंवा अन्य सर्च इंजिनवर मिळते. पण आम्हाला या मंडळींबरोबरच अन्य क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या आणि ज्यांचे कार्य समाजासाठी महत्त्वाचे आहे, अशा व्यक्तीही लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. त्यांच्या कामापासून अन्य काही जणांनी प्रेरणा घ्यावी, हा यामागे उद्देश होता. त्यातून संदर्भकोश आकाराला आला.

आमच्या या संकेतस्थळावर त्या त्या क्षेत्रातील मराठी माणसांच्या परिचयाबरोबरच त्या व्यक्तीविषयी इंटरनेटवर जी जी माहिती उपलब्ध आहे, त्यापैकी काही महत्त्वाची माहिती आम्ही येथे दिली आहे. माहितीबरोबरच त्या व्यक्तीविषयी असलेली विविध संकेतस्थळे, त्यांची छायाचित्रे, ध्वनीफिती, चित्रफिती यांचाही समावेश करण्यात आला आहे. एखाद्या मराठी व्यक्तीबाबत समग्र माहिती एकाच ठिकाणी देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

या संदर्भकोशात स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, सहकार क्षेत्र, समाजसुधारक, संत, शिक्षण क्षेत्र, शासन-प्रशासन, व्यावसायिक उद्योजक, राजकीय व्यक्ती, पत्रकार, खेळाडू, कृषी क्षेत्र, कलाकार, ऐतिहासिक व्यक्ती आणि अन्य क्षेत्रातील माहिती येथे देण्यात आली आहे. आमच्याकडे दहा हजार व्यक्तींची माहिती सध्या जमा झाली असून त्या माहितीचे संपादन, संकलन करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच या व्यक्तींविषयीची माहितीही संकेतस्थळावर वाचता येऊ शकेल. या संदर्भकोशासाठी वाचकही माहिती पाठवू शकतील. या संकेतस्थळावर संदर्भकोशासह विविध विषयांवरील अन्य लेखही वाचता येणार असल्याचे वांजपे यांनी सांगितले.

अधिक माहिती आणि मदत करू इच्छिणाऱ्यांनीwww.marathisrushti.com या संकेतस्थळावर किंवा कालिदास वांजपे यांच्याशी ९९२०२७१६७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ३ जुलै २०१० च्या अंकात पान क्रमांक-१ वर प्रसिद्ध झाली आहे)