23 November 2010

मराठी संग्रहालयाने जपलाय दुर्मिळ ग्रंथाचा खजिना

मराठी साहित्य आणि ग्रंथव्यवहारात ११७ वर्षांचा वारसा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहाय, ठाणे यांनी दुर्मिळ ग्रंथांच्या खजिन्याची जपणूक केली आहे. संस्थेकडे आज सुमारे एक हजार २०० दुर्मिळ ग्रंथ आहेत. ‘प्रेस अ‍ॅक्ट’ कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी (१८६७) प्रकाशित झालेले विविध विषयांवरील ग्रंथ संस्थेकडे आहेत.संस्थेकडे असलेला हा पुस्तकांचा खजिना अत्यंत दुर्मिळ असून, त्याचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातून अभ्यासक आणि विद्यार्थी ठाण्यात येत असतात. हे सर्व ग्रंथ दुर्मिळ असल्याने ते सभासद किंवा अन्य अभ्यासकांना घरी नेता येत नाहीत.

संस्थेकडे असलेल्या या दुर्मिळ पुस्तकांच्या खजिन्यात कादंबरी या गटातील पुस्तके कमी आहेत. सर्वाधिक पुस्तके इतिहास, गणित, ज्योतिष, भूमिती, बीजगणित, मराठी भाषा, व्याकरण, शेती, धर्म, पौराणिक आदी विषयांची आहेत.

ग्रंथसंग्रहालयाकडे असलेल्या खजिन्यात ‘मराठय़ांची खबर’ (१८२९), हिंदुस्थानचा विकास-बाळगंगाधर शास्त्री जांभेकर (१८४६), बाळाजी जर्नादन भानू ऊर्फ नाना फडणीस यांची बखर-मॅग्लोनल्ड (१८२७), दशम स्कंधाच्या आर्या, अथ विराट पर्व आर्या-मोरोपंत (१८४० व १८४८), अशौच विचार-बाळकृष्ण भिकाजी राजवाडे (१८४१), मराठी भाषेचे व्याकरण-दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८३६), मराठी भाषेचे व्याकरण-शास्त्री फडके (१८५०) या आणि अन्य अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष पां. के. दातार यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले की, संस्थेकडे असे दुर्मिळ सुमारे एक हजार २०० ग्रंथ असून त्यापैकी सुमारे ५० ग्रंथांची आम्ही झेरॉक्स प्रत तयार केली आहे. हे सर्व ग्रंथ दुर्मिळ असल्याने ते सभासद किंवा अन्य कोणाला वाचण्यासाठी घरी देत नाही. ज्यांना हा ग्रंथ पाहायचा आहे, त्याला आम्ही त्याची झेरॉक्स प्रत उपलब्ध करून देतो. तीसुद्धा अभ्यासकाने ग्रंथालयात बसूनच वाचायची आम्ही वाचकाला परवानगी देतो.

संस्थेकडे असलेले सर्व ग्रंथ योग्य पद्धतीने जतन करायचे आहेत. अत्याधुनिक पद्धतीने हे काम करण्याचा विचार आहे. अर्थात त्यासाठी खर्चही खूप आहे. त्यामुळे सध्या तरी जमेल तसे हे काम आम्ही करत असल्याचेही दातार म्हणाले.

पां. के. दातार यांचा संपर्क ०९८३३६१२८४७

मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे दूरध्वनी संपर्क
०२२-२५४०६७८७/२५४४२२५१

ई-मेल info@mgst.in 

(ही बातमी लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाली आहे.)

14 November 2010

मराठी अभिमान गीताचे मार्केटिंग

ठाणे येथे पुढील महिन्यात भऱणाऱया ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कौशल इनामदार यांने संगीत दिलेल्या मराठी अभिमान गीताने होणार आहे. हे अभिमान गीत म्हणजे ज्येष्ठ दिवंगत कवी सुरेश भट यांनी लिहिलेली कविता आहे. भट यांची लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी  ही कविता अनेक वर्षांपू्वीच प्रसिद्ध झालेली आहे. या कवितेलाच कौशल यांनी वेगळ्या पद्धतीने चाल लावून आणि अनेक गायकांकडून गाऊन घेऊन मराठी अभिमान गीत म्हणून लोकांपुढे आणले आहे.

खासगी एफएम वाहिन्यांवर मराठी गाणी वाजवली जात नाहीत. त्यामुळे कौशल इनामदार यांनी मराठी भाषेचे अभिमान गीत तयार केले. त्याचे चांगल्या प्रकारे मार्केटिंगही केले गेले. प्रसारमाध्यमानीही त्याला उचलून धरल्यामुळे त्याचा खूप बोलबाला झाला. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बीग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांनीही कौशलचे आणि त्याच्या या अभिमान गीताचे कौतुक केले होते. मला प्रश्न पडतो की या पू्र्वी मराठी भाषा, महाराष्ट्र यांचा गौरव करणारी गाणी झाली नव्हती का, ही लिहिलेली गाणी लोकांच्या मनातून हद्दपार झाली आहेत का, आज ही गाणी कोणाला किंवा तरुण पिढीला आवडत नाही का, जर यांची उत्तर नाही अशी असतील तर कौशल इनामदार यांच्या  अभिमान गीताचे एवढे कौतुक कशासाठी.

राजा बढे यांनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी अजरामर केलेले जयजय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेले, शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केलेले आणि ज्योत्स्ना भोळे व स्नेहल भाटकर यांनी गायलेले बहु असोत सुंदर की संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा  ही दोन गाणी आजही प्रत्येकाच्या ओठावर आहेत.   किंवा महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय राष्ट्र महान कोटी कोटी प्राणांतून उसळतो एक तुझा अभिमान हे गाणेही आजही लोकप्रिय आहे. हे गाणे चकोर आजगावकर यांनी लिहिलेले असून त्याचे संगीत श्रीनिवास खळे यांचे तर स्वर शाहीर साबळे यांचा आहे. राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिलेले मंगल देशा पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा हे गाणेही महाराष्ट्राचे अभिमान गीत होऊ शकते. याचे संगीत वसंत देसाई यांचे असून ते जयंवत कुलकर्णी यांनी गायले आहे. माधव ज्युलीयन यांची मराठी असे आमुची मायबोली हे गाणेही प्रत्येकाला आठवत असलेच

 सर्व सांगताना सुरेश भट यांचे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या कवितेला मला कमी लेखायचे नाही. अन्य महाराष्ट्र गाण्यांप्रमाणेच हे गाणेही लोकप्रिय असून त्याची यापूर्वीच कॅसेट, रेकॉर्डही निघालेली आहे. मला तर कौशल इनामदार यांनी आत्ता या गाण्याला जी चाल लावली आहे त्यापेक्षा याची जुनी चाल अधिक आवडते. त्यात जोश वाटतो.

साहित्य संमेलन आयोजकांना ठाण्यातील साहित्य संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीतानेच करायची होती तर कौशल इनामदारच्या पूर्वी झालेली महाराष्ट्र गीते किंवा सुरेश भट यांचे हे पूर्वीचे गाणे होतेच ना. मग पूर्वसुरींचे देणे असताना नव्या चालीतील हे गाणे ठेवायचा अट्टाहास का. काहीतरी वेगळे करतो आहोत, असे दाखवयाचे म्हणून की कौशल यांच्या या अभिमान गीताचा प्रसारमाध्यमातून बोलबाला झाला आहे म्हणून...

जुनी महाराष्ट्र गीते आणि कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले मराठी अभिमान गीत यांची तुलना केली असता मला जुनीच गाणी अधिक जोशपूर्ण वाटतात. अर्थात प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. ही सर्व गाणी येथे ऐकण्यासाठी मी खाली काही लिंक दिल्या आहेत.

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणे
 http://www.video4viet.com/music.html?act=play&id=ca6fa56a73ae2b08b807176dc13bf6eb
येथे ऐकता येईल.

बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय आमुचा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=64cb53bc-0b5b-45cf-b5d7-7027bca3ebd6&title=Priya%20Amucha%20Ek%20Maharashtra%20Desh%20Ha.mp3
 येथे ऐकता येईल.

गोविंदाग्रज यांचे मंगलदेशा पवित्रदेशा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=e639491e-d529-4aeb-99a1-3b0e9d448248&title=12%20Mangal%20Desha%20Pavitra%20Desha%20Maharashtra%20Desha.wma येथे ऐकू शकाल.

आणि या सगळ्या गाण्यांनंतर कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले हे गाणे ऐका. http://www.youtube.com/watch?v=Txa_J7lPRhg

हे गाणे ऐकल्यानंतर/ पाहिल्यानंतर आता तुम्हीच ठरवा जुनी महाराष्ट्र गाणी की हे गाणे अधिक प्रभावी आणि जोशपूर्ण वाटते.








  

13 November 2010

आता खरी कसोटी

कल्याण-डोंबिवली महापालिकेत अखेर मनसे विऱोधी पक्ष म्हणून विराजमान झाला. पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱया मनसेने शिवसेना, भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसला धूळ चारली आणि राज ठाकरे यांचे २७ नगरसेवक निवडून आले. पहिल्याच निवडणुकीत मिळालेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

निवडणुकीच्या काळात राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीत ठाण मांडून बसले होते. मनसेचे उमेदवार निवडताना त्यांनी जास्तीत जास्त तरुण, सुशिक्षित, उच्चशिक्षितांना संधी दिली. मनसेच्या सर्व उमेदवारांनाही कल्याण-डोंबिवलीत भरभरून मतदान झाले. त्यामुळेच मनसेला सत्ता स्थापन करता आली नसली तरी सर्वात जास्त मते घेतलेला मनसे हाच पक्ष ठरला आहे.

सत्ता दिलीत तर पूर्ण बहुमत द्या, अपक्षांच्या हनुवट्यांना मला हात लावायला लावू नका, असे निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी सांगितले होते. मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले तरी एकहाती सत्ता त्यांना स्थापन करता आली नाही. सत्तेसाठी घोडेबाजार न करता राज ठाकरे यांनी विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय़ घेतला. पण आता त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.

महापालिका सभागृहात आता त्यांचे २७ नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे पालिका नियम आणि लोकशाहीची सर्व आयुधे वापरून त्यांनी सत्ताधाऱयांवर अंकुश ठेवला पाहिजे. नागरी हिताची कामे सत्ताधाऱयांकडून करवून घेतली पाहिजेत. मनसे विरोधासाठी विरोध करणार नाही तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करून दाखवू, असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

गेली साडेबारा वर्षे शिवसेना-भाजप युती आणि अडीच वर्षे दोन्ही कॉंग्रेसने राज्य केले आहे. त्यावेळीही महापालिकेत विरोधी पक्ष सक्षम नव्हताच. अनेकदा तर तो सत्ताधाऱयांच्या ताटाखालचे मांजर झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे मनसेची जबाबदारी वाढली आहे. लोकांनी भरभऱून मते देऊन तसेच शिवसेना-भाजपचे पारंपरिक बालेकिल्ले उध्वस्त करत मनसेच्या नवख्या पण सुशिक्षित उमेदवारांना निवडून दिले आहे.

मतदारांनी टाकलेला हा विश्वास मनसेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २७ नगरसेवकांनी सार्थ करून दाखवावा. पाच वर्षांच्या काळात आपल्या हातून वावगे काही घडणार नाही, सत्ताधाऱयांच्या चुकीच्या धोरणांना साथ देणार नाही याची त्यांनी मनोमन काळजी घेतली पाहिजे.  ज्या प्रभागातून आपण निवडून आलो आहोत, त्या प्रभागीत समस्या, नागरिकांचे प्रश्न यात जातीने लक्ष घातले पाहिजे. निवडणुकीच्या काळात उघडलेली जनसंपर्क कार्यालये बंद न करता दररोज सुरू ठेवावी. त्या कार्यालयात दररोज ठराविक वेळेत मनसेच्या नगरसेवकांनी बसावे, नागरिकांना भेटावे, त्यांच्याशी बोलावे आणि मुख्य म्हणजे आपला नगरसेवक रस्त्यावरून पायी फिरतोय, प्रभागात फिरताना दिसतोय हे पाहायला मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

कोणताही भ्रष्टाचार, भानगडी, टक्केवारी यात आपण गुंतणार नाही याची मनसेच्या सर्व नगरसेवकांनी खबरदारी घ्यावी आणि पाच वर्षांचा कारभार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी ठेवावा. असे झाले तरच मतदारांनी मनसेवर आणि त्यांच्या नगरसेवकांवर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरेल आणि या  विश्वासाला तडा जाणार नाही.  राज ठाकरे आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते या बाबत वेळोवेळी नगरसेवकांना मार्गदर्शन करतीलच. कल्याण-डोंबिवलीतील सर्वसामान्य मतदारांना आता मनसेकडून खूप अपेक्षा आहेत. मनसेची आता खरी कसोटी आहे...