13 November 2010

आता खरी कसोटी

कल्याण-डोंबिवली महापालिकेत अखेर मनसे विऱोधी पक्ष म्हणून विराजमान झाला. पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱया मनसेने शिवसेना, भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसला धूळ चारली आणि राज ठाकरे यांचे २७ नगरसेवक निवडून आले. पहिल्याच निवडणुकीत मिळालेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

निवडणुकीच्या काळात राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीत ठाण मांडून बसले होते. मनसेचे उमेदवार निवडताना त्यांनी जास्तीत जास्त तरुण, सुशिक्षित, उच्चशिक्षितांना संधी दिली. मनसेच्या सर्व उमेदवारांनाही कल्याण-डोंबिवलीत भरभरून मतदान झाले. त्यामुळेच मनसेला सत्ता स्थापन करता आली नसली तरी सर्वात जास्त मते घेतलेला मनसे हाच पक्ष ठरला आहे.

सत्ता दिलीत तर पूर्ण बहुमत द्या, अपक्षांच्या हनुवट्यांना मला हात लावायला लावू नका, असे निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी सांगितले होते. मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले तरी एकहाती सत्ता त्यांना स्थापन करता आली नाही. सत्तेसाठी घोडेबाजार न करता राज ठाकरे यांनी विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय़ घेतला. पण आता त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.

महापालिका सभागृहात आता त्यांचे २७ नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे पालिका नियम आणि लोकशाहीची सर्व आयुधे वापरून त्यांनी सत्ताधाऱयांवर अंकुश ठेवला पाहिजे. नागरी हिताची कामे सत्ताधाऱयांकडून करवून घेतली पाहिजेत. मनसे विरोधासाठी विरोध करणार नाही तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करून दाखवू, असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

गेली साडेबारा वर्षे शिवसेना-भाजप युती आणि अडीच वर्षे दोन्ही कॉंग्रेसने राज्य केले आहे. त्यावेळीही महापालिकेत विरोधी पक्ष सक्षम नव्हताच. अनेकदा तर तो सत्ताधाऱयांच्या ताटाखालचे मांजर झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे मनसेची जबाबदारी वाढली आहे. लोकांनी भरभऱून मते देऊन तसेच शिवसेना-भाजपचे पारंपरिक बालेकिल्ले उध्वस्त करत मनसेच्या नवख्या पण सुशिक्षित उमेदवारांना निवडून दिले आहे.

मतदारांनी टाकलेला हा विश्वास मनसेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २७ नगरसेवकांनी सार्थ करून दाखवावा. पाच वर्षांच्या काळात आपल्या हातून वावगे काही घडणार नाही, सत्ताधाऱयांच्या चुकीच्या धोरणांना साथ देणार नाही याची त्यांनी मनोमन काळजी घेतली पाहिजे.  ज्या प्रभागातून आपण निवडून आलो आहोत, त्या प्रभागीत समस्या, नागरिकांचे प्रश्न यात जातीने लक्ष घातले पाहिजे. निवडणुकीच्या काळात उघडलेली जनसंपर्क कार्यालये बंद न करता दररोज सुरू ठेवावी. त्या कार्यालयात दररोज ठराविक वेळेत मनसेच्या नगरसेवकांनी बसावे, नागरिकांना भेटावे, त्यांच्याशी बोलावे आणि मुख्य म्हणजे आपला नगरसेवक रस्त्यावरून पायी फिरतोय, प्रभागात फिरताना दिसतोय हे पाहायला मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

कोणताही भ्रष्टाचार, भानगडी, टक्केवारी यात आपण गुंतणार नाही याची मनसेच्या सर्व नगरसेवकांनी खबरदारी घ्यावी आणि पाच वर्षांचा कारभार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी ठेवावा. असे झाले तरच मतदारांनी मनसेवर आणि त्यांच्या नगरसेवकांवर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरेल आणि या  विश्वासाला तडा जाणार नाही.  राज ठाकरे आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते या बाबत वेळोवेळी नगरसेवकांना मार्गदर्शन करतीलच. कल्याण-डोंबिवलीतील सर्वसामान्य मतदारांना आता मनसेकडून खूप अपेक्षा आहेत. मनसेची आता खरी कसोटी आहे...

No comments:

Post a Comment