08 April 2012

व्यवस्थापनाचे विद्यार्थीही गांधी मार्गावर

महात्मा गांधी यांच्या विचारांबाबत दुमत आणि वाद असला तरी आजही महात्मा गांधी यांचे विचार तरुणांना आकर्षित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. चेतना मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमधील ‘व्यवस्थापन’ या विषयाच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र आणि गांधी विचारांच्या अन्य पुस्तकांच्यादहा हजारांहून अधिक प्रतींची विक्री केली आहे. याची किंमत सुमारे सव्वा पाच लाख रुपये इतकी आहे.   


‘व्यवस्थापन’च्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘जागृती’ या उपक्रमात ३६० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी  मुंबईतील विविध शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस् आणि वांद्रे येथील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी, आयकर भवन, कॅनरा बॅंक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बॅंक आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी पुस्तकांच्या विक्रीसाठी स्टॉल उभारले आणि ही पुस्तके विकली.  प्रा. अपर्णा राव, डॉ. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळा उपक्रम पार पडला. मुंबई सवरेदय मंडळ आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग यांचेही विशेष सहकार्य या उपक्रमास लाभले होते.

४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत झालेल्या या उपक्रमाची आखणी, प्रायोजकत्व, व्यवस्थापन, विपणन, विक्री आदी सर्व बाजू विद्यार्थ्यांनीच सांभाळल्या होत्या. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना विक्री, व्यवस्थापन आणि विपणन यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठीसह हिंदूी, इंग्रजी, गुजराती भाषेतील महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र (सत्याचे प्रयोग) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेले ‘टाईमलेस इन्स्पिरेटर-रिलिव्हिंग गांधी’, राम प्रताप लिखित ‘गांधीयन मॅनेजमेंट’ पुस्तकांची विक्री या विद्यार्थ्यांनी केली.

महात्मा गांधी हे ‘भारतीय व्यवस्थापन गुरू’म्हणून ओळखले जातात. हॉवर्ड विद्यापीठात ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी विचारांचा, त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. गांधी विचार नेमका काय आहे, हे आपल्याही विद्यार्थ्यांना कळावे तसेच आपले शिक्षण हे नुसते पुस्तकी असता कामा नये तर ते विचार, मन आणि कृतीतून झाले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे उपक्रमाच्या समन्वयक प्रा. अपर्णा राव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

दरम्यान उपक्रमाच्या समारोपा निमित्त येत्या १० एप्रिल रोजी शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व) येथील चेतना मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट मध्ये सकाळी ११ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गांधीवादी आणि निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.    
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात पान क्रमांक २ वर ८ एप्रिल २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)

2 comments:

  1. नमस्कार. आपला ब्लॉग वाचनात आला आणि आवडला. या ब्लॉगची माहिती मी फेसबुकवरिल "उन्मुक्त" या पेजवर दिली आहे. www.facebook.com/unmukta

    ReplyDelete