30 March 2012

नाराज खेळी

शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद, शितयुद्ध सुरू असून नाराज ठाकरे यांनी आता एक नवी खेळी खेळली आहे. ठाणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेने आपला पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला जाहीर केला आहे. राज यांच्या या भूमिकेचा थेट फटका शिवसेनेला बसणार आहे. राज यांच्या पाठिंब्यामुळे स्थायी समितीत शिवसेना-भाजप-रिपाई महायुती आणि कॉंग्रेस आघाडी व मनसे यांचे संख्याबळ समसमान झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली तर चिठ्ठी टाकून अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. अर्थात हा धोका न पत्करता कॉंग्रेस आघाडी महायुतीचे सदस्य फोडून किंवा त्यांना गैरहजर राहायला लावून महापालिका तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडून हस्तगत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

ठाणे महापालिका महापौर-उपमहापौर निवडणुकीत राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता. साहजिकच नाशिक महापालिकेत आपल्या म्हणजे मनसेच्या उमेदवाराला शिवसेनेकडूनही तसाच पाठिंबा मिळावा, अशी राज यांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. मनसेचा महापौर होऊ नये म्हणून शिवसेना रडीचा डाव खेळली. मात्र तेथे भाजपने मनसेबरोबर जाऊन मनसेचा महापौर केला.शिवसेनेवरील त्या रागाचा वचपा आता राज ठाकरे काढत आहेत.

मी कोत्या मनाचा नाही, नाशिक महापालिकेत शिवसेनेने मनसेला पाठिंबा न दिल्यामुळे ठाण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत मी शिवसेनेला पाठिंबा देत  नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. शिवसेनेने बसपाच्या नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने आपला पाठिंबा शिवसेनेला नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बसपाचे कारण देत राज यांनी त्यापेक्षा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार बरा व त्यासाठी मनसेचा पाठिंबा कॉंग्रेस आघाडीला असल्याचा मुलामा राज यांनी या सर्व प्रकाराला दिला आहे. त्याआधी कोकण विभागीय आयुक्तांकडेही राज यांनी ठाणे महापालिकेत मनसे कॉंग्रेस आघाडीबरोबर असेल, असे पत्र दिले आहे.

यामध्ये राज यांचा राजकीय फायदा किंवा काही दूरगामी विचार असला तरी त्यांनी असे करायला नको होते. मुळात दोन्ही कॉंग्रेसशी राज यांच्या पक्षाची वैचारिक नाळ जुळणारी नाही. ती शिवसेना किंवा भाजपशी जवळची आहे. त्यामुळे तात्कालिक फायदा न पाहता किंवा शिवसेनेला धडा शिकवायचा म्हणून राज यांनी कॉंग्रेसच्या जवळ जायला नको होते. महापौर निवडणुकीत मनसेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. अनेकांना राज यांची भूमिका आवडली. अपक्षांच्या मदतीने होणारा घोडेबाजार आणि नको त्या सौदेबाजीला त्यामुळे नक्कीच पायबंद बसला.

त्यामुळे राज यांनी ठाणे महापालिकेत आपले स्वतंत्र अस्तीत्वच ठेवायला हवे होते. महापौर निवडणुकीत पाठिंबा दिला असला तरी स्थायी समितीच्या निवडणुकीत तो मिळणार नाही, असे िशवसेनेला सांगून या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहायला हवे होते. मग त्यातून शिवसेनेला फायदा झाला असता तरी चालले असते. कारण त्यामुळे सर्वसामान्य मतदारांच्या मनात राज आणि मनसेविषयी जी चांगला प्रतिमा निर्माण झाली होती, ती तशीच राहिली असती. आता अन्य राजकीय नेते आणि पक्षांप्रमाणे राज यांनी सौदेबाजी केली असेच मतदारांना वाटत राहील. कोकण विभागीय आयुक्तांकडे मनसेने आपण कॉंग्रेस आघाडीबरोबर असल्याचे पत्र दिल्याने राज यांना आता कायम कॉंग्रेस बरोबर फरफटत जावे लागणार आहे. महापालिकेत कॉंग्रेस आघाडीचा जो आदेश असेल तो मनसेच्या नगरसेवकानाही पाळावा लागेल.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतही राज यांना कॉंग्रेस आघाडीबरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्याची किंवा सौदेबाजी करून अन्य पदे मिळविता आली असती. पण येथे मनसेने विरोधी पक्षात बसणे पसंत केले. राज यांच्या या भूमिकेला सर्वसामान्य मतदार व समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे मतदारांसमोर मनसे व राज यांच्याविषयी वेगळी प्रतिमा निर्माण झाली. आता नशिकमधील प्रकरणाचा वचपा त्यांनी ठाण्यात काढला आहे. तसेच त्यांनी कल्याण-डोंबिवलीत केले तर मनसेला सत्ता चाखायला मिळेल, पण विरोधात राहून आणि कॉंग्रेसबरोबर न जाता त्यांनी जे काही मिळवले होते, ते मात्र धुळीला मिळेल.

जाता जाता उद्धव यांच्याबद्दल. ठाण्यात मनसेने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर तुम्ही नाशिकमध्ये मनसेचा उमेदवार महापौर म्हणून निवडून आणायला हवा होता. त्यासाठी रडीचा डाव खेळण्याची गरज नव्हती. कारण कल्याण-डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका, ठाणे महापालिकेत आपल्याला निर्विवाद बहुमत नाही आणि नाशिक प्रकरणाचा फटका या ठिकाणी बसू शकतो, हे त्यांना समजले नाही की केवळ राज आणि मनसेच्या आकसापोटी त्यांनी आपल्याही पायावर धोंडा पाडून घेतला, हे येणारा काळ ठरवेल.

No comments:

Post a Comment