17 May 2010

झाकली मुठ...

लग्नसोहळ्यात खरे तर वधू आणि वर या दोघानाच महत्व असले तरी सध्याच्या काळात त्यांच्या बरोबरीने फोटोग्राफर, हॉल व्यावसायिक, व्हिडिओग्राफर, मेकअपमन, बॅण्डवाले, पौहोहित्य करणारे गुरुजी, पोशाख, स्टेज सजावटकार, हारतुरे-फुलवाले, मिठाई व्यावसायिक, कॅटर्स, बॅण्डवाले, वाजंत्री, ढोल-ताशा, वरातीसाठीचे घोडे, विद्युत रोषणाई, सोने-चांदीचे व्यापारी, साडय़ा आणि अन्य वस्त्र प्रावरणांचे दुकानदार, भेटवस्तूंचे दुकानदार, शीतपेये, पगडी, उपरणी, फेटे भाडय़ाने देणारे व्यावसायिक आदी विविध व्यावसायिकांचाही त्यात समावेश होतो.

 त्यामुळे एका लग्नात लाखो ते कोटय़वधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील लग्न म्हटले तरी त्यात वरील सर्व घटकांचा कमी अधिक प्रमाणात समावेश होतो. यात सर्वात जास्त खर्च लग्नाचा हॉल, सजावट, जेवण, आहेर देणेघेणे आणि फोटो यावर होत असतो.

त्यामुळे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील एका लग्नात उपरोक्त सर्व घटकांचा समावेश केला गेला तरीही हा खर्च किमान पाच ते दहा लाख इतका होतो. उच्च मध्यमवर्गीयांच्या खर्चात आणखी काही लाखांची भर पडते. तर उद्योगपती, राजकारणी, चित्रपट अभिनेते यांच्याकडे होणाऱ्या एका लग्नाचा खर्च तर कोटींच्या घरात जातो. १६ मे रोजी अक्षय्य तृतीया असल्याने या दिवशी मुंबईसह राज्यात सर्व शहरात आणि खेडय़ापाडय़ातही अक्षरश: हजारो लग्न लागली


. मुंबई आणि उपनगरातच सुमारे साडेतीनशे हॉल असून ते सर्व हॉल्स फुल्ल झाले आहेत. त्याखेरीज शाळांचे हॉल्स, मैदाने येथेही विवाह होणार आहेत. त्यामुळे केवळ मुंबईतील होणाऱ्या विवाह सोहळ्यात सुमारे दिडेकशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे.


 हे केवळ मुंबईपुरते असून त्याच दिवशी राज्यात अनेक ठिकाणीही विवाह सोहळे होणार असून त्याचा विचार केला तर ही उलाढाल हजार कोटींपर्यंत जाऊ शकते. अर्थात हा अंदाज आहे. लग्नात खरोखरच किती खर्च झाला, त्याची नेमकी आकडेवारी कधीच कोणी सांगत नाही. कारण हा सर्वच मामला ‘झाकली मूठ..’ या प्रकारातील असतो.

(या संदर्भातील माझा सविस्तर लेख लोकसत्ता १६ मे २०१० च्या अक्षय्य तृतीया पुरवणीत पान क्रमांक १ वर प्रसिद्ध झाला आहे.)

No comments:

Post a Comment