21 May 2010

वीजेचे संकट

सध्या महाराष्ट्र उन्हाने आणि वीजेच्या प्रश्नावरून तापला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्याला अप्रत्यक्षपणे आणि वीजेच्या संकटालाही आपणच प्रत्यक्ष जबाबदार आहोत. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघानीही गेल्या पन्नास वर्षांत भविष्यातील वीजेची गरज लक्षात घेऊन काहीच उपाययोजना केली नाही. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.

पर्यावरणाचा नाश, झाडांची बेसुमार कत्तल, पोखरलेले डोंगर, जागोजागी उभे केलेले सिमेंट-क्रॉंक्रीटचे जंगल, डांबरी रस्ते, जीथे तिथे लावलेले पेव्हर ब्लॉग आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. वर्धा येथे तर ४८ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.  पुढील वर्षी तापमापकाचा पारा पन्नासचाही आकडा पार करेल.

पावसाळ्याचे दोन महिने सोडले तर आपल्याकडे जवळपास दहा महिने कडाक्याचे उन असते. निसर्ग आपल्याला अनंत हस्ताने सर्व काही देत असतो. पण आपणच करंटे त्याचा पाहिजे तितका आणि म्हणावा तसा उपयोग करून घेत नाही. उन्हाप्रमाणेच पावसाचे पाणीही किती वाया जाते, त्याचाही हिशोब नाही. अपवाद वगळता उन आणि या वाहून जाणाऱया पाण्याचा आपण उपयोग करून घेत नाही.

हे सर्व करण्यासाठी राज्य शासनाने युध्द पातळीवर पुढाकार घेतला पाहिजे. गेल्या पन्नास वर्षात शिवसेना-भाजप युतीची पाच वर्षांची सत्ता सोडली तर येथे कॉंग्रेसचेच राज्य राहिले आहे. त्यामुळे आजच्या या वीज संकटाला कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस नेतेच जबाबदार आहेत. अर्थात अर्धा दोष विरोधकांकडेही जातो. राज्य शासनाकडून वीजेच्या बाबतीत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर विरोधकानीही त्यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास भाग का नाही पाडले. आपले भत्ते, निधी आणि इतर सोयी-सुविधा मिळविण्यासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र येणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते या प्रश्नासाठी एकत्र का आले नाहीत.

याचे खरे कारण राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना याची झळ बसत नाही. उन्हाचे आणि वीजेचे चटके राज्यातील सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागत आहेत. मलबाह हिल किंवा मत्र्यांच्या बंगल्यांना वीज भारनियमनाचा फटका बसलेला नाही. ही मंडळी येथील जनता उन्हाळ्याने आणि वीजेच्या भारनियमनाने होरपळत असताना परदेशी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मजा करत आहे.

प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते फक्त स्वहितामध्ये मश्गुल झाले असून त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. खरे तर या बोलघेवड्या आणि पोपटपंची करणाऱया नेत्यांना राज्यातील कोणत्यातरी दुर्गम खेड्यात नेऊन तेथील घरात नेऊन डांबले पाहिजे. एन उन्हाळ्यात लोकांचे पिण्याचे पाणी आणि वीज नसल्याने कसे हाल होतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला पहिजे. तसे झाले तरच या मंडळींचे डोळे उघडतील...             

4 comments:

  1. आपण नवीन काय सांगितलेत? उपाय सुचवा. आपण जे लिहिले आहे ते जवळ जवळ सर्व लोकांना माहीत आहे.

    जर आज सूर्यबंब बसवायचा असेल तर त्याचा खर्च वीजेच्या खर्चापेक्षा जास्त आहे. अश्या परिस्थितीत सामान्य मनुष्य काय करेल?

    सगळीकडे सरकार पोचू शकत नाही. गरीब जनतेचे सरकार श्रीमंत कसे असेल की ज्या सरकारला अश्या ठिकाणी गुंतवणूक करणे जमेल.

    ReplyDelete
  2. वीज प्रकल्पाना विरोध करणार्यांचे काय करावयाचे हा सर्वात मोठा प्रश्र्न विचारात न घेता केलेली टीकाटिप्पणी.

    ReplyDelete
  3. मी या दोन्ही परखड मतांशी सहमत आहे. जे सर्वाना माहित आहे,ते पत्रकारांनी लिहून आमच्या दुःखावर डागण्या देऊ नये.

    ReplyDelete
  4. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

    ReplyDelete