08 February 2010

द्रष्टा

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडीराज ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) तयार केला आणि तिथेच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला गेला. आज भारतीय चित्रपट सृष्टी/उद्योगात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब यांनी रोवली. त्यांनी निर्माण केलेल्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर त्यांना लंडन येथे राहून तेथे चित्रपट निर्मिती करावी, असे तेथील लोकांनी सुचवले होते. मात्र मी येथे राहिलो तर भारतात, माझ्या मायदेशात या उद्योग कसा फोफावेल, त्याचा विकास कसा होईल असे उत्तर देऊन दादासाहेब फाळके पुन्हा मायदेशी परतले. पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत असताना त्यांना समाजाकडून टिका, चेष्टा प्रसंगी अवहेलनाही सहन करावी लागली. मात्र ते सर्व सोसून त्यांनी एका जिद्दीने आपला पहिला चित्रपट पूर्ण केला. काळाच्याही पुढे जाऊन दादासाहेब यांनी  चित्रपट निर्मितीच्या उचललेले हे शिवधनुष्य म्हणजे त्यांचे द्रष्टेपणच होते.


भारतीय चित्रपट सृष्टीच्या या थोर जनकाची जीवनकथा आणि मेकिंग ऑफ राजा हरिश्चंद्रची कथा उलगडणारा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा मराठी चित्रपट पाहिला. चित्रपट पाहताना कुठेही कंटाळा  येत नाहीच आणि तो केवळ फाळके यांची जीवनकथा सांगणारा माहितीपटही होत नाही. याचे सारे यश चित्रपटाचे सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांचे आहे. छोट्या-मोठ्या प्रसंगातून हा चित्रपट पुढे सरकत जातो आणि आपण चित्रपटात कसे गुंतत जातो, ते आपल्यालाही कळत नाही. दादासाहेब आणि त्यांचे कुटूंब आपलेच होऊन जाते. त्यांच्या सुखदुखाशी आपण समरस होऊन जातो. हे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांचेच यश आहे. दादासाहेब फाळके यांच्या भूमिकेतील नंदू माधव, त्यांच्या पत्नीचे काम करणाऱया विभावरी देशपांडे, दोन्ही मुले (   ) तसेच त्यांना साथ देणाऱया सगळ्या कलाकारांनी सुरेख साथ दिली आहे.
.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकाची जिद्द, हलत्या चित्रांचे पडद्यावरचे नाटक निर्माण करण्याचा घेतलेला ध्यास,  हा ध्यास पूर्ण करण्यासाठी समाज, आप्त किंवा परिचितांकडून झालेली अवहेलना, टिका, मात्र त्यामुळे खचून न जाता आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी,  पत्नी, मुले आणि काही आप्त व परिचितांचे मिळालेले सहकार्य यातून दादासाहेब फाळके यांचे व्यक्तिमत्व समर्थपणे आपल्यापुढे उभे राहते. हलती चित्र किंवा छायाचित्र काढणे म्हणजे काहीतरी जादूटोणा किंवा विपरित गोष्ट आहे. असा समज समाजात ठामपणे पसरलेला असताना तो खोडून टाकून समाजाला आपण करतोय ते पटवून देण्याचे अवघड काम दादासाहेब फाळके यांनी त्या काळात केले.


समाजाकडून अवहेलना आणि अपमान होत असूनही भारतीय चित्रपट निर्मिती करण्याचा घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही. त्यामळेच आज भारतीय चित्रपट सृष्टीचा झालेला विशाल वटवृक्ष आपण पाहत आहोत. खऱे म्हणजे यापूर्वीच दादासाहेब फाळके यांच्यावर चित्रपटांची निर्मिती व्हायला हवी होती. पण उशिराने का होईना ती उणीव भरुन निघाली हे महत्वाचे आहे. त्याबद्दल चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अन्य सर्व संबंधित तसेच चित्रपटातील सर्व कलाकार यांचे मनापासून अभिनंदन. 
 

2 comments:

  1. मी सुद्धा कालच बघितला. खूप छान चित्रपट आहे.

    ReplyDelete
  2. खकोखरच खूप छान चित्रपट आहे. आत्ताच्या पिढीने तर तो आवर्जून पाहिला पाहिजे.

    ReplyDelete