10 February 2010

हरवले ते गवसले का

आपल्या रोजच्या धावपळीत आणि गडबडीत आपण एखादी वस्तू किंवा आपल्याला हवी असलेली  कागदपत्रे आपण आठवणीने कुठेतरी ठेवून दिलेली असतात. पण जेव्हा ती आपल्याला हवी असतात, तेव्हा मात्र ती सापडत नाहीत. आपण अगदी हवालदील होऊन जातो. आपण आपल्यावरच रागावतो,  आपल्याच वेंधळपणावर मनातल्या मनात चरफडतोही. पण नेमके हवे त्या वेळी आपल्याला जे पाहिजे ते सापडत नाही.  यात कधी तासनतास जातात तर कधी एक-दोन दिवसही. आपल्याला काही केल्या आठवत नाही. मग घरातल्यांकडून आपल्यावर वेंधळा, विसराळू, धांदरट, महत्वाची अशी वस्तू कशी जागेवर ठेवता येत नाही, ठेवल्यानंतर ती कशी सापडत नाही, अशा शब्दातही आपला उद्धार होतो. आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी अशा अनुभवातून नक्कीच गेला असेल.


असे नेमके कसे होत असले, म्हणजे एखादा माणूस मुळातच विसराळू, धांदरट किंवा अव्यवस्थित असेल आणि त्याच्याकडून असे घडले तर आपण समजू शकतो. हं, त्यात काय, तो धांदरटच आहे, असे आपण म्हणतो. पण जी व्यक्ती नेहमी व्यवस्थित असते, आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवते तिलाही कधीतरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते. हरवले ते गवसेल का अशी आपली अवस्था होऊन जाते.  म्हटली तर महत्वाची आणि म्हटली तर नाही, अशी ती वस्तु असते. कितीही प्रयत्न केले तरी आपण ती वस्तू कुठे ठेवली आहे ते काही केल्या आठवच नाही आणि आपण ती वस्तू शोधण्याच्या, कुठे ठेवली आहे, ते आठवण्याच्या जितके मागे लागतो, तितकी ती वस्तू आपल्यापासून दूर जाते म्हणजे कुठे ठेवली आहे, ते अजिबात आठवत नाही.


हे होण्याचे साधे कारण म्हणजे कदाचित आपली मनस्थिती त्या वेळी ठिक नसते. घऱातील किरकोळ वाद, मुलांचा अभ्यास, त्यांचे परीक्षेतील मार्क, ऑफिसमधील ताण-तणाव, मनात एक आणि डोक्यात सुरु असलेले भलतेच विचार, अकारण उद्याची (भविष्याची) वाटणारी काळजी अशा काही कारणांमुळे आपल्या मेंदुत विचारांचा ट्रॅफीक जाम झालेला असतो. त्यामुळे आपण कितीही आठवायचा प्रयत्न केला तरी आपल्याला आठवत नाही. अशा वेळी आपले डोके  व मन शांत ठेवणे आणि  त्या गोष्टीचा/वस्तूचा नाद सोडून देणे काही वेळा फायदेशीर ठरते. आपली मनस्थिती ठिक झाल्यानंतर अचानक मेंदुत काहीतरी घडते आणि ती वस्तू आपल्याला सापडते. अशा वेळी होणारा आनंद अवर्णनीय असतो. केवळ युरेका युरेका म्हणत आपण ओरडायचेच बाकी असते. हरवले ते गवसले की अरेच्चा इथेच तर आपण हे ठवले होते, मग इतका वेळ कसे लक्षात आले नाही, याचा विचार करुन आपण आपल्याच वेंधळेपणावर हसतो.


पूर्वी विसराळुपणा किंवा लक्षात न राहणे या गोष्टी वाढत्या वयाबरोबर येतात, असे समजले जात होते. वाढत्या वयोबरोबर आपल्यात काही शारिरीक आणि मानसिक बदल होत असल्याने या गोष्टी घडायच्या. पण आता लहान किंवा तरुण वयातही ही समस्या दिसून येते. याला आपली बदलती जीवनशैली, धावपळ, जीवघेणी स्पर्धा, दैनंदिनी व्यवहारातून आपल्यावर येणारा ताण आदीही कारणे त्यामागे असू शकतात, हे आपण लक्षातच घेत नाही. तेव्हा कधी कधी विसराळूपणा झाला तर डोके शांत झाल्यानंतर ती वस्तू शोधा. नक्की सापडेल की नाही पाहा.  उगाचच आदळआपट, आरडाओरड आणि चरफ़त बसून काहीही होत नाही. उलट त्याचा आपल्याला आणि इतरानाही त्रासच होतो. मात्र  असा विसराळूपणा वारंवार घडायला लागला तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते सांगतील ते औषधोपचार करा, मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घ्या.  विसराळूपणा विसरु नका ...  

या संदर्भातील माहिती, अन्य लेख पुढीलप्रमाणे
१) http://www.miloonsaryajani.com/node/388
२) http://www.loksatta.com/old/daily/20030605/chtan.htm
३) http://marathi.webdunia.com/miscellaneous/health/article/0706/19/1070619009_1.htm
४) http://marathi.webdunia.com/miscellaneous/health/article/0706/19/1070619009_1.htm

             

No comments:

Post a Comment