28 May 2010

पावसाचे संकेत

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने सर्वजण त्रस्त झाले असून सर्वांचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत. आकाशात नुसते ढग दाटून येत असले तरी पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. हवामान खात्याने यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होईल, असे सांगून लोकांना दिलासा दिला आहे. हवामान तज्ज्ञ निष्कर्ष आणि अभ्यासाच्या माध्यमातून पावसाविषयीचे अंदाज वर्तवत असतात. निसर्ग, निसर्गातील प्राणी आणि पक्षीही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पावसाविषयीचे अंदाज देत असतात.

आपल्या भारतीय संस्कृतीत पावसाचे हे संकेत गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झालेले आहेत. शेतकरी आणि जुन्या पिढीतील माणसे याबाबत दाखले देत असतात. पावशा पक्षाचे आगमन झाले की पाऊस येणारच असा एक संकेत आपल्याकडे आहे. शेतकरीही पावशा पक्षाकडे लक्ष ठेवून असतो. पावशा पक्षी दिसला की शेतकरीही शेतीची कामे करण्याच्या तयारीला लागतो.

असे म्हणतात की प्राणी व पक्ष्यांना निसर्गाचे हे संकेत मिळत असतात.सुनामी
येण्यापूर्वी अंदमान-निकोबार मधील काही प्राणी व पक्ष्यांनी स्थलांतर केले होते, असे त्यानंतर अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. पूर, भूकंप, पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींची सूचना प्राणी व पक्ष्यांना अगोदर कळत असते, असे काही घटनांवरून दिसून आले आहे.

कावळा, चिमण्या किंवा अन्य पक्षी झाडांवर किती उंचीवर घरटी बांधतात, त्यावरूनही पाऊस जास्त की कमी पडेल त्याचा अंदाज करता येतो. मुंग्यांनी वारुळ करायला सुरुवात केली की पावसाळा जवळ आला असे मानले जाते. कारण पावसाळ्यापूर्वी तयारी करण्याची प्रेरणा त्यांना निसर्गाने दिलेली असते. काही विशिष्ट वनस्पती/झाडांनाही याच सुमारास पालवी फुटते. ही झाडे पावसाळ्यातच वाढतात आणि नंतर मरून जातात. विशिष्ट झाडाचा कंद पावसाळा सुरू होण्यापूर्वी रुजतो, त्याला अंकुर फुटतो आणि झाड वाढते. पावसाळ्यानंतर ते झाड पूर्ण सुकून जाते.

पावसाचे संकेत देणारे हे आडाखे पारंपिरक असले तरी त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्यातून काही ठोकताळे आणि शास्त्रीय निष्कर्ष तयार होऊ शकतील.

1 comment:

  1. अंनिसतर्फे मी आपला निषेध करतो.

    ReplyDelete