02 June 2010

कौलालम्पुरमध्ये झाला तुकोबांच्या अभंगांचा गजर

तुकोबांची अभंगवाणी मराठी भाषा आणि संस्कृतीपुरतीच मर्यादित राहिली नसून ती विश्वपातळीवर पोहोचली असल्याचा अनुभव मुंबईतील एक उद्योजक आणि फाईन आर्ट सोसायटी चेंबूरचे अध्यक्ष गणेशकुमार यांना नुकताच आला. गणेशकुमार हे व्यवसायाने उद्योजक असले तरी मराठी संत साहित्य हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. गेल्या काही वर्षांपासून ते मराठी संत साहित्यावर आधारित ‘महाराष्ट्र अभंगरत्न-नामसंकीर्तन’ हा कार्यक्रमही सादर करत असतात.

मलेशिया-कौलालम्पूर येथे ते व्यावसायिक कामासाठी गेले होते. तेथील मंडळींना गणेशकुमार हे येथे आल्याचे कळल्यांतर त्यांनी त्यांना कौलालम्पूर येथील ग्यानानंद स्वामीच्या आश्रमाला भेट देण्यासाठी निमंत्रित केले. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यक्रम सादर करावी अशीही विनंती केली.


गणेशकुमार हे त्या आश्रमात गेले असता तेथील विद्यार्थ्यांनी तुकोबांच्या काही रचना त्यांना म्हणून दाखवल्या. कौलालम्पूर येथील त्या आश्रमातील विद्यार्थ्यांकडून तुकोबांच्या अभंगांचा गजर झाल्यामुळे गणेशकुमार यांनाही आश्चर्य वाटले.

आपल्या या अनुभवाविषयी बोलताना  गणेशकुमार म्हणाले की, मी आश्रमात गेल्यानंतर तेथे शिकणाऱ्या मुलांनी मला तुकोबांचे काही अभंग म्हणून दाखवले. आश्रमातील बहुतेक मुले दक्षिण भारतीय आहेत. या मुलांनी ‘सुंदर ते ध्यान’ आणि अन्य काही अभंग म्हटले. याबाबत त्या मुलांकडे विचारणा केली असता, आपल्याला तुकोबांचे अभंग माहिती आहेत आणि आम्ही ते नेहमी म्हणतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील संत तुकाराम, रामदास स्वामी हे दक्षिण भारतातील लोकांना माहिती आहेत. रामदास स्वामी दक्षिण भारतात येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. दक्षिण भारतातील एक संत ग्यानानंद स्वामी यांचा शिष्यपरिवार जगभरात पसरला असून हरिदासगिरी महाराज हे त्यांचे शिष्य होते. दक्षिण भारतात प्रवचन/कीर्तन आदी कार्यक्रमातून हरिदासगिरी महाराज हे नेहमी मराठी अभंग सादर करत असत. त्यामुळे दक्षिण भारतात तुकोबांचे अभंग माहिती आहेत. कांचीपुरम्जवळ विठ्ठल-रुखमाईचे मोठे मंदिरही आहे. त्यामुळे कौलालंपूर येथील आश्रमातील विद्यार्थ्यांनाही या अभंगांची माहिती असल्यानेच त्यांनी ते सादर केले असल्याचे गणेशकुमार यांनी सांगितले.

तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाला आपला मित्र मानले. त्याच्याशी सहज संवाद साधला. त्यांच्या अभंगातूनही ही सहजता आणि जीवनविषयक तत्वज्ञानही दिसून येते. तुकोबांच्या अभगांची भाषा ही सहज व सोपी आहे. सर्वसामान्य माणसालाही त्याचे सहज आकलन होते. त्यात कठीण असे काही नाही. तुकोबांच्या या सहज भक्तीचा प्रभाव दक्षिण भारतातील लोकांवरही पडला आहे आणि त्यामुळेच तुकोबांचे अभंग मराठी भाषा आणि संस्कृतीच्या मर्यादा ओलांडून देश आणि जागतिक पातळीवर पोहोचले असल्याचेही गणेशकुमार म्हणाले.

No comments:

Post a Comment