07 January 2010

पुरस्काराचा आनदं आणि समाधान वेगळेच

राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱया लता मंगेशकर पुरस्कारासाठी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांची निवड झाली आहे. त्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला होता. ती बातमी लोकसत्ता (मुंबई) ७ जानेवारी २०१० च्या अंकात पान क्रमांक पाच वर प्रसिद्ध झाली आहे. आज ती बातमी मी येथे देत आहे. 

‘लता मंगेशकर’ हे नाव पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वअसून या नावाची खरी ओळख त्यांचा सुमधुर आवाज ही आहे. ज्या सुमधुर आवाजासाठी हे नाव प्रसिद्ध आहे, त्या लतादीदींच्या नावाचा पुरस्कार मला जाहीर झाला, त्याचा आनंद आणि समाधान काही वेगळेच असल्याची भावना सुमन कल्याणपूर यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.


राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आणि त्यांच्या चाहत्यांना मनापासून आनंद झाला. आपल्या गोड गळ्याने गेली अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या या गायिकेचा या पुरस्काराने योग्य सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटली.गेल्या काही वर्षांपासून पाश्र्वगायन आणि प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर असलेल्या सुमन कल्याणपूर या निमित्ताने पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आल्या.

पुरस्कारासाठी सुमन कल्याणपूर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज सकाळपासूनच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरचा दूरध्वनी सतत खणखणत होता. काहींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या सर्व गडबडीत सुमनताई आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे मी भावगीते, भक्तीगीते, चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले आहे. रसिकांच्या उदंड प्रेमामुळे आणि देवीच्या आशीर्वादामुळे मी हे योगदान देऊ शकले. राज्य शासनाने माझ्या या योगदानाची दखल घेऊन लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड केली त्याचा आनंद होतोय. मनात आनंद आणि एक वेगळेच समाधान आहे..

काही महिन्यांपूर्वी सुमन कल्याणपूर यांच्या ‘सुमनसुगंध’ या आत्मचरित्राचे प्रकाशन रवींद्र नाटय़ मंदिर येथे झाले होते. नवचैतन्य प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याचे शब्दांकन मंगला खाडिलकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमनताई बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर रसिकांसमोर आल्या होत्या. त्यावेळी भाषण न करता त्यांनी त्यांची गाजलेली काही मराठी आणि हिंदी गाणी गाऊन तर काही गुणगुणून उपस्थित रसिकांना एक वेगळाच आनंद दिला होता. या वयातही त्यांच्या गोड गळ्यातून उमटलेले स्वर रसिक आणि सुमनताईंच्या चाहत्यांना सुखावून गेले होते. त्यावेळी सुमनताई यांनी पुन्हा पाश्र्वगायनाकडे वळावे, अशी जाहीर विनंती त्यांना करण्यात आली होती.

तो संदर्भ घेऊन या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलताना त्यांना, पुन्हा पाश्र्वगायनाकडे वळण्याचा विचार आहे का, किंवा कोणाकडून तशी विचारणा झाली आहे का, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, रसिकांचा आग्रह हा शिराधार्थ आहे. रसिकांच्या प्रेमामुळेच मी आत्तापर्यंत जे काही गायले ते त्यांनी उचलून धरले. पण खरे सांगू का, आत्ता सध्या तरी पाश्र्वगायन करण्याचा कोणताही विचार नाही. पण मंत्र, स्तोत्रे, देवीच्या आरत्या अशा काही प्रासादिक रचना किंवा भक्तीगीते असलेल्या गाण्यांबद्दल विचारणा झाली तर मी त्यावर जरुर विचार करेन.

देवीवर माझी खूप श्रद्धा असून तिच्या कृपाआशीर्वादामुळेच मला हा आवाज मिळाला आहे. तो मी रसिकापर्यंत सुगम आणि चित्रपट संगीताच्या माध्यमातून पोहोचवला. देवीच्या कृपेमुळे पुन्हा अशी संधी चालून आली, मला पाश्र्वगायन करण्याची बुद्धी दिली तर कदाचित पुन्हा गाईनही, असेही कल्याणपूर यांनी सांगितले.‘सुमनसुगंध’ या आत्मचरित्राविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या पुस्तकाच्या निमित्ताने माझे जीवनचरित्र, माझ्याबद्दलची सविस्तर माहिती, छायाचित्रे लोकांपर्यंत पोहोचली. गेल्या काही वर्षांपासून मी पाश्र्वगायन आणि प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर असलल्याने माझ्याबद्दलही फारशी माहिती नव्हती. ती या पुस्तकामुळे सगळ्यांना कळली. पुस्तकात माझी गाणी, पुरस्कार यांची यादी देण्यात आली आहे. मात्र काही पुरस्कार व गाण्यांचा समावेश राहून गेला आहे. आता दुसऱ्या आवृत्तीत त्या माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करु. पुस्तकाला रसिक, साहित्यप्रेमी आणि आपल्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिली आवृत्ती आता संपत आल्याचेही त्या म्हणाल्या. विविध दूरचित्रवाहिन्यांवर सध्या सुरु असलेले संगीताचे कार्यक्रम, स्पर्धात्मक शो याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आजच्या पिढीला अशा माध्यमातून लोकांपुढे येण्याची संधी मिळतेय ही चांगली गोष्ट आहे. मात्र या मुलांनी मिळालेल्या प्रसिद्धीबरोबरच वाहावत न जाता संगीताचा आणि आपला शालेय-महाविद्यालयीन अभ्यासही पुढे सुरु ठेवावा, असा सल्लाही सुमनताईंनी दिला.याच अनुषंगाने अन्य काही प्रश्न त्यांना विचारले असता, त्या विनयाने म्हणाल्या की, अहो ही तर मुलाखतच व्हायला लागली. सध्या आपण फक्त मिळालेल्या पुरस्कारावरील माझी प्रतिक्रिया एवढय़ापुरतेच बोलू या. उगाच मी काहीतरी बोलायचे आणि नाहक नवा वाद निर्माण व्हायचा. त्यापेक्षा पुन्हा बोलू या कधीतरी. एका वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झालेल्या बातमीत सुमनताईंचे आडनाव आणि जन्मठिकाण चुकीचे छापून आले आहे. त्याबद्दलही त्या व्यथीत झाल्या होत्या. त्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. बोलण्याच्या शेवटी मिळालेल्या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले..

No comments:

Post a Comment