23 January 2010

आचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशातील अन्य राज्यांची निर्मिती सहजपणे झालेली असताना महाराष्ट्राच्या वाटय़ाला मात्र संघर्ष आणि रक्त सांडून महाराष्ट्र राज्य मिळवावे लागले होते. महाराष्ट्र आणि गुजरात असे एकच द्विभाषिक राज्य निर्माण करण्याचा आणि त्यातून मुंबई वेगळी करण्याचा घाट केंद्रातील कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी घातला होता. मात्र प्रखर आंदोलनानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. यात सर्वसामान्य माणसांप्रमाणेच ज्यांचे योगदान खूप मोठे होते, त्यात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे नाव ठळकपणे घ्यावे लागेल.


मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी आचार्य अत्रे आणि त्यांचे ‘मराठा’ हे दैनिक आणि ‘नवयुग’ हे साप्ताहिक यांचे मोठे योगदान आहे. आचार्य अत्रे यांनी आपल्या धारदार लेखणी आणि वाणीच्या जोरावर महाराष्ट्र ढवळून काढलाच परंतु केंद्रातील आणि त्यावेळच्या मुंबई राज्यातील मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या मंडळींना अक्षरश: सळो की पळो करून सोडले तर अनेकांचे शाब्दिकवस्त्रहरण केले.

१५ नोव्हेंबर १९५६ रोजी ‘मराठा’ दैनिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि १ मे १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र मिळाला. या काळात अत्रे यांच्या लेखणीमुळे ‘मराठा’ अमाप लोकप्रिय झाला. त्याचा खपही खूप होता. अत्रे यांचे अग्रलेख, लेख, ठिकठिकाणच्या भाषणांचे हशा आणि टाळ्यांसह येणारे वृत्तान्त, बातम्या आणि अंकातील अन्य सर्व मजकूर खास अत्रे स्टाईल मध्ये असायचा. सर्वसामान्यांच्या भावनेला, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला ‘मराठा’ने वाचा फोडली. ‘मराठा’चा हा काळ म्हणजे त्या वृत्तपत्राचे वाचक आणि तेथे काम करणाऱ्या पत्रकारांसाठीही सुवर्णयुग होते. अशा या इतिहास घडविणाऱ्या ‘मराठा’ दैनिकाचे सर्व अंक नव्या पिढीला तसेच अभ्यासकांना चिरस्थायी स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी ते डिव्हिडी स्वरुपात आणण्यात येणार आहेत. 


‘मराठा’च्या पहिल्या अंकापासूनचे सर्व जुने अंक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जपून ठेवण्यात आले आहेत. मात्र कालपरत्वे कागद जुना झाल्यामुळे ते अंक खराब होऊ लागले आहेत.शिरीष पै यांची बहिण  मीना देशपांडे या त्या लिहित असलेल्या एका पुस्तकाच्या निमित्ताने तेथे गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या  ही बाब लक्षात आली. वृत्तपत्राचा कागद हा काही काळानंतर जीर्ण होऊ लागतो. वृत्तपत्राच्या अंकाची योग्य ती काळजी घेतली तरीही कालांतराने त्याला नुसता हात लावला तरी त्याचे तुकडे पडतात. अशा वेळी अत्याधुनीक तंत्राचा वापर करुन हे सर्व अंक जतन करण्यात यावेत आणि ते चिरकाळ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने शिरीष पै,  मीना आणि शिरीष पै यांचा मुलगा राजेंद्र पै यांनी ‘मराठा’चे हे सर्व अंक डिव्हिडी स्वरुपात जतन करण्याच्या दृष्टीने विचार सुरु केला आहे.

‘मराठा’चा पहिला अंक १५ नोव्हेंबर १९५६ मध्ये प्रसिद्ध झाला. तर १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या काळातील ‘मराठा’चे सर्व अंक म्हणजे एक प्रकारे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा इतिहासच आहे. त्यामुळे ‘मराठा’ अंकांच्या डिव्हिडी दोन कालखंडात काढण्यात येणार आहेत. ‘मराठा’चा पहिला अंक ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा पहिला कालखंड असेल. १९६० ते आचार्य अत्रे यांचे निधन होईपर्यंत म्हणजे १९६९ पर्यंतचा हा दुसरा कालखंड असेल. पहिल्या कालखंडात संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्या अनुषंगाने ‘मराठा’ मध्ये आलेले सर्व काही तर त्यानंतरच्या कालखंडात त्यानंतरचा सर्व भाग असेल. या डिव्हिडीमध्ये संपूर्ण अंक म्हणजे अंकातील सर्व पाने देण्यात येतील. त्यामुळे वाचक, अभ्यासक, पत्रकारितेचे विद्यार्थी या सर्वाना मूळ अंक पुन्हा एकदा वाचल्याचे समाधान मिळणार आहे.


‘मराठा’चे सर्व अंक डिव्हिडीवर आणण्याचे हे काम येत्या वर्षअखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी आचार्य अत्रे आणि त्यांचे ‘मराठा’ हे दैनिक आणि ‘नवयुग’ हे साप्ताहिक यांचे मोठे योगदान होते. यातील ‘मराठा’ आता डिव्हिडीवर उपलब्ध होणार आहे.

याच विषयावरील माझी बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २३ जानेवारी २०१० च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक अशी

2 comments:

  1. आपला ब्लॉग छानच आहे. खुप उपयुक्त आहे. दैनिक मराठा घ्या अग्रलेखाचा डीव्हीडीचा पहिला खंड कोठे मिळेल? कृपया सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.

    ReplyDelete
  2. ही DVD कुठे उपलब्ध आहे.

    ReplyDelete