14 June 2010

अंदाज पावसाचा, विनाश पर्यावरणाचा

हवामान खात्याने पावसाच्या वर्तवलेल्या अंदाजाकडे सर्वसामान्य नागरिक कधीच गंभीरपणे पाहात नाहीत. हवामान खात्याने मुसळधार किंवा जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला असेल तर तेव्हा चक्क उन पडते.आणि पाऊस पडणार नाही, असे सांगितले असेल तर तेव्हा चक्क मुसळधार पाऊस पडतो. गेल्याच आठवड्यात शनिवार व रविवार या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली होती. मात्र त्या दिवशी एक थेंबही पाऊस पडला नाही.   
 

पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी अनेक निकष ताडून पाहिले जातात. हे निकष अत्यंत किचकट तसेच गुंतागुंतीचे असतात. त्यातही तापमान, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा, अप्पर एअर र्सक्युलेशन हे काही प्रमुख घटकांचा यात समावेश असतो. हे सर्व घटक तसेच गेल्या काही वर्षांमध्ये जमा केलेली महिती लक्षात घेऊनच पावसाचा अंदाज वर्तवला जातो.

पावसाशी संबंधित या घटकांच्या अभ्यासामध्ये काही वर्षांनी बदलही होत असतात. एखाद्या घटकाचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे लक्षात आल्यावर तो रद्द केला जातो तर परिणाम होण्याची शक्यता असलेला घटक नव्याने समाविष्ट केला जातो. अल-निनो वादळाचा काही परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याची माहिती गोळा करण्यात येते. काही वर्षांनंतर हा घटक कितपत प्रभावी आहे, ते पाहून त्याचा अभ्यास करावा की नाही ते ठरवले जाते.

गेल्या पाच वर्षांमधील वेधशाळेचा पावसाचा अंदाज आणि मान्सूच्या तारखा पाहिल्या तर त्यात दोन-चार दिवसांचाच फरक पडला असल्याचे दिसून येते. २००५ मध्ये ७ जूनला पाऊस केरळात दाखल झाला. वेधशाळेचा अंदाज  १० जून असा होता. अन्य वर्षातील वेधशाळेचा अंदाज पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे प्रत्यक्ष पाऊस केरळ मध्ये दाखल झाला तो दिवस. २००६- २६ मे (३० मे), २००७-२८ मे ( २४ मे), २००८ -३१ मे (२९ मे) आणि गेल्या वर्षी २३ मे (२६ मे) या दिवशी मान्सून केरळ मध्ये दाखल झाला होता.

पावसाचा अंदाज अधिक अचूक वर्तविण्यासाठी हवामानशास्त्र वर्षानुवर्षाचा अभ्यास, माहितीचा साठा, त्याचे विश्लेषण तसेच हवामानातील बदल टिपणारी आधुनिक यंत्रे महत्त्वाची ठरतात. तरीही आपण केवळ अंदाजच व्यक्त करू शकतो.


याशिवाय तापमान, वाऱ्याचा वेग आणि दिशा, हवेचा दाब, पाऊस अशा मुख्य घटकांचे स्वयंचलित पद्धतीने रिडींग घेणारी ऑटोमेटिक वेदर स्टेशन याचाही उपयोग होत असतो. डॉपलर रडार या सारखी अत्याधुनिक यंत्रणाही मुंबईत बसविण्यात येणार आहे. त्यामुळेही पावसाचा अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे.

अर्थात कितीही अत्याधुनिक यंत्रणा बसवली आणि पावसाचा किंवा हवामानाचा अंदाज वर्तवला  तरी मानवी बुद्धी, अत्याधुनिक यंत्रणा आणि विज्ञानापेक्षाही निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे. तो लहरी आहे. तो कसा वागेल, हे आपल्याला ठामपणे कधीच सांगता येत नाही. अर्थात असे असले तरी अत्याधुनिक यंत्रणेमुळे किमान काही प्रमाणात तरी पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे आपण होणारे नुकसान टाळू शकतो, हे मान्य करावेच लागेल.

आधुनिक प्रगती, बदलती जीवनशैली, पर्यावरणाचा आपणच केलेला नाश, झाडांची बेसुमार केलेली कत्तल, नष्ट केलेले डोंगर याचाही परिणाम निसर्गावर पर्यायाने वातावरणावर, पावसावर होत आहे. त्याचा आपण कधी गंभीरपणे विचार करणार आहोत की नाही. अशाच प्रकारे आपण पर्यावरणाचा नाश करत राहिलो तर पुढील पन्नास/ शंभर वर्षात आकाशातून नैसर्गिकपणे पाऊस पडणेही कदाचित बंद होईल. कृत्रीम पद्धतीनेचे दरवर्षी आपल्याला पाऊस पाडावा लागेल. पुढील पिढीला आकाशातून धो धो पाऊस पडतो, हे कदाचित खरे वाटणार नाही आणि त्यांना केवळ पावसाची व्हिडिओ फिल्म दाखवावी लागेल...     

1 comment:

  1. हवामानाच्या अंदाजात फरक पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे एका ठराविक उंचीपलीकडे स्थिर हवामानकेंद्रे उभारून तेथील परिस्थितीची निश्र्चित माहिती मिळविता येत नाही.

    ReplyDelete