19 June 2010

निसर्ग पयर्टन

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावरील फर्स्ट पर्सन या सदरात १७ जून २०१० रोजी प्रसिद्ध झालेला लेख. ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील वाफे येथे उभारण्यात आलेल्या निसर्ग पयर्टन केंद्रविषयीचा हा लेख किरण सयाईस-शिसोदे यांचा आहे.

शहापूर वन विभागाने वैविध्यपूर्ण अशा निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती अलिकडेच केली आहे. मुंबई पासून दीड तासाच्या अंतरावर मुंबई-नाशिक महामार्गानजीकच्या वाफे गावाजवळ हे केंद्र उभारण्यात आल्याने मुंबईकरांसाठी ते सोयीचे आहे. सिमेंटच्या जंगलात धकाधकीचे जीवन जगणा-या मुंबईकरांसाठी हे पर्यटन केंद्र विरंगुळा ठरेल हे प्रवेश करतांनाच जाणवले.
वाफे परिसरात ४० एकर क्षेत्रात शहापूर वन विभागाने वैविध्यपूर्ण या निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती केली आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा या पर्यटन केंद्रात निसर्गाचा आनंद लुटण्याबरोबरच मुलांना वनऔषधी वनस्पतींचा अभ्यास करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे या पर्यटन केंद्राचे एक वैशिष्टय आहे. राज्याचे वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या हस्ते त्याचे नुकतेच उद्घाटन झाले. आता ते नुकतेच पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

स्वच्छ आणि सुंदर या पर्यटन केंद्रात राहण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. तरंगता तंबू हे इथल्या पर्यटन केंद्राचे वैशिष्टय आहे. जमिनीपासून ६ मीटर उंचीवर असलेल्या या तंबंचे क्षेत्रफळ १८ चौरस फुट असून झाडांवर लोखंडी तारांनी तो बनवण्यात आला आहे. त्यात सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम काही काळ तरंगत्या तंबूतच ठोकला. नंतर भटकंतीस सुरूवात केली.  निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कुडांच्या व गवताने शाकारलेल्या झोपडयाही येथे बनवण्यात आल्या आहेत. त्या वातानुकुलित असल्याने पर्यटकांना शहरी जीवनाचेही सुख उपभोगता येईल. याशिवाय येथे गेस्टरुमचीही व्यवस्था आहे.

निसर्गाच्या कुशीत यायचे असेल तर निसर्गातीलच उपलब्ध वस्तूंचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रदुषण रोखण्यासाठी येथे सर्वतोपरी काळजी घेतली जाते. त्यामुळे पर्यटकांना पंगतीचा अनुभव मिळणार असल्याचे या केंद्राचे व्यवस्थापक सांगतात.

या केंद्रात फुलपाखरे विहार करताना दिसतात. त्यांच्यासाठी क्रोटोलरिया, बेल ऑईल, शेवंती, निरगुडा, कडीचा पत्ता, कणेर आणि चाफा यासारखी फुलझाडे लावण्यात आली आहेत. केंद्रात भारतीय नौदलाचा एक विभाग आहे. ९ बोटी आहेत. या बोटींबरोबर पाणबुडी पुढे असणारा डोंबही ठेवण्यात आला आहे. येणा-या विद्यार्थ्यांना नौदलाविषयी माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरुणांनी नौदलात भरती व्हावे, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे शहापूरचे वनक्षेत्रपाल दिनेश सिंग यांनी सांगितले.

झाडे कशी लावतात, त्यांची निगा कशी राखावी, रोपे कशी बनवावित, झाडांचे महत्व, पर्यावरणावर लघूपट आणि वनअधिका-यांबरोबर चर्चा असा एक दिवसाचा भरगच्च कार्यक्रम व एलसीडी स्क्रीनवर माहितीपट दाखविण्यात येतात.. विद्यार्थ्यांसाठी जेवण, चहा यांची उत्तम व्यवस्था येथे आहे.

वनौषधींचे महत्व अनन्यसाधारण असून त्यांचा वापर सर्व स्तरांवर पोहोचवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी शतावरी, सर्पगंधा, लेंडी पिंपळी, बेडकी, कदंब, अग्निमंथ,पांगिरा, कोरफड, गुळवेल, आराठा अशा ८० प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या वनस्पतींचे गुणधर्म व त्यांचा विविध आजारांवरील वापर याची माहिती येथे देण्यात येते. त्यामुळे पर्यटनाबरोबरच मुलांना इतरही बाबी शिकण्यास मिळत आहेत.

(महाराष्ट्र राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

1 comment:

  1. वा..उत्तम माहिती. खूप धन्यवाद... जुलै महिन्यात सुरू असेल का हे केंद्र??? जाउन येतो एखाद दिवशी...

    ReplyDelete