15 January 2010

प्रसिद्धी हव्यास

मराठी चित्रपटाच्या नावावरुन किंवा त्यात दाखविण्यात आलेल्या व्यक्तीरेखांवरुन वाद होण्याचे प्रसंग तसे विरळा. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वातावरण अवधुत गुप्ते यांच्या झेंडा आणि महेश मांजरेकर यांच्या शिक्षणाच्या आयचा घो या दोन चित्रपटांनी ढवळून निघाले होते. आता हे आपसूक घडले की घडवून आणले किंवा हा सगळ्या चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळण्यासाठी केलेला प्रसिद्धी हव्यास होता.

सेन्सॉर मंडळाकडून एखादा चित्रपट, त्याचे शीर्षक, संवाद किंवा दश्ये संमत झाली की अन्य सामाजिक संस्था किंवा राजकीय पक्षांनी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकावर आपली राजकीय सेन्सॉरशिप लादणे कितपत योग्य आहे. म्हणजे चित्रपटात  आपल्या बाजूने असेल तर चित्रपटाला हिरवा कंदिल आणि विरोधात असेल तर त्याला विरोध असे करणे कितपत योग्य आहे. झेंडा या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शिवसेना यांना झुकते माप दिल्यामुळे  आणि राज ठाकरे यांना कमी लेखल्यामुळे शिवसेनेने चित्रपटाला हिरवा कंदिल दिला पण याच्या उलट झाले असते तर शिवसेनेने हा चित्रपट इतक्या सहजतेने प्रदर्शित होऊ दिला असता का तर याचे उत्तर नाही असेच आहे.


या चित्रपटातील सदा मालवणकर या पात्राचे आता नाव बदलून आणि त्याच्या तोंडचे मालवणी संवाद मराठीत करून हा चित्रपट आता प्रदर्शित करण्यात येणार आहे. हे संवाद किंवा व्यक्तीरेखेचे नाव बदलून काय फायदा झाला. लोकांना जे माहिती आहे, त्यात काही बदल होणार आहे का, मध्यंतरी याच संदर्भात अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्याची बातमी वाचनात आली. झेंडा या चित्रपटात सदा मालवणकर हे पात्र दारू पिणारे दाखवले आहे, म्हणजे मग प्रत्यक्षात नारायण राणे हे दारू पितात हे विरोध करणाऱया स्वाभीमान्यांना मान्य आहे का, असा सवाल पोंक्षे यांनी विचारला. मुळात एखादा चित्रपट सेन्सॉरसंमत झाल्यानंतर अशा प्रकारे राजकीय सेन्सॉरशिप घालणे हे चुकीचे असून त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला जात आहे.


इकडे महेश मांजरेकर यांनीही मी चित्रपटाचे नाव बदलणार नाही त्यापेक्षा मी महाराष्ट्र सोडेन असे वक्तव्य केले होते. खरे तर मराठा महासंघानेही चित्रपटाच्या नावाला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. हा चित्रपट मांजरेकर यांनी अचानक प्रदर्शित केलेला नाही किंवा नाव अचानक दिलेले नाही. यापूर्वीही वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातून चित्रपटाविषय़ी आणि या नावाविषयी येऊन गेले होते. मग मराठा महासंघाने त्याच वेळी याला आपला विरोध का दर्शवला नाही, चित्रपट प्रदर्शित होण्यास काही दिवस राहिलेले असताना हा विरोध का केला, चित्रपटाचे नाव बदलणार नाही असे सांगणाऱया मांजेरकर यांनी चित्रपटाच्या प्रत्येक खेळापूर्वी चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल दिलगिरी व्यक्त करू, असे सांगितले आणि हा वाद मिटला की मिटवला. मांजरेकर हे आपल्या मुद्द्यावर जर ठाम होते तर त्यांनी या तोडग्यालाही का मान्यता दिली. म्हणजे केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हे सर्व केले गेले का.


अनेक वर्षांपूर्वी आलेल्या सखाराम बाईंडर या नाटकाबद्दलही त्या वेळेस शिवसेनेने आक्षेप घेऊन ते नाटक बंद पाडले होते. गेल्या वर्षी संतसूर्य तुकाराम या कादंबरीत तुकाराम यांच्याविषयायी अपशब्द आणि त्यांचा अपमान करणारा मजकूर असल्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पुस्तकाचे लेखक डॉ. आनंद यादव यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. येथे गोष्ट वेगळी होती. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज या सारख्या लोकोत्तर आणि समाजात आदर असणाऱया व्यक्तींबद्दल मुळात असे लिहावे का, लेखनस्वातंत्र्याचा आदर राखुनही असे म्हणावेसे वाटते की खरे तर मोठ्या व्यक्तींच्या जीवनातील  अशा गोष्टी जरी खऱया असल्या तरी त्या लेखनातून का मांडाव्यात, समजा मांडल्या गेल्या तर आंदोलने, किंवा तोडफोड करुन हा प्रश्न सुटणार आहे का, त्यापेक्षा त्याला प्रत्युत्तर म्हणून वेगळे पुस्तक लिहावे किंवा पुरावे मांडून ते म्हणणे खोडून काढावे. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जाते. तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी सारेच पुढे सरसावतात.


चित्रपट किंवा एखाद्या पुस्तकातून कधी आणि केव्हा व कोणाच्या भावना दुखावतील, याचेही आता राजकारण झाले आहे. समाजातील सुजाण नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक व कलाकार यांनीही एकत्र बसून याचा सामापचाराने विचार केला पाहिजे. अर्थात व्यक्तीस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली एम. एफ. हुसेन यांच्या सारखी माणसे हिंदू देवदेवतांचा अपमान करणार असतील, त्यांचे विटंबन करून, त्यांना नग्न स्वरुपात दाखवून आपली कला लोकांपुढे आणणार असतील किंवा जाहिरातींच्या माध्यमातून असे विडंबन होणार असेल तर अशा प्रवृत्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे धाडस पोलीस आणि शासनाने दाखवले पाहिजे.  हे प्रकार फक्त हिंदू देवदेवतांच्याच बाबतीत का घडले जातात की मुद्दामहुन घडवून आणले जातात. ख्रीश्चन किंवा मुसलमान धर्माच्या बाबतीत असे करण्याची मुळात कोणी हिंमत दाखवत नाही आणि चुकून असे घडले तर सर्व सहानुभूती, कायदे हे तेव्हा त्यांच्या बाजूने असतात. हे योग्य नाही. यात बदल झाला पाहिजे.

    
आयचा घो हा शब्द यापूर्वीही काही गाण्यातून आलेला होता. तेव्हा त्याला विरोध का झाला नाही, आत्ताच तो कऱण्याचे काय कारण होते, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. तेव्हा विनाकारण  अशा प्रकारे राजकीय दबाव आणि सेन्सॉरशिप आणून राजकारण करणाऱया संस्था, संघटना आणि व्यक्तींना पोलिसी हिसका दाखवून कठोर कारवाई केली गेली पाहिजे. तरच असे प्रकार घडणार नाहीत आणि याला कुठेतरी पायबंद बसू शकेल. नाहीतर आज शिवसेना/भाजपचा पाठिंबा तर उद्या त्यांचा विरोध. आज कॉंग्रेस/राष्ट्रवादीचा विरोध तर भविष्यात पाठिंबा, असे नेहमीच घडत राहील. त्याला कधीतरी आळा बसणार आहे की नाही...                    

1 comment:

  1. > ख्रीश्चन किंवा मुसलमान धर्माच्या बाबतीत असे करण्याची मुळात कोणी हिंमत दाखवत नाही ...
    >

    ही गोष्ट १९६५ कडली असावी (मी ८-१० वर्षांपूर्वी वाचली). एक रॉक-पॉप असले प्रकार गाणारा महाभाग सूळावरचा येशू हे चिह्‌न स्वमूत्रात बुडवून ठेवत असे. मुद्‌दाम, धर्माला खिज़वायला. हा बेबंदपणा गोर्‍या लोकांत तर सर्वात जास्त आहे. 'झेंडा' चित्रपटाबद्‌दल मला पुरेशी माहिती नाही. कायदा हातात घेणं कधी समर्थनीय आहे आणि कधी नाही, या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येणं शक्य नाही; पण अशा पॉप गाणार्‍यांना (आणि ऐकणार्‍यांना पण) किंवा एम एफ़ हुसेनला ठोकूनच काढायला हवं.

    ReplyDelete