16 January 2010

चित्रपटाच्याच...घो

चित्रपटाच्या नावावरुन प्रसिद्धीच्या झोतात आलेला शिक्षणाच्या आयचा घो हा मराठी चित्रपट मुद्दामहुन टॉकीजमध्ये जाऊन पाहिला. चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका आणि काही संवाद वगळता मला तरी चित्रपट फारसा प्रभावशाली आणि परिणामकारक  वाटला नाही. चित्रपटाचे शीर्षक बदलणार नाही, लोकांनी माझा चित्रपट पाहावा. मग त्यांनाच कळेल की चित्रपटाचे हेच शीर्षक कसे योग्य आहे, असे जाहीर वक्तव्य महेश मांजरेकर यांनी केले होते. चित्रपटाच्या उत्तरार्धात भरत जाधव यांनी प्रचलित शिक्षण पद्धतीवर कोरडे ओढले असून त्यांचे काही संवाद हे नक्कीच टाळ्याघेण्यासारखे झाले आहेत. मात्र  दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य, चित्रपट माध्यम म्हणून घेण्यात येणारे स्वातंत्र्य कितीही मान्य केले तरी ते ज्या प्रकारे आणि पद्धतीने दाखवले आहे ते फारसे पटत नाही. हा सर्व प्रकार तद्दन फिल्मी वाटतो.


चित्रपटाच्या मध्यतरानंतर भरत जाधव हे सर्वत्र प्रचलित शिक्षण पद्धतीच्या आयचा घो असे सांगत सगळीकडे फिरताना दिसतात. पण ही वेळ त्यांनी स्वतच आपल्या मुलावर आणलेली आहे. त्यांचा मुलगा हा अभ्यासात फारसा हुशार नाही, त्याला शिष्यवृत्ती परीक्षेला बसवू नका, असे शाळेचे प्राचार्य, शिक्षिका, शिकवणीच्या बाई सांगत असतात. तरीही भरत जाधव त्याकडे दुर्लक्ष करुन आपलेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करतात.  अभ्यास आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेपायी ते मुलाचे क्रिकेट बंद करतात. हे सगळे त्यांना अगोदर कळत नाही का. चित्रपटातील भरत जाधव अर्थात राणे हे महापालिकेत नोकरी करत असल्याचे दाखवले आहे. महापालिकेत ते  क्लार्क असावेत, असे दिसते. महापालिकेत बरीच वर्षे नोकरी केलेल्या व्यक्तीचा पगार इतका कमी असू शकतो, हे पटत नाही.


राणे आणि त्यांचे मित्र चित्रपटातील बहुतेक प्रसंगात फक्त दारु पितांना दाखवले आहेत. ते ज्या चाळीत राहतात, तेथील लोक त्यांच्या या दारुकामाला आक्षेप घेत नाहीत का, एकीकडे मुलांवर संस्कार, अभ्यासातील हुशारी याबाबत सांगणारे राणे हे दारुच्या आहारी गेलेले किंवा रोज प्यायला बसणारे का दाखवले आहेत., तसेच दररोज दारु पितांना चर्चा करण्यापेक्षा कधी नुसतेच गप्पा मारताना दाखवले असते तर चालले नसते का, महापालिकेत क्लार्क म्हणून काम करणारा माणूस गाड्या पुसण्याचे काम करत असेल हेही पटत नाही.  व्हाईट कॉलर गुंडाकडून प्रत्येकवेळी व्याजाने पैसे घेण्यापेक्षा राणे हे ऑफिसातून का कर्ज घेत नाहीत, चित्रपटाच्या मध्यंतरानंतर राणे यांच्यात झालेले परिवर्तन हे अचानक झाल्यासारखे वाटते. त्यांची भाषणबाजी, शाळेच्या वर्गात जाऊन बोलणे, स्टार माझा या वृत्तवाहिनीवर जाणे,  स्टार माझा या वाहिनीवर शालेय पुस्तके दर दोन वर्षांनी बदलणे व त्यात असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणे, त्यासाठी राणे यांना गुंडांकरवी मारहणार होणे, राणे मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी जागा विकताहेत म्हटल्यानंतर त्यांचा भाऊ व बहिणाने घरी येऊन आपला हिस्सा मागणे हे सगळे मुद्दामहुन आणि ओढूनताणून आणल्यासारखे वाटते. किमान आधी त्यांच्या भावाच्या स्वभावाबद्दल काही संवाद किंवा प्रसंग दाखवायला त्यांची प्रवृत्ती कशी आहे, हे समोर यायला हवे होते.


मुळात राणे यांनी शिक्षक, शाळेचे प्राचार्य, मुलाचे क्रिकेटचे प्रशिक्षक यांचा सल्ला मानला असता तर ही वेळच आली नसती. राणे हे कधीही अगोदर मुलांचा अभ्यास घेताना दाखवलेले नाहीत एकदम शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अभ्यास घेताना आणि मुलाला पाढे येत नाहीत म्हणून प्रचंड मारहाण करताना दाखवले आहेत.   चित्रपटाच्या शीर्षकावरुन जर वाद झाला नसता तर कदाचित सध्या चित्रपट पाहण्यासाठी जी गर्दी होत आहे किंवा लोकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे, ती कदाचित झाली नसती. तसेच सध्या होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आमीर खानचा थ्री इडियट चित्रपट याचाही मांजरेकर यांच्या या चित्रपटाला मोठा फायदा होत आहे. चित्रपटात जे दाखवले आहे ते तद्दन फिल्मी वाटते. त्यात वास्तवता जाणवत नाही. भरत जाधव यांचे दात खाऊन बोलणे आता नेहमीचे झाले आहे. मी शिवाजीराजे बोलतोय या चित्रपटात सिद्धार्थ जाधव याने रंगवलेला खलनायक हा खलनायक न वाटता विनोदी वाटला होता. मुळात तो त्या भूमिकेत शोभून दिसला नव्हता. या चित्रपटात तो विनोदी वाटत नाही.


चित्रपटातील काही संवाद मात्र खटकेबाज  आहेत. पडद्यावर ते पाहताना सहज टाळ्या पडतात. सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या मुलांनी सहज अभिनय केला असून तो उत्स्फूर्त वाटतो. क्रांती रेडकरी ठिक. महेश मांजरेकर यांनी ज्या प्रकारे चित्रपटाची जाहिरातबाजी केली त्यावरुन सध्याची शिक्षणपद्धती, त्यामुळे मुलांवर होणारे परिणाम, याबद्दल काही वेगळे पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण चित्रपट पाहून मला तरी तो फुसका बार वाटला. आता नाव बदलण्यावरुन झालेल्या स्टंटचा फायदा कदाचित चित्रपटाला होईलही.


 शिक्षणपद्धती, शिक्षण, मुलांचा अभ्यास, त्यांचे भावविश्व  या विषयावर यापूर्वीही काही चित्रपट येऊन गेले आहेत. दहावी फ हे त्यातले पटकन आठवणारे नाव. तो चित्रपटही चांगला होता. प्रौढ साक्षरतेवर सई परांजपे यांनी तयार केलेला अंगुठाछाप ही खास सई परांजपे टच असलेला होता. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरुन सादर झालेली संस्कार ही मालिकाही उत्कृष्ट होती. त्यातही सध्याची शिक्षणपद्धती, सध्याचे शिक्षक, त्यांचे स्वभाव, शिकविण्याची पद्धत, मुलांचे भावविश्व परिमाणकारतेने उलगडण्यात आले होते.  महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट त्यात बसत नाही, असे वाटते.
          

3 comments:

  1. मला वाटते सिनेमाचे नाव हा जाहिरात बाजीचाच एक नमुना आहे, व लोक त्यालाच फसत आहेत, फसवणुकींची कलमे लावून खटला नाही का भरता येणार !!

    ReplyDelete
  2. विजय, सुरेश पेठे
    नमस्कार
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुमचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे.
    शेखर

    ReplyDelete