09 March 2012

हा तर रडीचा डाव

नाशिक महापालिका महापौरपदासाठी शिवसेनेने आपला उमेदवार उभा करून मनसेला कात्रजचा घाट दाखवला असल्याची आणि त्याच वेळी आपण कोणाचीही मनधरणी करणार नसल्याचे राज यांनी सांगितले असल्याच्या बातम्या आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. या मध्ये जर सत्य असेल तर तो शिवसेनेचा रडीचा डाव ठरेल.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतही मनसेमुळेच शिवसेना-भाजप यांचा सत्तेवर येण्याचा मार्ग सुकर झाला. अंबरनाथ नगरपालिकेतही मनसेने शिवसेनेला उघड पाठिंबा दिल्याने तेथेही शिवसेना सत्तेवर येऊ शकली. हे लक्षात घेऊन नाशिक महापालिकेसाठी शिवसेनेने मनसेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा या पूर्वीच जाहीर करणे आवश्यक होते. पण तेथे शिवसेनेने रडीचा डाव खेळत मनसेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस आणि अन्य पक्षांशी युती करून सत्तेवर येण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. दरम्यान ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप युतीला राज ठाकरे यांनी उघड पाठिंबा दिल्याने त्यानंतर तोंडदेखले का होईना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मनसेने नाशिक येथे मदत मागितली तर आपण विचार करू अशी भूमिका जाहीर करावी लागली.

वास्तविक ठाणे येथील मदतीची परतफेड म्हणून शिवसेनेने त्याचवेळी नाशिकसाठी राज यांना जाहीर पाठिंबा देऊ, असे ठामपणे सांगायला हवे होते. तसे केले असते तर उद्धव यांची प्रतिमा अधिक उजळली असती. तसे न झाल्यामुळे जनमानसात राज हिरो ठरले तर उद्धव हे रडीचा डाव खेळत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

उद्धव यांनी घेतलेल्या भूमिकेला कोणी चाणक्यनिती म्हणेल, कदाचित नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी शिवसेना आपला उमेदवार मागे घेऊन मनसेला पाठिंबा देईल, मनसेला झुलवत ठेवण्याची खेळी उद्धव यांना खेळायची असेलही. पण त्यातून उद्धव यांची असहाय्यता दिसून येत आहे. प्रत्येक वेळी (मराठी पाट्यांचा मुद्दा, पेडर रोड उड्डाण पूल, रेल्वेची लेखी परीक्षा आदी )राज हे शिवसेनेवर पर्यायाने उद्धव यांच्यावर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत आहे.

दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या सातही उमेदवारांना धूळ चारत मनसेने विजय मिळवला,त्याचे आत्मपरिक्षण उद्धव करणार आहेत की नाही.  विरोधाला विरोध किती काळ करत राहणार. भाजपला हे कळून चुकले असून म्हणूनच मतविभाजन होऊ नये म्हणून शिवसेना-भाजप युतीत मनसेला घ्यावे, असे भाजपचे म्हणणे आहे आणि ते चुकीचे नाही. नाशिक महापालिकेत मनसेला सर्वाधिक म्हणजे चाळीस जागा मिळाल्याने तेथील जनतेने मनसेला जनादेश दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने रडीचा डाव न खेळता उघडपणे मनसेला पाठिंबा द्यावा आणि खुल्या मनाने मनसेचा महापौर निवडून द्यावा.

केवळ राज यांना विरोध आणि त्यांचा महापौर होऊ नये म्हणून शिवसेनेने सत्तेसाठी ज्या पक्षांशी आपली वैचारिक नाळ जुळणारी नाही, त्यांच्या बरोबर युती केली  किंवा घोडेबाजार करून अपक्षांची दाढी कुरवाळली तरी त्या सत्तेला काहीही अर्थ असणार नाही.  नाशिकमधील मतदारांचाही तो अपमान तसेच शिवसेनेचा कृतघ्नपणा व रडीचा डाव ठरेल. 

No comments:

Post a Comment