11 March 2012

सर्वोत्कृष्ट अभिनेता सुबोध भावे

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून देऊळ या चित्रपटासाठी त्यातील मुख्य भूमिकेत असणाऱया गिरशी कुलकर्णी या अभिनेत्याला गौरविण्यात आले. मला ही निवड चुकीची वाटते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान बालगंधर्व चित्रपटातील बालगंधर्व यांच्या भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावे याला मिळायला पाहिजे होता, असे मला वाटते.

मी देऊळ आणि बालगंधर्व हे दोन्ही चित्रपट पाहिले आहेत आणि म्हणूनच मला हे मत मांडावेसे वाटते. देऊळ चित्रपटात गिरीश कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील भोळाभाबडा नायक रंगवला आहे. औंदुंबराच्या झाडापाशी त्याला भगवान दत्तात्रय यांचा दृष्टांत होतो आणि आणि त्यातून चित्रपट पुढे सरकतो. मग देवाच्या नावाखाली मांडला जाणारा बाजार, त्यातून नायकाची होणारी तगमग, मनाची घालमेल, गावातील राजकारण,  देवाचा नावावर होणारा धंदा इत्यादी सर्व या चित्रपटात आहे. वेशभूषा आणि बदललेली बोलण्याची ढब/भाषा यातून कोणीही सक्षम कलाकार ग्रामीण व्यक्तिरेखा चांगली वठवू शकतो, असे मला वाटते. कलाकाराला ते फारसे अवघड नाही.

पण बालगंधर्व मध्ये सगळेच आव्हानात्मक होते. हिंदी किंवा मराठी चित्रपटात जे अभिनेते स्त्री भूमिका करतात ते  (काही अपवाद अर्थात अशी ही बनवा बनवी मधील अभिनेता सचिन ची भूमिका) किती हिडीस आणि ओंगळ दिसतात ते आपण पाहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील बहुतांश वेळ बालगंधर्वांच्या भूमिकेत स्त्री वेशात वावरणे नव्हे तर अभिनय करणे किती कठीण आणि आव्हानात्मक आहे, ते लक्षात येईल.

बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्व साकारताना सुबोध भावे कुठेही हिडीस किंवा ओंगळवाणा दिसलेला नाही. ही भूमिका तो जगला आहे, बारीक सारीक सर्व बायकी लकबी त्यांने खुबीने दाखवल्या आहेत. भरजरी शालू, अंगावर दागिने घालून स्त्री वेषात तो कुठेही अवघडलेला वाटला नाही. उलट या रुपात तो राजस आणि खरोखरचा बालगंधर्व म्हणून दिसला आहे. जुन्या पिढीतील बालगंधर्वप्रेमी आणि आजच्या जमान्यातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनीही या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद दिला, हा चित्रपट उत्तम चालला, आणि मुख्य म्हणजे स्त्री वेशात सुबोध भावे हा प्रेक्षकांना भावला हीच खरे तर सुबोध भावेच्या अभिनयाला मिळालेली खरी पावती व दाद आहे, असे मला वाटते.

अभिनयातील सहजता, बोलका चेहरा आणि डोळे, स्त्री वेषातील सहज वावर चित्रपटात दिसून येतो. कल्पनेतील ग्रामीण युवक रंगविण्यापेक्षा जी व्यक्ती महाराष्ट्रात प्रत्यक्ष
 होऊन गेली, ज्यांनी त्यांचे गाणे आणि अभिनय प्रत्यक्ष पाहिला, विविध छायाचित्रांच्या माध्यमातून जे आजही आपल्यासमोर आहेत, त्यांची भूमिका साकार करणे हे खरे आव्हानात्मक आहे आणि त्यात सुबोध भावे याला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत. त्यामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार बालगंधर्वसाठी सुबोध भावे यालाच मिळायला हवा होता, असे मनापासून वाटते.
   
अर्थात जाहीर झालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारासाठी अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचे अभिनंदन.








     

  

1 comment:

  1. Mala tumcha mat anshataha patla aahe. Mi kaalach Deool pahila ani baayko la mhanatch hoto ki Girish Kulkarni la ya role sathi ka dila national award konas thauk. Mulat tyala pharsa role nahi, ani 90% role asa halka phulka role aahe. Shevti shevti 5 min vagaire jara serious role aahe jya sathi thode kashta jasta padale astil. Tar ya role sathi tyala ka milala award he kahi kalat nahi. Ata urla Balgandharva cha prashna, to mi pahila naslya mule mala tya var bolta yenar nahi. Pan kadhi hi to role jasta challenging vatato khara ani tumcha mhanana patata hi. National awards cha Filmfare nako vhayla mhanje milala.

    ReplyDelete