24 March 2012

कडवा धर्माभिमान

कडवा धर्माभिमान असावा की नसावा हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण आपल्या हिंदू धर्मियांच्या तुलनेत मुसलमान आणि ख्रिश्चन हे कितीतरी पटीने अधिक कडवे आहेत. आपण हिंदू धर्म, देव-देवता, हिंदू संस्कृतीचे मानबिंदू याबाबत जितके उदासिन असतो (काही कट्टर हिंदू धर्मियांचा अपवाद) तितके किंबहुना आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मिय धर्माबाबत कडवट असतात.

मुंब्रा येथे एका विवाह सोहोळ्यात फटाके फोडल्यानंतर त्यात कुराणांतील आयते लिहिलेला कागद वापरलेला दिसून आल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांचा उद्रेक झाला. वातावरण तंग बनले. रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्यात आली, काही काळ रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाण्यासाठी हे एक निमित्त ठरले, असे आपण क्षणभर गृहीत धर या. पण अन्य वेळीही मुस्लिम धर्मिय पराचा कावळा करत भावना दुखावल्याचा कांगावा करतात आणि मुस्लिमांचे लांगूनचालन करणारे राजकीय नेते, पोलीस आणि राज्यकर्ते अशा वेळी सोयीस्कर मौन बाळगतात.

शांतता क्षेत्राचा किंवा वेळेची मर्यादा न पाळता मशिदीवर ध्वनिवर्धकावरून देण्यात येणारी बांग, रस्ता अडवून आणि वाहतुकीची कोंडी करून रस्त्यावर पढण्यात येणारा नमाज, मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणू गणेशोत्सव,शिवजयंती किंवा अन्य हिंदू सणांच्या वेळेस बदलण्यात येणारा मिरवणुकीचा मार्ग, मशिदीवरून मिरवणूक नेताना वाद्य, ढोल-ताशे वाजविण्यात घालण्यात आलेली बंदी हे कशाचे द्योतक आहे. इतक्या सवलती मुस्लिम राष्ट्रात राहणाऱया तेथील अल्पसंख्यांकाना म्हणजे हिंदून मिळतात का, तसेच तेथे राहणाऱया मुसलमानांसाठीही अशा प्रकारे कायदे धाब्यावर बसवले जातात का.

मुसलमान किंवा ख्रिश्चन जेवढे कडवट धर्माभिमानी आहेत, त्यांच्या भावना दुखावल्यानंतर तो सर्व समाज, त्यांचे पुढारी, धार्मिक नेते जसे एकत्र येतात, तसे आपण हिंदी कधी येतो का, नाटक, दूरदर्शन आणि चित्रपटांमधून आपणच आपल्या धर्माची, देव-देवतांची टिंगल करत असतो, हिंदू धर्माभिमान्यांनी अशा गोष्टींना विरोध केला तर तेथे व्यक्तिस्वातंत्र्यांचा कंठशोष केला जातो. दिवंगत चित्रकार हुसेन यांनी आपल्या देवदेवतांची नग्न चित्रे काढली आणि त्यास हिंदू संघटना/धर्माभिमान्यांनी प्रखर विरोध केला तर त्याला काही अपवाद सोडले तर किती राजकीय पक्ष आणि नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दिला, हुसेन यांचा जाहीर निषेध केला,  उत्तर नाही असेच आहे.

महाराष्ट्र शासन अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत (जादूटोणा विरोधी विधेयक) एक कायदा आणत आहे. संत, वारकरी, हिंदुत्ववादी संघटना  यांनी त्याला प्रखर विरोध केला आहे. अंधश्रद्धा फक्त हिंदू धर्मात नाहीत त्या मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातही आहेत. पण झोडपायचे आणि उपदेशाचे डोस पाजायचे ते फक्त हिंदूना. हिंदू सोडून अन्य धर्मियांच्या बाबतीत असे काही करायला गेले तर ते चवताळून उठतात. दिवाळीत आपण फटाके फोडतो, त्यावर सर्रास हिंदू धर्मातील देव-देवतांची चित्रे असतात, पाश्चिमात्य देशात तर चपला, प्रसाधनगृहे आदी ठिकाणी हिंदू देव-देवतांची विटंबना केली जाते. काही उत्पादनेही आपल्या जाहिरातीत देव-देवतांना विकृत स्वरूपात सादर करतात, त्यांची टिंगल करतात. पणआपण किती जण चवताळून उठतो, दुर्देवाने खूप कमी.

हिंदू धर्मातही ज्या अनिष्ट रुढी-परंपरा होत्या त्या दूर करण्यासाठी आपल्याच धर्मातील मंडळी पुढे आली. सती, केशवपन, अशा अनिष्ट रुढी आपणच दूर केल्या. विधवा पुर्नविवाह, हुंडा बंदी, स्त्री शिक्षण, अनेकांनी समाजात रुजवले. अद्यापही जात-पात असली आणि काही जणांकडून त्याचा अतिरेक केला जात असला तरी बरयाच प्रमाणात सुशिक्षित समाजात त्याची बंधने शिथिल होऊ लागली आहेत. आंतरजातीय विवाह होऊ लागले आहेत. हे हिंदूधर्मिय सहिष्णू आणि धर्मातील अनिष्ट रुढी-परंपरेच्या विरोधात असल्याचे द्योतक आहे. आपण हळूहळू नक्की बदलतोय.

अन्य धर्मियांच्या विशेषत मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मियांच्या मानाने आपण खूप सहिष्णू आहोत. पण म्हणून अन्य धर्मीय त्याचा गैरफायदा घेत असतील आणि आपल्याच हिंदूबहुल देशात आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असेल, अल्पसंख्यांक म्हणून मुसलमानांचे लांगूनचालन होणार असेल, कोणीही येऊन हिंदू धर्म आणि आपल्या मानबिंदुंची येथेच्छ टिंगल आणि बदनामी करत असेल तर आपण हिंदू धर्मियानाही सहिष्णुता, बोटचेपेपणा, जाऊ दे मला काय त्याचे, अशी वृत्ती सोडून काही प्रमाणात तरी कडवट होणे गरजेचे आहे, असे मला वाटते.                       

1 comment:

  1. अंधश्रद्धा कायद्याला विरोध असण्याचे कारण अंधश्रद्धा कोणत्या हे ठरविण्याचा अधिकार या कायद्यानुसार काही माणसांकडे दिलेला आहे. अंधश्रद्धाना संरक्षण देणे हा विरोधाचा हेतू नाही.

    ReplyDelete