12 March 2012

ऐशा नरा मोजूनी...

वारा येईल तशी पाठ फिरविणारे, गेंड्याची कातडी असलेले, सरड्यालाही लाजवेल अशा प्रकारे रंग बदलणारे  पक्षबदलू सम्राट सुरेश जैन यांचे शंभर अपराध भरल्याने अखेर त्यांना पोलीस कोठडीत दाखल व्हावे लागले. अर्थात असे असले तरी सुरेश जैन यांच्या सारख्या मुरलेल्या राजकारण्याला गुन्हा सिद्ध होऊन खरोखरच शिक्षा होईल आणि खडी फोडायला तुरुगांत जावे लागेल की नाही याबद्दल मात्र शंका आहे. आजवरच्या अनुभवाप्रमाणे यातून ते सहीसलामत सुटतील, याची त्यांच्याप्रमाणेच सर्वसमान्यांनाही खात्री आहे.

काही दिवसांपूर्वी आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या वकीलाला लाच देताना जैन यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळेस वृत्तवाहिन्यांवर ही दृश्ये पाहतांना राजकारण्यांची कातडी गेंड्याची कशी आहे आणि ते किती कोडगे झाले आहेत, त्याचे प्रत्यंतर आले होते. आपण काही चुकीचे वागलोय, याचा पश्चात्तापही या दोघांच्या चेहऱयावर नव्हता. उलट निर्लज्जपणे हसत-हसत ते गाडीतून जातांना पाहायला मिळाले.
त्याचवेळेस संत तुकाराम यांचे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हे वचन आठवले.

तत्कालिन जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी रुपयांच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना रविवारी जिल्हा न्यायालयाने येत्या १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव नगरपालिकेतील तेव्हाच्या सत्ताधाऱयांनी शासकीय आणि खासगी जमिनी आपल्या मालकीच्या असल्याचे दाखवत हुडकोची फसवणूक केली आणि ११ हजार ४२४ घरकुलांच्या योजनेसाठी कर्जस्वरुपात मोठी रक्कम मंजूर करून घेतली. त्यांनी आपल्या मर्जीताल ठेकेदारांना घरकुलाचे कंत्राट देऊन मोठ्या प्रमाणात लाभ मिळवला, असा आरोप आहे. फेब्रुवारी २००६ मध्ये या योजनेत २९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

म्हणजे तब्बल सहा वर्षांनंतर जैन यांना अटक करण्याची प्रत्यक्ष कारवाई झाली. सत्ता मिळाली की जेवढे ओरबाडून खाता येईल, तेवढे खायचे. कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा करायची. सत्तेची पदे आणि अन्य फायदे हे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबीयानाच कसे मिळतील, याकडे डोळा ठेवायचा. आज सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची हीच अवस्था झाली आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकीय नेते आणि राजकीय पक्षांविषयी कमालीचा तिरस्कार व चीड निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना एका तरुणांने श्रीमुखात भडकावली. त्यावेळेस पवार यांच्या सारख्या नेत्यावर असा हल्ला होणे, कसे चुकीचे आहे, असे सर्व राजकीय पक्षांचे नेते कंठशोष करून सांगत होते. पण राजकीय नेत्यांनी आपल्या स्वताच्या वर्तनाने ही वेळ आणली आहे, आपल्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात इतकी चीड का निर्माण झाली आहे, त्याचे आत्मपरीक्षण एकाही राजकीय नेत्यांने केले नाही. राजकारण्यांविषयी मनात खदखदत असलेल्या संतापाचा हा उद्रेक होता, असे मला वाटते. सहनशक्तीलाही शेवटी एक मर्यादा असते. ती संपली की सर्वसामान्यांचा असा तोल सुटतो आणि असे व्हायला हे निर्लज्ज व कोडगे राजकारणीचे कारणीभूत आहेत, हे विसरून चालणार नाही.

आपल्या राजकीय आणि वैयक्तिक फायद्यासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱया
सुरेश जैन यांच्या सारख्या निर्लज्ज राजकारण्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत
कठोरात कठोर शिक्षा होईल तो सुदिन. कदाचित कायद्यातील पळवाटांमुळे ते सहीसलामत सुटतीलही. पण त्यामुळे अशा निर्लज्ज आणि कोडग्या राजकारण्यांसाठी तुकाराम महाराज यांनी  सांगितल्याप्रमाणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, असे करणारा एखादा कोणी निघाला तर आश्चर्य वाटायला नको. राजकारणी असाच भ्रष्टाचार करत व स्वताच्या तुंबड्या भरत राहिले तर तोही दिवस दूर नाही. 

No comments:

Post a Comment